माथेरानच्या विद्यार्थ्यांचा आक्रोस बधीर व्यवस्थेला का ऐकू येत नाही ?

0
971

माथेरानच्या विद्यार्थ्यांचा आक्रोस बधीर व्यवस्थेला का ऐकू येत नाही ?

माथेरानचे शेकडो विद्यार्थी आज सकाळपासून कर्जतला आमरण उपोषणाला बसले आहेत.काही ज्येष्ठ पत्रकार असं म्हणू शकतात की,उपोषण करणं हे काय विद्यार्थ्याचं काम आहे काय?प्रश्‍न चुकीचा नाही.शाळेला जाणे,अभ्यास करणे,चांगल्या मार्कने  उत्तीर्ण होणे हेच विद्यार्थ्याचें काम आहे.हे खरे आहे। प्रश्‍न असा आहे की,विद्यार्थ्यांवर उपोषणाची वेळ कोणी आणली.?असंवेदशील आणि निगरगट्ट व्यवस्थेनं.माथेरानमध्ये उच्च शिक्षणाची सोय नसल्यानं माथेरानच्या असंख्या विध्यार्थांना पुढील शिक्षणासाठी पायथ्याला नेरळ किंवा कर्जतला यावं लागतं.माथेरनहून पायथ्याला येण्यासाठी दोन मार्ग आहेत.एक रस्ता आणि दुसरा मार्ग मिनिट्रेनचा.मिनिट्रनं माथेरानला जायला किंवा खाली यायला किमान दोन तास लागतात.विद्यार्थ्याकंडं तेवढा वेळ असत नाही.रस्ता मार्गे जायचं तर बस किंवा टॅक्शी हे दोन पर्याय आहेत.टॅक्शीनं जायला -यायला दिडशे रूपये लागतात.त्यामुळं बहुसंख्य  विद्यार्थ्यांना एस.टींच्या बस सेवेचाच आधार आहे.ही बस पाच-सात वर्षापुर्वी सुरू झाली.त्यासाठी किमान दहा वर्षे माथेरानकरांना संघर्ष करावा लागला होता.एस.टी.साठी माथेरानकरांनी आंदोलन केलं होतं,त्यात काहींची डोकी फुटली होती आणि जाळपोळही झाली होती.त्यानंतर दोन मिनिबस आणल्या आणि बस सुरू झाली.परंतू हा आनंद माथेरानकरांना जास्त दिवस उपभोगता आला नाही.कारण दुय्यम दर्जाच्या या मिनिबसचं इंजिन घाटात बंद पडणे नित्याचे झाले होते.आता तर या गाड्याच नादुरुस्त होऊन डेपोत विश्रांती घेत असतात.परिणामतः माथेरानकर जनता आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.विद्यार्थ्यानी अनेकदा आपलं हे गार्‍हाणं डेपो मॅनेजरपासून कलेक्टर पर्यंत सर्वांच्या कानावर घातलं .कोणी त्याची दखल घेतली नाही.परीक्षा जवळ येत आहे आणि वाहतुकीचा बट्ट्याबोळ वाजल्याने विद्यार्थ्यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.सकाळपासून शंभरावर विद्यार्थी कर्जतमध्ये उपोषणाला बसले आहेत.मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एका साध्या मागणीसाठी उपोषण करीत असले तरी सकाळपासून एकाही  मुर्दाड अधिकार्‍यानं त्याची दखल घेतली नाही किंवा त्याचं उपोषण सुटावं यासाठी मध्यस्थी केलेली नाही.जिथं स्थानिक तहसिलदार आणि प्रांताधिकारीच मुलांच्या आक्रोशाकडं डोळेझाक करीत असतील तर हा आक्रेश मंत्रालयापर्यत शिक्षण मंत्री विनोद तावडे किंवा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यापर्यत जाण्याची सुतराम शक्यता नाही.उघड्यावर साधा मांडव घालून हे सारे विद्यार्थी उपोषण करीत आहेत.त्यामुळे पालक चिंताक्रांत झाले आहेत.चळवळीकडे दुर्लक्ष करायचं,चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नैराश्य येईल अशा पध्दतीनं त्याच्याशी वागायचं आणि सार्‍या चळवळी मोडून काढायच्या हे विद्यमान सरकारचं ंधोरण आहे.हे धोरण सरकारनं जरूर अवलंबावं पण इथं प्रश्‍न कोवळ्या मुलांचा आहे.तिथं तरी सरकारनं जर सवंदेनशीलता दाखविली पाहिजे अशी अपेक्षा असणं चुकीचं नाही.या ग्रुपमध्ये विनोद तावडे यांचे स्वीय सहाय्यक गोविंद येतयेकर आहेत,त्यांना विनंती आहे की,त्यांनी तातडीने हा विषय मंत्रीमहोदयांच्या कानावर घालून मुलं रात्री घरी जातील अशी व्यवस्था करावी म्हणजे त्यांचे उपोषण सोडवायला लावावं.आपणही माथेरनच्या मुलांना आपल्यापरीनं कशी मदत करता येईल ते पहावं.रावते साहेब हेल्मेट बाबत जेवढे आग्रही आहेत  तेवढे गाव तिथं एसटी खरोखरच जाते काय याबाबत फारशे आग्रही दिसत नाहीत.माथेरान हे  देशाच्या पर्यटन नकाशावरील एक प्रमुख स्थळ आहे.माथेरान साऱख्या ठिकाणी ही बोंब असेल तर अन्य गावांबाबत विचारायलाच नको.तेव्हा झालं ते पुरे झालं आता तरी एस.टी महामंडळ आणि शिक्षण विभागानं तातडीनं माथेरानच्या मुलांना एस.टी.ची सोय  मिळवून देण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा आहे.या ग्रुपमधील सर्व पत्रकार मित्रांना विनंती की,माथेरानच्या मुलांची ही व्यथा दिवाकर रावते यांच्या कानावर घालणे ज्यांना शक्य आहे त्यांनी ती घालावी आणि मुलांना न्याय मिळवून द्यावा –एस.एम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here