मराठे भिडले…

0
891

गेली दोन दिवस प्रसिध्द होत असलेले जनमत सर्वेक्षणाचे निकाल बघा,ते युतीला अनुकूल आहेत.महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला मिळणाऱ्या जागा आणि मतांच्या टक्केवारीत फेब्रुवारी-मार्चच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं  जे अंदाज येत आहेत त्यावरून दिसते आहे.मोदींची लोकप्रियताही वाढली आहे.तुलनेत महाराष्ट्रात आघाडीची दमछाक होताना दिसतेय.आता पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ आल्यानं या परिस्थितीत बदल व्हायची शक्यता नाही असं सर्वे घेणाऱ्या संस्था सांगतात.मतदारांच्या मानसिकतेतील हा बदल युतीचा प्रचार योग्य दिशेनं सुरू असल्याचं दाखविणारा ,आघाडीसाठी धोक्याची घंटा वाजविणारा आहे जे अंदाज व्यक्त होत आहेत त्यात राष्ट्रवादी आणि मनसे सपाटून मार खाणार असल्याचं समोर येत आहे.. त्यामुळं शरद पवार आणि राज ठाकरे यांची अस्वस्थतः आणि काळजी वाढल्याचं दिसतंय.येणाऱ्या काही दिवसात नवीन आणि वादग्रस्त विषय उकरून काढले नाही तर आपली खैर नाही हे एव्हाना दोघाच्याही  ध्यानात आलंय.त्यातूनच त्यांची उलट-सुलट आणि संभ्रमात टाकणारी-वैचारिक गोंधळ उडवून देणारी विधानं येत आहेत. – शरद पवार गोबेल्सचे पितामह शोभतील अशा पध्दतीनं या तंत्रात माहिर असल्यानं ते वारंवार दाखवून देत आहेत. त्यांची गेल्या आठ दिवसातली विधानं नुसता गोंधळ उडवून देणारी आणि परस्पर विरोधी आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तुलना करून ते असाच गोंधळ उडवून देऊ पहात आहेत”.राज ठाकरे याचं खंबीर नेतृत्व आहे,त्यांनी स्वकष्टानं सारं उभं केलंय,आणि उध्दव यांना सारं रेडिमेड मिळालंय तेही त्यांना धड सांभाळता येत नाही” असं पवार आज बोलताहेत. दोन ठाकऱ्यांमध्ये कोण डावा-कोण उजवा  असा प्रश्न त्याना पत्रकारांनी कधी विचारला नाही तरीही ते असं बोलत असतील तर तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे हे नक्की.सर्वानाच आठवते की,काही दिवसांपूर्वीच पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावताना “पक्ष वाढविण्यासाठी किंवा जनतेची कामं करण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं” असा सल्ला दिला होता. आज राज ठाकरेंमध्ये काय बदल झाला की,किंवा फार तर राज ठाकरेंनी पवारांवर कोणती जादू केली की  ते पवारांना उध्दवच्या तुलनेत सरस वाटायला लागले.? राज सकाळी लवकर उठू लागले की, आणखी काही घडले ?.शरद पवारांच्या विचारात झालेला हा बदल उगीच झालाय असं आपणास वाटतंय का?तसं अजिबात नाही.हे जाणीवपूर्वक सुरू आहे.युतीच्या कॅम्पमध्ये गोंधळ उडवायचा परस्परांबद्दल संशयाचं वातावरण तयार करायचं,त्यांच्यात भाडणं लावून आपली पोळी भाजून घ्यायची हे यामागंच इंगित  आहे.गेल्या चार दिवसात ज्या घडामोडी महाराष्ट्रात घडताहेत त्या बघितल्या तर शरद पवारांचे ” उडवा गोंधळ”  हे तंत्र यशस्वी होताना दिसतंय.शिवसेना आणि मनसे परस्परांच्या ँअंगावर जावू लागले आहेत.राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे परस्परांचा ज्या भाषेत उल्लेख करीत आहेत आणि रस्त्यावर उतरून ज्या पध्दतीनं राडेबाजी करीत आहेत ती बघ ता शरद पवार यांना हवं ते व्यवस्थित घडतंय असं म्हणायला पुरेसा वाव आहे.शरद पवार यांनी राज ठाकरे यांचं तोंडभरून कौतूक करणं,राज ठाकरेंनी केवळ उध्दव ठाकरेेंवरच हल्ला चढवणं आणि त्याच वेळेस राष्ट्रवादी किंवा कॉग्रसेवर टीका करायचं टाळणं किंवा हातचं राखूनच त्यांच्याबद्‌दल बोलणं ,बाळासाहेबांच्या अखेरच्या काळात त्यांचे खाण्यापिण्याचेही कसे हाल केले गेले हे किस्से सागून शिवसैनिकांच्या मनात उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अढी  निर्माण करणे या साऱ्या घडामोडी परस्पर सुसंगत वाटत नाहीत ? नक्कीच या साऱ्यांमागं एक संगती आहे.शरद पवार यांच्या पक्षाची आणि आघाडीची लोकप्रियता जशी घसरत गेली आहे त्याच पध्दतीन राज ठाकरे यांच्या पक्षाची लोकप्रियताही घसरत गेल्याचं सर्व्हे सांगतात.राज ठाकरेंच्या सभांना जरूर ग र्दी होते पण या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर कऱणं राज ठाकरेंना शक्य नाही असं पोलच्या निष्कर्षातून समोर येतंय.अशा परिस्थितीत त्यांनाही लक्ष डायव्हर्ट करणारे मुद्दे पुढं आणणं आवश्यक आहे.त्यातूनच बाळासाहेबांना घरातून कसे तेलकट  वडे दिले जायचे आणि आपण त्यांना कसे सूप पाठवायचो याच्या आठवणी ते जाहीर सभांमधून जागवत आहेत..यानं मूळ मुद्यापासून लोकाचं लक्ष अन्यत्र वेधलं जाईल आणि त्याचा शिवसेनेच्या मतांवर परिणाम होईल ही राज याची स्टॅटेजी दिसते.ती यशस्वी होईल अशी शक्यता आज तरी दिसत नाही.कारण बाळासाहेबांना त्यांनी पाठविलेलं सुप आणि आजारी असलेल्या उध्दवला भेटायला जाण हे सारे त्यांनी केलेले उल्लेख महाराष्ट्रात कोणालाच आवडलेले नाहीत.सोशल मिडियावर बुधवारपासून याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या अनेक पोस्ट टाकल्या जात आहेत.शत्रू आजारी असेल तर त्यालाही भेटायला जायची आपली परंपरा  आणि संस्कृती आहे,अशा स्थितीत उध्दवच्या  भेटायला गेल्याचं भांडवल राज ठाकरे यांनी करायला नको होतं असंच सामांन्य मराठी माणसांना वाटतंय.त्यामुळं उध्दव ठाकरेंना कात्रजचा घाट दाखविण्याच्या नादात राज ठाकरेच खैबर िंखडीत अडकत चाललेल असं नक्की म्हणता येईल.उध्दव ठाकरे यांनी हा विषय आता माझ्यापुरता संपला असं जाहीर करून राज यांची खेळी ओळखली असली तरी राज ठाकरे यांनी जाहीर केलंय की,हा विषय आपण 21 तारखेपर्यत पूरवून पूरवून वापरणार आहोत.तसं खरोखरच झालं तर त्याचा फायदा राज ऐवजी उध्दवलाच मिळेल यात शंकाच नाही.कारण अगोदरच केवळ  शिवसेना उमेदवारांच्या विरोधातच  उमेदवार उभे करण्याचं राज ठाकरे यांचं धोरण मराठी मनाला आवडलेलं नाही.त्यात आता अगदी खाजगी गोष्टी सांगून राज ठाकरे स्वतःची पत कमी करून घेत आहेत असं दिसतंय.परंतू या साऱ्यामागं पवार यांचं  नियोजन आहे,हे भाजपच्या नरेद्र मोदी कॅम्पच्या लक्षात आल्यानं त्या दोघांना काय भांडायचं ते भांडू द्या त्यांच्या भानगडीत तुम्ही पडू नका असा सल्ला प्रदेश भाजपला देण्यात आला आहे.कारण दोन्ही भावंडांवरून भाजपमध्ये देखील विभागणी झालेली आहे.नितीन गडकरी यांना राज ठाकरेंचा पुळका आलेला आहे तर गोपीनाथ मुंडे हे उध्दव ठाकरेंची पाठराखण करताहेत.पुण्याच्या सभेत गोपीनाथ मुंडेंची राज यांनी नक्कल केली पण गडकरींना पुलं बांधणारा,मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तयार कऱणारा एक चांगला माणून असं प्रशस्तीपत्रक दिलं आहे.त्यानंतर गोपीनाथ मुंडेही राजच्या विरोधात काही बोलले.हे कलगीतुरे अंगावर घेणं भाजपला परवडणारं नसल्यानं आपण त्यांच्या भानगडीत पडायचं नाही हे जर त्यांनी ठरवलं असेल तर ते योग्यच आहे असं म्हणावं लागेल.

 प्रश्न असा आहे की,दोन मराठ्यांमध्ये सुरू झालेला वाद कसा थांबवायचा.? हा वाद सुरू ठेवण्यातच राज यांचा स्वार्थ असल्यानं ते उध्दव विरोधाचं दळण दळतच राहणार आहेत.पण” यापुढं राज ठाकरेंच्या कोणत्याही वक्तव्याला प्रत्युत्तर न देणं आणि त्यांना काय बोलायचं ते बोलू देणं हेे उध्दव ठाकरेंचे यापुढंच धोरण असलं पाहिजे”.यात त्याचं हित आहे.राज ठाकरेंचा आज एकमेव प्रबल शत्रू शिवसेना आहे. अन्य सारेच पक्ष त्यांचे मित्र तरी आहेत किंवा त्यांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत तरी करतात.उलट शिवसेनेला अनेकजण घेऱण्याच्या प्रयत्नात आहेत.त्यात राष्ट्रवादी आहे,कॉग्रेस आहे आणि मित्रपक्ष असलेला भाजपही आहे.राज ठाकरेंचा खांदा वापरून हे सारे शिवसेना संपवायला नि घाले आहेत.कारण त्यांना आजच्या घडीला भिती मनसेची नाहीच.ती आहे शिवसेनेचीच.शिवसेना या चार शब्दातली जादू आजही मराठी मनावर गारूड करीत आहे हे शरद पवारांपासून नितीन गडकरींपर्यत साऱ्यांनाच माहित आहे.त्यामुळं शिवसेनेच्या विरोधात ते मनसेला बळ देण्याचा प्रयत्न करीत असतात.नितीन भाऊंनी नाशिकच्या कार्यक्रमास हजेरी लावणं,कृष्णकुंजवर जाऊन भेटणे आणि त्यानंतर मनसेने केवळ शिवसेनेच्याच विरोधात उमेदवार उभे करणे किवा शरद  पवार यांनी उद्धववर टीका करणे  या साऱ्या गोष्टी शिवसेनेला घेरण्याच्याच कार्यक्रमाचा एक भाग आहेत हे लक्षात येण्यासाठी राजकारणाची फार मोठी जाण असली पाहिजे असं नाही.एका बाजुला राज यांनी नरेंद्र मोदींनाच आपला पाठिबा राहिल असे जाहीर करीत भाजपची मतंही आपल्या उमेदवाराकडं खेचायचा प्रयत्न करायचा आणि त्याच वेळी एनडीएचा घटक असलेल्या शिवसेनेचे उमेदवारांना पराभूत करण्यासाठी सारी ऱणनिती आखायची हे गणित जनतेच्या लक्षात येत नाही असं थोडच आ

हे.? भाजपचा हेतू स्वच्छ आहे.”जो जितेगा हम उसके साथ रहेंगे” हे भाजपचं धोरण आहे.मनसे जिंकली तर गडकरीच्या माध्यमातून मनसेला बरोबर घेणं अवघड नाही.शिवसेना जिंकली तर गोपीनाथरावांच्या माध्यमातून “झालं गेलं विसरून जा ” चे नारे द्यायला भाजप मोकळा.हे दोन्ही ऑप्शन खुले राहावेत आणि प्रचारातील एकाग्रता खंडित होऊ नये म्हणूनच ठाकरेंच्या भाऊबंदकीत पडू नका असा सल्ला आता स्थानिक भाजपला दिला गेलेला आहे.त्यामुळं दोन बंधूंमधील वादावर आता भाजपचे नेते काही भाष्य करतील,तो मिटविण्याचा प्रय़त्न करतील  अशी शक्यता अजिबात  नाही.परंतू आघाडीचे नेते ही गंमत बघत बसणार,प्रसंगी त्यात तेल ओतत राहणार.कारण या दोन पक्षात जेवढी मतविभागणी होईल तेवढा आघाडीचा लाभ होईल हे स्पष्ट आहे.

उध्दव आणि राज याच्यातील भांडणाचा कोणाला कसा फायदा होईल हे 16 मे नंतर दिसणार असलं तरी या वादात मराठी माणसाचंच खरं नुकसान होताना दिसतंय.मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या हिताची भाषा कऱणाऱ्या या दोन्ही पक्षांना मराठी माणसाशी काही देणं-घेणं नाही हे समोर येतंय .गुरूवारी मुंबईत दोन्ही बाजुचे मराठा वीर परस्परांवर तुटून पडले होते.मराठी-मराठी करीत ज्यांनी आयुष्यभर  या पक्षांना मत दिली त्यांना  मुंबईतील तमाशा पाहून काय वाटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी.मराठी माणसाला दुहीचा शाप आहे.पेशवाईपासून हेच घडत आलंय.दोन मराठी राजांना झुंजवत ठेवत कधी औरंगाजेबने तर कधी इंग्रजांनी आपल्यावर मनसोक्त राज्यं केलं.ती परंपरा खंडित होऊ द्यायची नाही अशी शप्पथच उध्दव आणि राज ठाकरेंनी घेतली असेल आणि समोरच्याचा राजकीय गेम करण्यातच आपले अस्तित्व आहे असेच जर दोन्ही बाजुंना वाटत असेल तर हे वाद थांबविणं कोणालाच शक्य नाही.बाळासाहेब असतानाच हे दोन भाऊ भांडत होते आज तर बाळासाहेबांचा धाक नाही त्यामुळं हे सार ंथांबवा असं म्हणणारं कोणी नसल्यानं हे थांबणं शक्य नाही.सामान्य मराठी माणसाला हे पटत नसलं तरी या दोघातील भांडणातच ज्यांचे हितसंबंध आहेत अशी मंडळी  ही भांडणं थांबवू देणार नाहीत..हे थांबलं तर आपलं पानिपत ठरलेलंय हे शरद पवार,पृथ्वीराजजी ,आणि नितीनभाऊंनाही माहित आहे.

 एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here