मिडिया बदनामीची राजकीय नीती

पनवेलमध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.रायगडमध्ये शिवसेनेचेे दोन खासदार आहेत,दोन आमदार आहेत,जिल्हा परिषदेत 18 सदस्य आहेत,दोन नगरपालिका आणि काही ग्रामपंचायती ताब्यात असताना पक्षाला जर पनवेलसाऱख्या मुंबईच्या प्रवेशव्दारी एकही जागा मिळाली नसेल तर पत्रकारांनी या घटनेचं  कसं विश्लेषण  करायचे ? एका वाहिनीनं पनवेलमध्ये शिवसेनेचा सुपडासाफ असं म्हटलंय.ते एका कार्यकर्त्याला झोंबलं म्हणून  त्यांनी मिडियाबद्दल टाहो फोडला आहे.भाषा तीच नेहमीची, मिडिया विकला गेल्याची.मिडियावर पक्षपातीपणाचा आरोप करताना हे का विसरले जाते की, राज्याची सत्ता एकहाती ताब्यात घेण्याची स्वप्न पाहणार्‍या शिवसेनेला पनवेलमध्ये एकही जागा मिळाली नसेल तर पत्रकारांनी बरं झालं,छान झालं असं म्हणावं काय ? कळत नाही.आपले नेते आणि त्यांचे कार्यकर्ते पत्रकारांच्या बाबतीत हल्ले एवढे संवेदनशील झालेत की,प्रत्येक शब्दाचा ते कीस पाडत असतात.या मंडळीची अपेक्षा तरी काय आहे ?,बातमी छापताना त्या बातम्या त्यातील शब्द रचना या लोकांना दाखवून घ्यावी काय ? किंवा राज्यात रामराज्य आहे असे छापावे ?गंमत अशी की , पत्रकारांबद्दल उठसुठ आक्षेप घेणारे दिलीप कांबळे किंवा रावसाहेब दानवेंच्या वक्त्यवाकडं सोयीस्कर कानाडोळा करतात.शेतकर्‍यांना साले म्हटलेलं हे यांना चालतं कस ? ,पत्रकारांना जोडयानं मारीन म्हणताना इथं काय मोगलाई आहे काय ? असं विचारायची हिंमत एकही कार्यकर्ता का दाखवत नाही? .कांबळेंनं असं बोलायला नको होतं पण त्यांच्या विधान चुकीचं नाही’ अशी जर-तर भाषा का वापरली जाते ?.थेट कांबळे यांचा निषेध का केला जात नाही ? कांबळे -दानवेंच्या वक्तव्याबद्दल मौन बाळगून ही मंडळी कोणते हितसंबंध जपतात ते नाहीत सांगत,पत्रकार समाजाचा घटक असेल तर समाजव्यवस्थेतील काही दोष काही पत्रकारांमध्ये येणारच पण त्यावरून बाकी सारं आलबेल आहे आणि पत्रकारचं बिघडेल असा जो समज करून घेतला जात आहे आणि दिला जात आहे तो आक्षेपार्ह आणि चुकीचा आहे.त्यामुळं केवळ माध्यमंच बदनाम होणार नाहीत तर लोकशाहीसमोरही मोठे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात.माध्यमांची विश्‍वासार्हता संपली तर समाजाचा कोणावरही विश्‍वास राहणार नाही ( तो आजच बर्‍याच अंशी उरलेला नाही) त्यामुळं आपण मिडियाला झोडपून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ खिळखिळा करू पाहतो आहोत याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातंय.माध्यम विरोधी भूमिका घेऊन बदनामीची मोहिम उघडणारे सामांन्य नागरिक नक्कीच नाहीत ही सारी हितसंबंधी मंडळी आहे आणि त्यांचे हितसंबंध कधी ना कधी माध्यमांमुळं धोक्यात आलेले आहेत. .सर्वसामांन्य माणसांना आजही माध्यमं आपला एकमेव आधार वाटतात.माध्यमं स्वतंत्र नसती तर या देशात काय घडलं असतं सांगता येत नाही असेही त्यांना वाटते.लोकांना जो घटक आपला आधार वाटतो त्यालाच वेगवेगळ्या पध्दतीनं विकलांग करून लोकांना निराधार करण्याचं कारस्थानही माध्यम विरोधी मोहिमेमागं आहे. वेगवेगळ्या पध्दतीनं माध्यमांवर अंकुश आणून वास्तव समाजापासून कसे लपविता येईल याचा प्रयत्न होतोय.दिलीप कांबळेंची भाषा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. छोटया वर्तमानपत्रांच्या जाहिराती बंद करून त्यांना मोडित काढण्याचा होत असलेला प्रयत्न,मिडाया ठराविक भांडवलदारांच्या हाती देऊन त्यावर सरकारी नियंत्रण ठेवण्याचा चाललेला खटाटोप ( रिलायन्सच्या ताब्यात 36 चॅनल्स आहेत हे लक्षात घ्या ,भविष्यात काय वाढून ठेवलंय हे यावरून दिसेल) रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपरचे नियम अधिक कडक करण्याचा होत असलेला प्रयत्न, काम नव्हे तर तोंड बघून अधिस्वीकृतीपत्रिका देण्याचा होत असलेला प्रयत्न चिंताजनक आहे.लोकांनी याविरोधात बोललं पाहिजे.माध्यमाचं शुध्दीकरण झालं पाहिजेच पण भांडवलदारी मिडिया घराणी पत्रकारांची कशी पिळवणूक करतात हे समजून घेणे देखील जरूरीचे आहे.आणि त्यासाठी समाजानं पत्रकारांच्या पाठिशी देखील उभे  राहिलं पाहिजे.उपाशीपोटी असणार्‍यांना तत्वज्ञान सांगून उपयोग नसतो.ते होत नाही फक्त पत्रकारांवर आरोप करून आपला कंडू शमविण्याचा उद्योग केले जातात.यामागे समाजहिताचं काहीच नाही,आपले हितसंबंध धोक्यात येऊ नयेत याची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे.त्यामुळं मी मिडियाला घाबरत नाही अशी विधानं केली जातात.मिडियाला कोणीच घाबरू नये असं आम्हाला वाटतं जे बदमाश,लफंगे आहेत तेच घाबरतात जे स्वतःला सत्वशील समजतात अशानी मी मिडियाला घाबरत नाही म्हणण्याचंही काहीच कारण नाही.

 राजकारण्यांना आपल्याला सोयीच्या हव्या तशा आणि तेवढयाच बातम्या याव्यात असं वाटतं.विरोधकाचं नावही बातमीत आलं तरी ते याला पाकिट पत्रकारिता संबोधतात.हे चालणार नाही आणि कोणताही पत्रकार ते मान्य करणार नाही.हे मान्य नसणारा पत्रकार मग बदमाश, पाकिट बहाद्दर वगैरे वगैरे ठरतो.हल्लीचा हा शिरस्ता आहे.कांबळेसाहेब एक खरं बोलले की,पत्रकार कोणाचेच नसतात,ना ते भाजपचे असतात ना ते कॉग्रेसचे.कारण त्यांची बांधिलकी राजकारण्यांशी नव्हे तर समाजाप्रती असते.,त्यामुळे  विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा एसी लिमोझिनमधून सुरू असताना त्यावर अगोदर भाजपनं नाही मिडियानंच आवाज उठविला.विरोधकांच्या विरोधात माध्यामधून राळ उठविली जात होती तेव्हा सत्ताधारी भाजपला गुदगुल्या होत होत्या.तेव्हा मिडिया विकला गेलाय असं त्यांना  वाटत नव्हतं.तेव्हा विरोधकांना तसं वाटत होतं कारण या बातम्यांमुळं त्यांची संघर्षयात्राच एक ढोंग ठरत होती.मिडियाला सोयीनुसार मित्र आणि सोयीनुसार शत्रू केले जाते.हे चित्र सर्वत्र आणि सर्रास दिसते.
 पाकिटं दिली की पत्रकार वाट्टेल ते छापत असतील आणि शिवार संवाद यात्रेच्या विरोधात ज्या बातम्या येतात त्या पाकिटं देऊन दिल्या जातात अशा कांबळे मजकुरांचा समज असेल तर मग लिमोझिनच्या बातम्याही काही फुकट आलेल्या नसतीलच ना ? लिमोझिनच्या बातम्या छापण्यासाठी भाजपनंही पत्रकारांना नक्कीच पाकिटं दिली असतील,ती किती दिली आणि कोण कोणत्या पत्रकाराला दिली हे भाजपनं जाहीर केलं पाहिजे.यावर एकही राजकारणी बोलणार नाही कारण कोणीही कोणाला पाकिटं दिलेली नाहीत.हे आरोप करणारेही जाणतात पण पाकिटं देऊन बातम्या छापल्या म्हटलं की,त्या बातमीचं महत्व कमी होतं,बातमीबद्दल जसा संशय निर्माण होतो.संबंधित बातमी देणार्‍या पत्रकाराच्या विश्‍वासार्हतेबद्दलही प्रश्‍नचिन्ह निर्माण होतं.एकदा संशय निर्माण झाला की,बातमीची सत्येताच धोक्यात येते.हे राजकाऱण्यांना ज्ञात असते.पत्रकारांना शिव्या देऊन बातमीच्या सत्येतेबद्दलच शंका उत्पन्न केली की,समाज,वाचक दुसर्‍या अंगानं बघायला लागतता.मुखय विषय मग बाजुला राहतो.दुसर्‍याच विषयावर चर्चा होते.असं झालं की,आरोप करणारांचा हेतू साद्य होतो.असे आरोप करून कारवाई काहीच होत नाही हे संबंधितांना माहिती असते.पत्रकारांना बुटानं मारले पाहिजे असं म्हटल्यानं देवेद्र फडणवीस दिलीप कांबळेंना मंत्रिमडळातून काढणार नक्कीच नाहीत,पण शिवार संवादच्या जो फॉलेोअप येणं अपेक्षित होतं तसं न घडता कांबळेंच्या धमकीलाच वर्तमानपत्रांनी महत्व दिलं.ते स्वाभाविकही आहे.पण त्यामुळं कांबळेचा उद्देश मात्र सफल झाला.फुकटची प्रसिद्दीही मिळाली आणि मुळ बातम्याही मागं पडल्या. म्हणून  जाणीवपूर्वक असे आरोप पत्रकारांवर केले जातात किंवा राजकारण्यांना ते करावे लागतात..या वृत्तपत्रीय नितीचं अनुकरण दोन्ही बाजून  प्रसंगानुरूप इमाने-इतबारे होत असते .शिवाय मिडियावर पाकिटगिरीचे आरोप करणारे हे का विसरतात की,लाच घेणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच लाच देणाराही गुन्हेगार आहे.म्हणजे पाकिट घेणारे आणि देणारेही समान गुन्हगार आहेत मग एकाच घटकाला का बदडलं जातंय.शिवाय पाकिटं देऊन भाजपच्या विरोधात बातम्या दिल्या जात असतील तर अशी पाकिटं देणारे कोण आहेत आणि ते घेणारे कोण आहेत याचा शोध सत्ताधारी भाजपनं आपल्या यंत्रणेतर्फे घेऊन दोन्हीवर कारवाई करावी की,पण एवढं खोल गेलं तर राजकारण्यांचंच पितळ उघडं पडेल .त्यापेक्षा आरोप करून पत्रकारांना बदनाम करता येतं आणि सवंग प्रसिध्दीही मिळविता येते हा दुहेरी फंडा अशा आरोपांमागे असतो.म्हणजे केवळ आणि केवळ मतलबी मंडळी सोयीनुसार पत्रकारांच्या विरोधात बोंबा मारत असते.अशा मतलबी मंडळीची ही थेरं पुर्वी चालायची.आता ती खपवून घेतली जाणार नाहीत.हे संबधितांनी लक्षात ठेवावं.पत्रकारांवर हल्ले झालेत म्हणून राज्यातील एकही पत्रकार घरी बसलेला नाही.त्यामुळं भलेही कांबळेंनी बुटानं मारण्याची भाषा केली असली तरी अशा सडकछाप भाषेचा पत्रकारांवर काहीच परिणाम होणार नाही.असे धमक्या देणारे किंवा हल्ले करणारे कालौघात नामशेष झाले.माध्यमं मात्र अधिक मजबूत झाली आहेत.हे कांबळे यांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here