8 मे 2016.सकाळी सात वाजता माथेरानची मिनिट्रेन माथेरान स्थानकातून नेरळकडं रवाना झाली.मात्र अमन लॉजच्या थोडं पुढं गेल्यानंतर रेल्वेचे दोन डबे रूळावरून घसरले,काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या.झालं,सुरक्षिततेचं कारण देत सांगत माथेरान स्थानकात मध्य रेल्वेनं एक फलक लावला,पुढील आदेश होईपर्यंत माथेरानची मिनिट्रेन बंद केली जात आहे. या घटनेला आज बरोबर एक वर्षे पूर्ण झालं.रेल्वे सुरू करण्याचा आदेश अजून आलेला नाही.माथेरानची रेल्वे ही केवळ माथेरानची वाहतूक व्यवस्था नाही तर माथेरानची लाईफ लाईन आहे.माथेरानचा पर्यटन व्यवसाय या रेल्वेवर अवलंबून आहे हे वर्षभरात दिसून आलं आहे.माथेरान रेल्वे बंद पडल्यापासून माथेरानच्या पर्यटनाला मोठाच फटका बसला आहे.
सर आदमजी पीरभॉय यांनी 1907 मध्ये माथेरान रेल्वे सुरू केली.मात्र दोन अपघात झाल्यानं ही रेल्वे बंद केली गेली.रेल्वे पुर्ववत सुरू व्हावी यासाठी स्थानिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी अनेकदा प्रयत्न केले.आश्वासनंही दिली गेली,पाहणी झाली तरीही माथेरानच्या जंगलात शीळ घालत डौलानं धावणारी माथेरानची राणी अजूनही यार्डातच विश्राम घेते आहे.गाडी कधी सुरू होईल,होईल की नाही याचीही माथेरानकरांना माहिती नाही.गाडी लवकर सुरू करावी एवढीच माथेरानकरांची इच्छा आणि मागणी आहे.ःः
शोभना देशमुख माथेरान -रायगड