रायगड वार्तापत्र

0
892

 

रायगडमध्ये निसर्ग फुलला ..

वासुदेव बळवंत फडके यांच्या वाडयाल नवी झळाळी.

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा

अलिबागेत अंनिसची रॅली 

 रायगडमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

श्रावण मासी,हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येती सरसर शिरवे,क्षणात फिरूनी उन पडे

बालकवीच्या या कवितेतील वर्णनाप्रमाणेच सध्या रायगडचे वातावरण आहे.हिरव्यागार भात पिकांनी सारा शिवार डोलतो आहे.डोंगर माथ्यावरून कोसळणारे पाणी डोळ्याचे पारणे फेडत आहे.अधुन-मधुन पडणारा रिमझिम पाऊस आणि मध्येच होणारे सुर्याचे दर्शन मनाला आगळा आनंद प्राप्त करून देत आहे.निसर्गाचा हा अनोखा देखावा अनुभवण्यासाठी सुटीच्या दिवशी रायगडात पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी येत आहेत.खरं तर रायगडात यंदा सरासरीच्या केवळ 49 टक्केच पाऊस झाला आहे.आणखी 51 टक्के पावासाची गरज आहे.दरवर्षी रायगडमध्ये सरासरी 3,142 मिली मिटर पावसाची नोंद होते,मात्र 20 ऑगस्टपर्यत जिल्हयात केवळ 1518 मिली मिटरच पावसाची नोद  झाल्याने अजून 51 टक्के पावासाची उणिव जाणवते आहे.आता ऑगस्ट महिना संपत आला असून नारळी पोर्णिमेनंतर पावसाला ओहोटी लागते.त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठेल की नाही याबद्दल शेतकरी साशंक आहेत.अर्थात पाऊस कमी पडला असला तरी भाताची लावणी झाली असून पाटबंधारे विभागाचे 28 प्रकल्प पूर्ण भरले आहेत.पिकंही चागली आहेत.जिल्हयात जवळपास एक लाख 15 हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड झाली आहे.त्यामुळं सारा शिवार हिरवागार झाला आहे.हिरवी शेतं,डोंगर माथ्यावरून कोसळणारे पाण्याचे शुभ्र खळाळ,आणि मधुनच येणार्‍या पावसाच्या सरी यामुळं रायगडमधील वातावरण आल्हाददायक बनलं आहे.विविध रंग-रूपांनी रायगडचा निसर्ग आपले स्वागत करताना दिसतो आहे.

वासुदेव बळवंत फडके यांच्या वाडयाल नवी झळाळी.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण येथील ऐतिहासिक वाडयाला 1 कोटी 73 लाख रूपये खर्च करून नवी झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित संग्रहालयाच्या उभारणीचे काम सुरू होत आहे.पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे फडके वाडा आहे.मात्र दोडशे ते पावनेदोनशे वर्षांपूर्वीचा हा वाडा जीर्ण झाला होता.अनेक ठिकाणी त्याची पडझड झाली होती.त्यामुळे वाड्याचे पुनरूज्जीवन करावे अशी स्थानिकांनी मागणी लाऊन धरली होती.अखेर सरकारने याची दखल घेतली आणि पावने दोन कोटी रूपये खर्च करून वाडयाची डागडुजी करण्यात आली.वाड्याच्या बांधकामासाठी चुना,मेथी,गुळ तसेच बेल फळाच्या मिश्रणातून वाड्याच्या भिंती उभ्या कऱण्यात आल्या आहेत.लाकुडकामासाठी सागाचा वापर केला गेला आहे.वाडयाच्या सभोवताली सुंदर बगीचा तयार करण्यात येत असून नवी झळाली मिळालेला फडके वाडा आता पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.वाड्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता संग्रहालयाचे काम हाती घेण्यात येत असून पुरातत्व विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.वाडयाच्या परिसरात फडके यांचा पुतळाही उभारण्यात येणार आहे.संग्राहलयात वासुदेव बळवंत फडके यांचा जीवनपट रेखाटला जाणार आहे.स्वातंत्र्य लढ्याती त्यांची भूमिका,कर्तृत्व,चरित्र,त्यांच्या आवडीनिवडी,आदिंची माहिती संग्रहालयात चलचित्राच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे.फडकेंचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून अरूण कारेकर हे शिल्पकार हा पुतळा तयार करीत आहेत.पुरतत्व विभागाचे अधिकारी संजय पाटील यांनी नुकतीच वाड्याला भेट देऊन या ठिकाणची पाहणी केली.जिल्हा परिषदेने संग्रहालयासाठी दहा लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.—

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने नुकताच रायगडचा दौरा करून सर्व संबंधित यंत्रणाची संयुक्त बैठक घेऊन मार्गदर्शन केले.अनुसुचित जमातीसाठी असलेल्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून त्या शेवटच्या घटकापर्यत पोहोचविणे आवश्यक आहे.त्यासाठी जिल्हयातील सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे अशी सूचना समितीचे प्रमुख आमदार रूपेश म्हात्रे यांनी बैठकीत केली. संपूर्ण राज्यात केवळ रायगड जिल्हयातच दळी जमिनीचा प्रश्‍न आहे.हा प्रश्‍न कालबध्द कार्यक्रम आखून जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी निकाली काढल्याबद्दल  समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.बैठकीस समितीचे सद्स्य तसेच जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अलिबागेत अंनिसची रॅली 

अधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला वीस ऑगस्ट रोजी दोन वर्षे उलटली असली तरी दाभोळकऱांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत.याचा निषेध करण्यासाठी अंध्रश्रध्दा निर्मुलन समितीच्या अलिबाग शाखेच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी शहरातून एक रॅली काढण्यात आली होती.रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर तेथे निवेदन देण्यात आले.त्यात दाभोळकर तसेच गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍याना त्वरीत शोधुन काढण्याची मागणी करण्यात आली.दाभोळकर आणि पानसरे यांच्या मारेकर्‍याना पकडण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल निवेदनात संतापही व्यक्त करण्यात आला आहे.रॅलीत नितीन राऊत डॉ अनिल पाटील,मोहन भोईर,निर्मला फुलगावकर ,संध्या कुळकर्णी आदि कार्येकर्ते सहभागी झाले होते.

 रायगडमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

भारतीय स्वातंत्र्याचा 68 वा वर्धापनदिन रायगडमध्ये उत्साहात साजरा करणयात आला.जिल्हयाची राजधानी असलेल्या अलिबागेत झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारली.यावेळी बोलताना प्रकाश मेहता यांनी रायगडने सर्वच क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.विहिरी,शेततळी,आदिवासी हक्क,जलशिवार योजना,महिला सुरक्षा आदि सर्वच क्षेत्रात रायगडने उल्लेखनिय कार्य केल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.मुरूडमध्ये जंजिरा किल्ल्याच्या साक्षीने किनार्‍यावर विद्यार्थानी कवायती क रून तिरंगा फडकविला.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं रायगडावरही ध्वजारोहण करण्यात आलं.-

– शोभना देशमुख अलिबाग-रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here