नानौकच्या अडथळ्यामुळं संपूर्ण कोकणातूनच पावसानं काढता पाय घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाले असून दुबार पेरण्याची वेळ त्यांच्यावर येणार अशी चिन्हं दिसायला लागली आहेत.किनारपट्टी भागात मान्सुनसाठी आवश्यक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्यानं पावसाची प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.रायगडात जून पहिल्या आठवड्यातच पावसाचं आगमन होतं.गेल्या वर्षीही वेळेत पाऊस आला होता.9 जून रोजी जिल्हयात 2712 मिली मिटर पावसाची नोंद झाली होती.आज 22 जून उजाडला तरी जिल्हयात 900 मिली मिटर पावसाची देखील नोंद झालेली नाही.जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दोन दिवस पाऊस झाला त्यावर विसंबून शेतकऱ्यानी धुळ पेरणी केली,रोपंही उगवली पण आता गेली आठ-दहा दिवस पावसाचा थेंबही न पडल्यानं रोपं जळून जात असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार आहे.दिवसभर पडणारे कडक उन्हं,सोसाट्याचा वारा आणि सापेक्ष आर्द्रता 95 वर गेल्यानं वाढलेला उकाडा याचा रोपांवर परिणाम झाला असल्याचं शेतकरी सांगतात.यंदा सरासरीच्या 93 टक्के एवढाच पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता तरी तो वेळेत पडेल अशी अपेक्षा व्यक्त करीत कृषी विभागानं यंदा 1 लाख 41 हजार 200 हेक्टर क्षेत्रात खरीपाच्या पेरणीचे नियोजन केलं होतं.गतवर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र 18 हजार हेक्टरनं जास्त आहे..यंदा 1 लाख 23 हजार 397 हेक्टरवर भात पिकाची लागवड कऱण्याचं उद्दिष्ठ ठरविण्यात आलं होतं त्यादृष्टीनं 17 हजार 242 क्विंटल बियाणे आणि 30 हजार 943 मॅट्रिक टन खत पुरवठ्याचंही नियोजन कऱण्यात आलेलं होतं.मात्र पावसानं दडी मारल्यानं भात लागवडी खालील क्षेत्रफळातही घट होण्याची भिती व्यक्त केली जात आङे.