मुंबई मराठी पत्रकार संघाने अलिकडेच नव्या काळाचं भान ठेवून पहिली वहिली डिजिटल मार्केटिंग कॉन्फरन्स आयोजित केली होती . अतिशय यशस्वी ठरलेल्या या परिषदेचा हा धावता आढावा
अगदी आत्ता आत्ता पर्यंत असं वाटत होतं की प्रिंट मिडियाची स्पर्धा इलेक्ट्रोनिक मिडियाशी आहे. पण गेल्या सुमारे दोन वर्षांत हे प्रकर्षाने जाणवू लागलाय की प्रिंट मिडियाची खरी स्पर्धा आहे ती सोशल मिडियाशी ! कोणतीही गोष्ट घडण्याचा अवकाश, ती ज्या वायू वेगाने सोशल मिडीयावर पसरते आहे. ज्या तऱ्हेने लोक त्याच्यावर अभिव्यक्त होत आहेत , त्यातून कोणत्याही प्रस्थापित नेतृत्वाशिवाय जनसामन्यांच्या ज्या चळवळी उभ्या राहत आहेत त्या बघता कुणालाच, अगदी प्रिंट मिदियातल्या पत्रकारांनाही त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीय. त्या माध्यमाला आत्मसात करून त्याचा सुयोग्य वापरच होईल हे पाहणे ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. त्रागा न करता आपण या माध्यमाकडे बघितलं पाहिजे याला अजूनही एक कारण आहे. त्यावर जे येतं, प्रसारित होतं त्यावर लोकांचा विश्वास बसतो आहे . याही बाबतीत एक काळ असा होता की पेपरात छापून आलं म्हणजे ते बरोबरच आहे असा लोकांचा दृढ विश्वास होता. आज ते स्थान सोशल मिडिया पटकावत चालला आहे. त्यामुळेच कुणाला आर्थिक मदत हवी असल्याची पोस्ट असो , कुणी मूल हरवलं असल्याची पोस्ट असो वा कुणाला रक्ताची गरज हवी असल्याची पोस्ट असो, ती ज्या वेगाने पसरते त्याचा अर्थच असा आहे की लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे आणि त्यामुळेच या मिडीयाकडे दुर्लक्ष न करता त्याची माहिती करून घेऊन त्यावर स्वार होण्याची गरज आहे .
नेमक्या याच भूमिकेतून ४ नोव्हेंबरला मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आपली पहिली वहिली डिजिटल मार्केटिंग कॉन्फरन्स आयोजित केली होती. ती पत्रकारांसाठी तर होतीच. पण त्याच बरोबर ती इतरांनाही खुली केल्याने अगदी डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटट, वकील आदि क्षेत्रातले लोकही त्याला उपस्थित होते. मुंबई पोलिसांच्या विशेष विभागाचे अधिकारीही त्याला उपस्थित राहिले आणि एवढंच नव्हे तर पोलिसांसाठीही अशी परिषद आयोजित करावी अशी विनंती त्यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे यांना केली. त्यांनी ती अर्थातच मान्यही केली. विशेष म्हणजे या परीषदेचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व आमदार श्री प्रवीण दरेकर यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी त्यांच्या बँकेच्या अधिकाऱ्यांना आवर्जून यात सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं. हा सर्वच थरातून लाभलेला प्रतिसाद बघता ही परिषद यशस्वी झाली हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच बरोबर या क्षेत्राची माहिती करून घेण्याची गरज समाजात किती आहे हेही यातून लक्षात आलं.
उद्घाटनाच्या भाषणात आ. प्रवीण दरेकर यांनी नेमकं हेच अधोरेखित केलं. ते म्हणाले, ‘ मुंबई बँकेसंबंधी जेव्हा वृत्तपत्रातून काही विपरीत बातम्या प्रसारित व्हायला लागल्या तेव्हा आम्ही एस एम एस च्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना वस्तुस्थिती सांगितली आणि त्या काळात आमच्या ठेवी कमी व्हायच्या ऐवजी ६० कोटींनी वाढल्या, त्याच वेळी आम्हाला या क्षेत्राची गरज जाणवली आणि आम्ही आता हा स्वतंत्र विभागच सुरु करायच्या प्रयत्नात आहोत. त्याच दृष्टीने मी माझ्या अधिकाऱ्यांना इथे पाठवलं आहे ’
ही गरज त्यांनाच नाही आता बहुतेक सर्वच आस्थापनांना जाणवू लागली आहे आणि सोशल मिडिया म्हणजे फक्त फेसबुक, ट्वीटर वा व्हॉटस अॅप नाही हेही लक्षात यायला लागलं आहे . या परिषदेत त्याचाच अनेक अंगांनी वेध घेण्यात आला. नुसते विषय व वक्ते यांची यादी पाहिली तरी तिचं स्वरूप किती सखोल होतं हे लक्षात येईल. पहिलाच विषय होता, मॉनेटायझेशन ऑफ द कंटेंट. आता कंटेंट म्हणजे केवळ लेख, ब्लॉग्स वा फोटो किंवा व्हीडीयो एवढंच नव्हे. तर कंटेंट म्हणजे प्रश्नोत्तरे, न्यूजजॅकिंग, अॅनिमेशन, व्हिडियो सेल्फीज, अगदी एफ बी लाइव सुद्धा! आता स्मार्ट फोन्सवरील अॅपमुळे भविष्यात लोक एफ बी लाइव वगैरे जास्त बघतील असं या विषयी माहिती देणारे श्री आनंदकुमार यांनी सांगितले. त्यांनीच गुगल सर्च इंजिन ऑपटीमायझेशन या विषयीही माहिती दिली, या व्यतिरिक्त अन्य विषय होते, इफेक्टव्ह ईमेल मार्केटिंग [ रेश्मा कोकणे- डिजिटल स्टॅटेजिस्ट, फिला इंडीया], क्रिएटीव्ह सर्विसेस इन अ टाईम ऑफ बिझिनेस ट्रान्सफॉरमेशन [ चिराग गँडर—को फाऊंडर-द मिनिमॅलिस्ट ] मेकिंग पेड अॅडस युअर मोस्ट व्हायेबल चॅनल [ आशिश दशरथी – को फाऊंडर- अरमॉक डिजिटल] व्हिडीयो मार्केटिंग सुपर पॉवर्स टू ग्रो युअर बिझिनेस [ अरुण प्रभुदेसाई -फाऊंडर ट्रॅक इन ] राईट युज ऑफ लीन्क्डीन अँड ट्विटर [ रितू डेव्हिड – सी ई ओ –द डेटा डक] राईट कंटेंट फॉर राईट प्लॅटफॉर्म [ श्रेनिक गांधी, सी ई ओ- व्हाईट रिव्हर्स इंडीया ] आणि शेवटी स्मार्ट फोन्स मुळे बदलत गेलेले जग [ मयूर मिलन – डायरेक्टर ऑरबीट डिजिटल ]
हे सगळेच वक्ते तरुण होते. श्रोते विविध क्षेत्रातले व विविध वयोगटातले होते. पण त्यांनी सगळ्यांना समजेल अशा भाषेत इतक्या बारीक सारीक तपशिलांसह विषय समजून सांगितले की दिवसभर नवीन विषय , नवीन माहिती कानावर पडत असूनही श्रोते जागीच खिळून राहिले. या परिषदेच्या यशस्वितेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री वाबळे यांची याच क्षेत्रात कार्यरत असलेली सुकन्या निकिता हिने जे परिश्रम घेतले त्याचे ही कौतुक करायला हवे
या वेळी ‘नया भारत’ या, फक्त विधायक न्यूज देणाऱ्या वेब साईटचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्या हस्ते झालं.
ते म्हणाले , ‘आता आरटीफिशियल इंटेलिजन्स सगळ्याचाच ताबा घेत चालला आहे . तंत्रज्ञानाचा हा अति जलद व थक्क करणारा विकास माणसाच्याच पोटावर पाय आणेल का , त्याने रोजगार जातील का या विषयी जगभर चिंता व्यक्त करण्यात येते आहे. पण मला वाटतं की तसं होणार नाही. कारण आता रोजगाराचं स्वरूप बदलत चाललं आहे. तुम्ही त्यासाठी १० ते ५ तुमच्या ऑफिसमध्येच जाणं आवश्यक नाही. उलट जास्त रोजगार या तंत्रज्ञानामुळे शक्य होईल. डिजिटल ही तर आपल्या देशातली गेम चेंजिंग टेक्नोलॉजी ठरते आहे . ‘’
हे खरंच आहे . या परिषदेत त्याचंच प्रतिबिंब पडलं आणि ते चिंता वाटावी असं नव्हतं तर अतिशय आश्वासक होतं!
–जयश्री देसाई
|