पत्रकारांचं खारघर आंदोलन यशस्वी 

0
1123

खारघरः स्वतःला सक्रीय पत्रकार म्हणवून घेणार्‍यांनी एका वरिष्ठ पत्रकारावरील हल्लयाचा निषेध कऱण्यासाठी आयोजित केलेलं आंदोलन हाणून पाडण्यासाठी साम,दाम,दंड,भेद आणि बदनामीचं मोठं कट-कारस्थान केल्यानंतरही पत्रकारा नी  आंदोलन यशस्वी करून पोटदुख्यांच्या पेकाटात सणसणीत लगावली. सुधीर सुर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला,डॉ.उदय निरगुडकर आणि विनोद यादव यांना दिल्या गेलेल्या धमक्यांच्या निषेधार्थ आजचं हे प्रातीनिधीक  आंहोलन होतं मात्र शेठ लोकांच्या पेरोलवर असलेल्या काही पोटदुख्यांनी आंदोलनाला अपशकुन कऱण्याचा निकराचा प्रयत्न केला.अगोदर आंदोलन करू नये म्हणून माझ्यावर राजकीय दबाव आणला गेला.ते शक्य होत नाही म्हटल्यावर सुधीर सुर्यवंशी यांच्यावर व्यक्तिगत कारणांवरून हल्ला झालाय असं सांगून पत्रकारांचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न केला तो ही आम्ही हाणून पाडल्यानंतर माझ्या बदनामीची मोहिम आखली गेली.त्याचंही बुमरँग अंगावर उलटलं.यासर्व पार्श्‍वभूमीवर आज खारघर येथे शॉर्ट नोटीसवर झालेलं आंदोलन शंभरावर पत्रकारांच्या उपस्थितीत दणदणीत झालं.( आंदोलन फसलं,दहा-पंधराच पत्रकार उपस्थित होते अशा पोस्टही मग आज टाकल्या गेल्या.मात्र फोटो खोटं बोलत नसतो.त्यामुळं सोबतच्या फोटोत जर दहा-पंधराच लोक दिसत असतील तर आम्हाला अंक शास्त्रातलं काही कळत नाही असा अर्थ जरूर घ्यावा ) पत्रकार हल्ला विरोधी कायदा झालाच पाहिजे,पत्रकारांना संरक्षण मिळालंच पाहिजे,( माझ्या पोटदुख्या मित्रांना न आवडणार्‍या एस.एम.देशमुख तुम आगे बढोच्या घाषणाही दिल्या गेल्या ) पत्रकारांवर हल्ले करणार्‍या आरोपींना कडक शासन झालेच पाहिजे,सुधीर सुर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याचा धिक्कार असो,उदय निरगुडकर विनोद यादव यांना धमक्या देणार्‍यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

खारघरमधील उत्सव चौकात साडेअकरा वाजता,रायगड,ठाणे,नवी मुंबई आणि मुंबईतुन शंभरावर पत्रकार जमा झाले आणि त्यांनी धिक्काराच्या जोरदार घोषणा देत निदर्शने केली.तासभर निदर्शनं झाल्यानंतर उपस्थितांपैकी अनेकांंची आपली मनोगतं व्यक्त केली.त्यांच्या बोलण्यातून पत्रकारांच्या प्रश्‍नांबद्दल जशी तळमळ दिसत होती तव्दतच पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबद्दल संतापही दिसत होता.मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे,टीव्हीजर्नालिस्ट युनियनचे प्रसाद काथे,हिंदी भाषक पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद यादव ,चंद्रकांत पाटील ,विकास महाडिक आदिंनी आपली मनोगतं व्यक्त केलं.प्रत्येकानं संतप्त भावना व्यक्त करतानाच याच अधिवेशनात कायदा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.माझ्या भाषणात सरकारनं दिलेलं आश्‍वासन पाळावं आणि याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी करतानाच सरकारनं शब्द पाळला नाही तर विविध संघटनांच्यावतीनं येत्या 1 मे रोजी वर्षावर राज्यातील पाच हजार पत्रकारांचा मोर्चा काढण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं.निदर्शन आंदोलनानंतर पत्रकारांचं एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना भेटले.सुधीर सुर्यवंशी यांच्यावरचा हल्ला पुर्वनियोजित होता आणि त्यांना जिवे मारण्याच्या इराध्यानंच हा हल्ला झाला होता त्यामुळं आरोपीवर लावलेले 326 कलम बदलून 307 कलम लावावे अशी मागणी केली.याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचं आश्‍वासन नगराळे यांनी दिलं.यावेळी परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल,संघटक अनिल भोळे,परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार,ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे,विधीमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण पुरो,चंदन शिरवाळे,ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील,नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावाला,यांच्यासह शंभरावर पत्रकार उपस्थित होते.

सुधीर सुर्यवंशी यांच्यावरील हल्ला,डॉ.उदय निरगुडकर आणि विनोद यादव यांना दिल्या गेलेल्या धमक्यांच्या निषेधार्थ बीड,हिंगोली,नाशिक तसेच राज्याच्या अन्य काही भागात जिल्हाधिकार्‍यांना निवेदने दिली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here