महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी रायगड जिल्हयात दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली असली तरी जिल्हयातील महिलांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण जराही कमी झालेले नाही.रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या तेरा तालुक्यात 2016 मध्ये विनयभंगाचे 101 प्रकार घडले आहेत तर बलात्काराच्या 49 घटना घडल्याचे पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीवरून स्पष्ट होते.मात्र यामध्ये उरण आणि पनवेल तालुक्याचा समावेश नाही कारण हे दोन तालुके नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत.गत वर्षी जिल्हयात 113 विनयभंग आणि 48 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या.तळ्यात तीन वर्षाच्या बालिकेवर झालेले अत्याचार आणि महाडमध्ये एका विधवेवर झालेले अत्याचार या अलिकडच्या घटना आहेत.महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असतील तर पोलिस यंत्रणा अधिक सक्षम करणे,महाविद्यालय,शाळा,बाजारपेठा आदि सार्वजनिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविणे,पोलीस मदत केंद्र स्थापन कऱणे आदि योजना आखता येऊ शकतात अशी सूचना नागरिक करीत आहेत.–