पारदर्शक कारभार,शिस्त आणि एकोपा ही मराठी पत्रकार परिषदेची कवचकुडलं आहेत.मराठी पत्रकार परिषदेला आम्ही आमचं कुटुंबं मानतो.कुटुंबात राग-लोभ,मतभेद असणं स्वाभाविक असलं तरी आपण आपली घरातील भांडणं रस्त्यावर आणून धोबीघाटावर ही धुणी धूत नाही.काही सदस्य मात्र याचं भान ठेवत नाहीत.आपल्याला हवं तसं किंवा आपल्या मनाविरोधात काही घडलं की,त्यांचा थयथयाट सुरू होतो ,आरोप -प्रत्यारोप केले जातात.अशी मंडळी चार-दोन असली तरी त्यामुळं संघटनेची शिस्त बिघडते.एकोप्याला तडा जातो.हे परिषदेला अजिबात मान्य नाही.ज्या सदस्यांना परिषदेची शिस्त मान्य नाही त्यांनी स्वतःहून परिषदेतून बाहेर पडले तरी हरकत नाही.मात्र शिस्त ही पाळावीच लागेल.
पुणे जिल्हा पत्रकार संघाचं आम्ही अभिनंदन यासाठी करतो की,ज्या सदस्यानी शिस्त मोडली आणि वरिष्ठांवर नाहक चिखलफेक केली अशा दोन सदस्यांची जिल्हा संघानं संघातून हकालपट्टी केली आहे.दत्तात्रय उभे आणि किसन बाणेकर अशी या दोन सदस्यांची नावे आहेत.मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं नुकत्याच पार पडल्या.देशात प्रथमच एखादया पत्रकार संघटनेच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं झाल्या.त्यामध्ये तांत्रिक अडचणी नक्कीच आल्या ,जसे लिंक मेसेज उशिरा पोहोचणे,लिंक लवकर ओपन न होणे आदि.मात्र आरंभी आलेल्या या अडचणी दुपारनंतर सुरळीत झाल्या.आणि बहुतेक सदस्यांनी आपला मतदानाचा हक्का बजावला.जे सदस्य असं सांगतात की,मला मेसेज मिळाला नाही,त्याला तो डिलेव्हरी झाल्याचा आणि त्यानं लिंक ओपन केल्याचा रिपोर्ट कॉम्प्युटरवर सेव्ह झालेला आहे.त्यामुळं हे खरं नाही.हे सारं झाल्यानंतर निवडणूक अधिकार्यांनी निकाल जाहीर केला.मात्र त्यानंतर दोन सदस्यांनी अत्ंयत असभ्य भाषेत वरिष्ठांबद्दल पोस्ट व्हायरल केल्या.या प्रकाराने संतप्त झालेल्या गणेश सातव यानी लेगेच कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.मात्र तो पर्याय नव्हता.दुसर्या दिवशी सर्वांनी एकत्र येत उभे आणि बाणेकर यांची संघटनेतून हकालपट्टी कऱण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
संस्थेपेक्षा कोणीही मोठा नाही आणि संस्था अशी बेशिस्त खपवूनही घेत नाही.हे पुणे जिल्हा पत्रकार संघानं दाखवून दिलं आहे.त्याबद्दल जिल्हा संघाचं मनापासून आभार.संघटनेची शिस्त मोडणार्या सदस्यांवर अशीच कारवाई ङोणे आवश्यक आहे.काही चुकत असेल तर त्यावर खुली आणि सभ्य भाषेत चर्चा व्हायला हरकत नाही.त्याचं परिषदेनें नेहमीच स्वागत केलं आहे.यापुढंही चर्चेसाठी सर्वांना परिषदेचे दरवाजे खुले असतील.मात्र अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही.सर्वांनी हे लक्षात घ्यावे आणि सहकार्य करावे.
अनिल महाजन
मराठी पत्रकार परिषद,मुंबई