अलिबाग-विरार मल्टी कॉरिडॉरमुळे परिसराचा चेहरा-मोहराच बदलणार
विरार,भिवंडी,कल्याण,डोंबिवली,पनवेल,तळोजा,आणि उरण या सात ग्रोथ सेंटर मध्ये विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देणारा आणि नवी मुंबई-ठाणे या टप्प्यातील वाहतूक कोंडी सोडविणार्या विरार – अलिबाग मल्टी कॉरिडॉर मार्गातील अडथळे आता दूर झाल्यानं हा मार्ग लवकरच मार्गी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.126 किलो मिटर लांबीच्या या मार्गासाठी 1300 हेक्टर जमिन संपादित करावी लागणार आहे.त्यातील 60 टक्के जमिन सिडकोची असून ती देण्याची तयारी सिडकोनं दाखविली आहे.सिडको आणि एमएमआरडीएच्या अधिकार्यांची एक बैठक मागील आठवडयात झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला त्यामुळं आता या मार्गातील 80 टक्के अडथळे दूर झाल्याचं समजलं जातंय.
विरार- अलिबाग या मल्टी कॉरिडॉर मार्गाचा आराखड 2008 मध्ये तयार करण्यात आला.मात्र भूसंपादनाचा प्रश्न असल्यानं हा प्रकल्प रेंगाळला होता.आराखडयानुसार या मार्गावर प्रत्येक दिशेला आठ-आठ या प्रमाणे 16 मार्गीका असून त्यातील एक मार्गाका बस साठी राखीव ठेवली जाणार आहे.या मार्गासाठी 1600 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8,3,4,4 ब,आणि 17 तसेच भिवंडी बायपास आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे जोडला जाणार असल्यानं हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर या संपूर्ण परिसराचा चेहरा-मोहराच बदलून जाणार आहे.या प्रकल्पांतर अलिबाग आणि एकूणच कोकणातील पर्यटन वाढीबरोबरच नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटीची विकासाला सहाय्यभूत ठरणार आहे.तसेच या मार्गामुळं विरार अलिबाग हे अंतर पन्नास टक्क्यानं कमी होणार आहे.