लातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांच्यावर हल्ला

0
813

रवींद्र जगताप हल्ला प्रकरण: पत्रकार
संघानं खडसावलं मेडीकलच्या प्रशासनाला

लातूर दि.१० फेब्रुवारी: लातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांना वृत्तांकन करीत असताना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मारहाण केली होती. याचा सर्वत्र निषेध होत असून लातूर जिल्हा पत्रकार संघाने अधिष्ठाता दिप्ती डोणगावकर यांची भेट घेऊन निवेदन दिले, जाबही विचारला. अध्यक्ष अशोक चिंचोले यांच्या नेतृत्वाखाली सगळे पत्रकार पत्रकार संघाच्या कार्यालयात जमले. त्यांनी लातूर शहरात पडत असलेल्या वाईट पायंड्याला विरोध केला, आज हे विद्यार्थी पत्रकारांना मारतात, उद्या रुग्णांना मारतील, परवा महाविद्यालयाच्या प्रशासनालाही बडवायला कमी करणार नाहीत ही बाब निदर्शनास आणून दिली. चिंचोले यांनी निवेदन दिल्यानंतर डोणगावकरांनी पत्रकारांचीच उलटतपासणी सुरु केली, असुविधेबाबत कशी तक्रार करायची असते याचे डोस पाजण्याचे प्रयत्न केले तेव्हा हे डोस रुग्णांना-सामान्यजणांना पाजवा, त्यांनाच आधी गरज आहे, अडचण आली की पत्रकारांना वेठीला का धरता असा सवाल यावेळी करण्यात आला. आधी असं काही घडलंच नाही हे आस्थाहीन स्वरात ऐकवण्याचा प्रयत्न डोणगावकरांनी केला. नंतर मवाळ स्वरात चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी अरुण समुद्रे, विजयकुमार स्वामी, प्रदीप नणंदकर, एजाज शेख, अनिल पौलकर, महेंद्र जोंधळे, शशिकांत पाटील, निशांत भद्रेश्वर, अरविंद रेड्डी, पंकज जैस्वाल, काकासाहेब घुटे, इस्माईल शेख, आनंद माने, विजय कवाळे, परमेश्वर कंदले, रवींद्र जगताप, तम्मा पावले, हारुण सय्यद, लिंबराज पन्हाळकर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
या आधी पत्रकारांनी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर संबंधित विभागाला आदेशित केलं जाईल असं सांगण्यात आलं. –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here