महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आता दैनिक सामनाची सूत्रे संभाळणार आहेत. त्यांची दैनिक सामनाच्या संपादकपदी निवड करण्यात आली आहे. त्या सामनाच्या पहिल्याच महिला संपादक आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सामनाच्या संपादकपदामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड करण्यात आली.
सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनामध्ये लिहिले जाणारे अग्रलेख देशभरात चर्चेचा विषय असतात. ९० च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले.
मराठीत महिला संपादक जवळपास नाहीतच अशा स्थितीत रश्मी ठाकरे यांच्या रूपाने एक महिला सामनाच्या संपादकपदी विराजनमान होत असेल तर ती आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे. आम्ही रश्मीताई ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन करीत आहोत,अशा शब्दात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी रश्मीताई ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत…