दिलीप पांढरपट्टे नवे महासंचालक

 मुंबईः माहिती आणि जनसंपर्क विभागातील पोलीस राज अखेर आज संपुष्टात आले.महासंचालक ब्रिेजेशसिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागेवर सिधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक हे आयपीएस अधिकारी नकोत ते पुर्वी प्रमाणेच आयएएस अधिकारीच असावेत अशी विनंती मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती.परिषदेची ही मागणी मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी आयएएस अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे विभागाची सूत्रे सोपविली आहेत.सरकारच्या या निर्णयाचे मराठी पत्रकार परिषदेने स्वागत केले असून  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याचेही आभार मानले आहेत.

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी नियुक्त करण्याचा प्रयोग देशात प्रथमच केला होता.मराठी पत्रकार परिषदेने तेव्हाच या निर्णयास विरोध केला होता.तसे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते.मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.याची मोठी किंमत विभागाला मोजावी लागली.अत्यंत संवेदनशील असलेल्या या विभागाचा कारभार गेली पाच वर्षे  हडेलहप्पी  पध्दतीनं सुरू होता.त्यामुळं बहुसंख्य पत्रकारांनी माहिती आणि जनसंपर्कमध्ये जाणेच बंद केले होते.पत्रकार,समाज आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणार्‍या माहिती आणि जनसंपर्कचा संपर्क पत्रकारांशीही राहिला नाही आणि जनतेशी संपर्क साधण्यातही हा विभाग पूर्णतः अपयशी ठरला.त्याचा जबर फटका देवेंद्र फडणवीस यांना बसला.देवेेंद्र फडणवीस यांचे सरकार जाण्यात तत्कालिन सीएमओचा जेवढा वाटा होता तेवढाच वाटा माहिती आणि जनसंपर्कचा होता..

पत्रकारांच्या प्रश्‍नांसंदर्भात एक नकारात्मकता विभागात निर्माण झाली होती.छोटी वृत्तपत्रे तर बंदच पडली पाहिजेत अशा पध्दतीनं सारं कामकाज सुरू होतं.महासंचालक पोलीस अधिकारी असल्यानं त्यांच्यातला पोलीस खालपर्यंत झिरपला होता त्यामुळं सर्वांपासूनच हा महत्वाचा विभाग जवळपास तुटला होता.या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सूत्रे हाती घेताच परिषदेने त्यांना पत्र पाठवून महासंचालक हा आयएएस अधिकारीच असला पाहिजे असा आग्रह धरला होता.त्याप्रमाणे आता पांढरपट्टे यांची महासंचाालकपदी नियुक्ती झाली आहे.

दिलीप पाढरपट्टे हे अगोदर धुळे आणि सध्या सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.चांगले लेखक,साहित्यिक असलेले पांढरपट्टे गझलकार म्हणून प्रसिध्द आहेत.त्यांच्या गझलेची काही पुस्तकं प्रसिध्द आहेत .त्यांच्या नियुक्तीमुळे माहिती आणि जनसंपर्कमधील वातावरण बदलेल असा विश्‍वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here