नवी दिल्ली : राजकीय संकटात सापडलेल्या मालदीवमध्ये दोन भारतीय पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. मणी शर्मा आणि आतिश रावजी पटेल अशी या दोघांची नावे आहेत. हे दोन्ही पत्रकार प्रसिद्ध वृत्तसंस्था एफसीचे प्रतिनिधी आहेत.

याबाबत एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मणी शर्मा हा अमृतरसरचा, तर भारतीय वंशाचा आतिश पटेल हा लंडनचा रहिवासी आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मालदीवमधील खासदार अली जहीर यांनी सांगितले की, आता येथे वृत्तपत्र स्वातंत्र्य शिल्लक राहिलेले नाही. काल एका वृत्तवाहिनीवरही बंदी घालण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पत्रकारांची तत्काळ सुटका करावी आणि देशात पुन्हा लोकशाही स्थापित करावी अशी आमची मागणी आहे.

मालदीव हा देश राजकीय संकटात सापडला असून राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लागू केली आहे. मालदीव सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षांच्या ९ नेत्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रपती यामीन यांच्या सरकारने हा आदेश मानला नाही. त्यानंतर राष्ट्रपतींनी देशात आणीबाणीची घोषणा केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद आणि आणखी एक न्यायाधीश अली हमीद यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर सरकारच्या दबावामुळे सुप्रीम कोर्टाला आपला निर्णय बदलावा लागला. भारत आणि चीनच्या दृष्टीने मालदीव संकट अतिशय महत्त्वाचे आहे. दोन्ही देश मालदीवमधील घटनाक्रमावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर चर्चा करताना मालदीवमधील राजकीय स्थितीबाबत चिंता व्यक्ती केली आहे. या दोन नेत्यांदरम्यान अफगाणिस्तानची स्थिती आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात सुरक्षा वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचेही व्हाइट हाउसने सांगितले.

तर, मालदीवमधील राजकीय संकट सोडवण्यासंदर्भात आपण भारताच्या संपर्कात असल्याचे चीनने म्हटले आहे. चीन या प्रकरणी भारताबरोबर कोणताही संघर्ष होणार नाही याची काळजी घेत असल्याचे चीनमधील अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे. मालदीव आपल्या अंतर्गत संकटावर उपाय शोधण्यास सक्षम असून कोणत्याही बाहेरील पक्षांनी यात लक्ष घालू नये असे चीनला वाटत असल्याचेही सूत्राचे म्हणणे आहे. (मटावरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here