‘संजय दिनकर’ या नावानेच ते परिचित होते. फिल्मी लिखाण हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. त्यांची पाच फिल्मी पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. जयवंतराव टिळक यांच्या काळात त्यांनी “केसरी”त पत्रकारिता सुरू केली व आयुष्यभर केसरीवाड्यातच प्रामाणिक सेवा केली. “सांज केसरी” सुरू झाला तेव्हा ते त्याचे संपादक होते.
संजय दिनकर हा जबरदस्त न्यूज सेन्स असलेला माणूस, अतिशय चटपटीत व कॅची हेडिंग द्यायचा. कॉपी एकदम क्रीस्प, चुरचुरीत व आटोपशीर, पाल्हाळाला थारा नाही. लिखाणाच्या हातात थोडे अपंगत्व असले तरी त्यांची लेखणी निरंतर प्रभावी राहिली.
संजय दिनकर ज्येष्ठ पत्रकार म्हणून गेले, पुण्यात सर्वांना परिचित असले तरी फार काही मोठे नाव कमावता नाही आले. अशी चांगली माणसे मोठी का होऊ दिली जात नाहीत, हे नेहमी सतावणारे कोडे आहे. संजय दिनकर या माणसाला तडजोडी जमल्या नाहीत, लांगुलचालन, हुजरेगिरी कधी जमली नाही; त्यामुळे बदलत्या काळाच्या मानसिकतेत आणि व्यवस्थापनात ते काहीसे मागे पडले. मात्र कसलाही इगो नसलेला, ज्युनिअरला सांभाळून घेणारा हा शतप्रतिशत निर्मळ, शुध्द, प्रामाणिक आणि चारित्र्यवान माणूस होता.
संजय दिनकर यांना भावपूर्ण अदरांजली!पत्रकारितेतील एक सच्चा माणूस गेला; माझ्यादृष्टीने एक फार मोठा, इमानदार माणूस गेला! (बातमी विक्रांत पाटील यांच्या वॉलवरून साभार )