अलिबाग- निवडणुकीत विशिष्ट पक्षाला सहकार्य न केल्याचा राग मनात धरून अलिबाग तालुक्यातील थेरोंडा ओगलेचीवाडी येथील 22 कुटुबांना गेली पाच वर्षे वाळित टाकण्यात आल्याच्या कारणावरून रेवदंडा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा रेवदंडा येथील उपसरपंच मंदा बळी यांच्यासह 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अनेक प्रय़त्नांनंतरही वाळितची कीड थांबण्याचं नाव घेत नसल्याचे थेरोंड्याच्या प्रकरणाने समोर आले आहे.
निवडणुकीच्या राजकारणातुन आपणास पाच वर्षांपासून वाळित टाकल्याची तक्रार धिरज ठिबळेकर आणि अन्य पिडितांनी काल रेवदंडा पोलिसात दाखल केली.त्यानुसार माणिक बळी,मंदा बळी यांच्यासह 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.अलिकडच्या काळात उघडकीस आलेले हे रायगड जिल्हयातील 43 वे वाळित प्रकरण आहे.