Monday, May 6, 2024
Home Blog Page 4

8000 पत्रकारांची तपासणी

0

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य तपासणी दिन म्हणून उत्साहात साजरा
राज्यात 8 हजारावर पत्रकारांची आरोग्य तपासणी

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचा ८३ वा वर्धापन दिन आज राज्यात “पत्रकार आरोग्य तपासणी दिन” म्हणून साजरा करण्यात आला.. जवळपास २०० तालुक्यातील 8000 हजारावर पत्रकारांनी आज आपली आरोग्य तपासणी करून घेतली.. मराठी पत्रकार परिषदेच्या आम्ही आमच्यासाठीया उपक्रमास राज्यातील पत्रकारांनी जोरदार प्रतिसाद दिल्याबददल एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांचे आभार मानले आहेत..
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत झाली.. स्थापना दिवसाचे स्मरण म्हणून महाराष्ट्रातील पत्रकार हा दिवस दरवर्षी साजरा करतात.. या दिवसाचे औचित्य साधून गेली पाच वर्षे पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते.. स्थानिक डॉक्टर्स तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम पार पाडला जातो. .. यावर्षी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राज्यभर साजरा करण्यात आला.. राज्यातील ३५४ तालुक्यांपैकी जवळपास २०० तालुक्यात आज आरोग्य शिबिरं घेण्यात आली.. त्यामधून ब्लड, शूगर,इसीजी, नेत्र तपासणी सारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या.. राज्यभरातून किमान ८ हजार पत्रकारांनी या उपक्रमात भाग घेऊन स्वतःच्या आरोग्याच्या विविध चाचण्या करून घेतल्या.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी बीड जिल्हयातील वडवणी येथील आरोग्य तपासणी शिबिरात भाग घेऊन विविध आरोग्य विषयक चाचण्या करून घेतल्या.. डॉ.विजय निपटे यांच्या रूग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात रोटरीच्या वडवणी शाखेच्यावतीने सर्व व्यवस्था करण्यात आली.. यावेळी रोटरीचे अध्यक्ष श्री. भालेराव, डॉ. पुरबे,डॉ. बोंगाणे तसेच मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे, वडवणी शाखेचे अध्यक्ष विनायक जाधव व शहरातील अन्य पत्रकार, डॉक्टर्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते..राज्यातील तपासणी शिबिरात ज्या पत्रकारांना पुढील उपचाराची गरज असल्याचे निष्पन्न झाले आहे अशा पत्रकारांची मुंबई टीमच्यावतीने मुंबईत पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे..
राज्यातील नागपूर, अमरावती, गडचिरोली पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड पर्यत सर्व जिल्हे आणि तालुक्यात आरोग्य शिबिरं संपन्न झाली..
जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ तसेच राज्यातील सर्व पत्रकारांनी आरोग्य शिबिरांना दिलेल्या प्रतिसाद, आणि आरोग्य शिबिरं यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या सहकार्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, सोशल मिडिया सेलचे प्रमुख बापुसाहेब गोरे, प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन, महिला संघटक जान्हवी पाटील,यांनी सर्वांचे आभार मानले आहेत..

आम्ही.. आमच्यासाठी

0

आम्ही.. आमच्यासाठी
आरोग्य शिबिरं यशस्वी करून दाखवा,एस.एम.देशमुख यांचं आवाहन

मित्रांनो,
पत्रकारांचे जीवन दगदगीचे, धावपळीचे असते.. जगाच्या उठाठेवी करताना आपले कुटुंबांकडे तर दुर्लक्ष होतेच त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीचीही आपण अक्षम्य हेळसांड करीत असतो .. तरूण असतो तेव्हा काही जाणवत नाही पण वय उताराकडे लागले की, तब्येतीकडे केलेल्या दुर्लक्षाचा पश्चाताप व्हायला लागतो.. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते..
पश्चात्तापाची वेळ कोणत्याही पत्रकारावर येऊ नये म्हणून गेली सहा वर्षे ३ डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आपण राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा करतो.. या दिवशी स्थानिक पातळीवर डॉक्टरांचे सहकार्य घेऊन आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते.. राज्यभर या आरोग्य शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळतो..
यंदा देखील राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी ३ डिसेंबर रोजी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.. अनेक तालुके, जिल्ह्यात शिबिराची जय्यत तयारी सुरू असल्याच्या पोस्ट वाचण्यात आल्या.. ज्या ठिकाणी अद्याप नियोजन केले गेले नाही तेथे तातडीने नियोजन करून आरोग्य शिबिरं यशस्वी करून दाखवावीत.. आपण जगासाठी आयुष्यभर झिजत असतो.. थोडी काळजी आपण ही आपली करायला पाहिजे.. आम्ही, आमच्यासाठी हा परिषदेचा उपक्रम सर्व जिल्हा, तालुका संघांनी यशस्वी करून दाखवावा ही सर्वांना विनंती आहे..

एस.एम.देशमुख

तेव्हा.. आणि आता

0

सरकारने शेतकरयांची वीज तोडण्याचा सपाटा लावला आहे.. शेतात पाणी आहे, आणि रब्बीचा पिकं देखील जोमात आहेत.. अशा स्थितीत वीज कापली जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.. अतिवृष्टीने खरीप गेले, त्याची तुटपुंजी नुकसान भरपाई सरकारने दिली.. ती वीज कापून आता परत घेतली जात आहे.. वीज फुकट हवी अशी कोणत्याच शेतकरयांची मागणी नाही. वीज पुरवठा सहा तासच होतो.. त्यातही अनेकदा वीज गायब असते.. वेळची वेळेवर बिलंही दिली जात नाहीत.. परिणामतः बिलं थकीत राहतात.. या सर्व समस्येवर एक मार्ग आहे सोलरचा.. मागेल त्याला शेततळे जसे दिले जाते त्याच धर्तीवर मागेल त्याला सोलर दिले तर वीज मंडळावरील अवलंबित्व कमी होईल.. शेतकरयांचा खर्च वाचेल, विनाव्यत्यय पाणी पुरवठा होऊ शकेल.. त्यासाठी गरज असेल तर अन्य योजनेचा खर्च कमी केला तरी चालेल.. मात्र सोलर प्रत्येक शेतात पोहचेपर्यंत सरकारने वीज कापून शेतकरयांना अधिक संकटात लोटण्याचा उद्योग करू नये.. सरकार संवेदनशील असेल तर पुन्हा अशा बातम्या येणार नाहीत याची काळजी घेईल…
अर्थमंत्री अजित पवार यांनी परवा एका कार्यक्रमात सांगितलं वीज बिलं द्यावीच लागतील.. ते सत्तेत नव्हते तेव्हाचा एक व्हिडिओ सोबत दिला आहे.. तेव्हा ते सांगत होते मोफत वीज द्यावी, वीज तोडू नये वगैरे.. त्यासाठी तेलंगनाचं उदाहरण ते देत होते.. आज ते सत्तेत आहेत त्यांची भाषा वेगळी आहे..

महिला पत्रकारांना अटक

0

त्रिपुरात दोन महिला पत्रकारांना अटक

त्रिपुरामध्ये दोन महिला पत्रकारांविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. , पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे . पोलिसांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप या या महिला पत्रकारांनी केला आहे. पत्रकार समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन त्यांना धमकावले. सायंकाळी उशिरा त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या पत्रकारांवर दोन धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विहिंप नेत्या कांचन दास यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
X

काकासाहेब लिमये

0

३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली.. परिषदेचे पहिले अध्यक्ष होते ज्ञानप़काशकार काकासाहेब लिमये.. आमचे पहिले अध्यक्ष कसे होते? त्यांची सवभाववैशिषटये याबाबत आपण सारेच अनभिज्ञ आहोत.. आचार्य प़. के. अत्रे, काकासाहेबांना गुरूस्थानी मानत.. काकासाहेबांच्या समृतीदिनानिमित्त आचार्य अत्रे यांनी मराठा मधून आदरांजली वाहिली होती.. तो लेख २८ एप़िल १९६९ च्या दैनिक मराठा प़सिध्द झाला होता.. तो येथे पुन:प़काशित करीत आहोत.. आज पत्रकारितेचे संदर्भ बदलले आहेत.. परंतू आमचे मराठी पत्रकार पत्रकारिता कशी जगत होते हे हा लेख वाचून समजू शकते..

कै. काकासाहेब लिम

आमने एक जेष्ठ आणि श्रेष्ठ स्नेही श्री. कृष्णाजी गणेश उर्फ काकासाहेब लिमये म्हणजे कोण? असा आजच्या तरुण पिढीला प्रश्न पडल्यास त्यांत कांहीच नवल नाहीं कारण काकासाहेब स्वतः कमालीचे प्रसिध्दिपराड; मुख होतें. फार काहीं जुनी गोष्ट नाही, पण तो काळ एक असा होता की, त्यावेळी पुण्यांत सूर्यप्रकाशाबरोबर ‘ज्ञानप्रकाश’ परोघरी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पोहोचवित असे. कै. ना. गोपाळराव गोखले यांनी आपल्या काही निवडक पण एकनिष्ठ | सहकाऱ्यांसमवेत पुण्यांत स्थापन केलेल्या ‘भारत सेवक समाज’ या संस्थेचे ‘ज्ञानप्रकाश’ हे मराठी दैनिक मुखपत्र आणि त्या पत्राला लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर नेऊन बसविणारे त्यांचे कार्यकुशल आणि सव्यसाची संपादक श्री. काकासाहेब लिमये एका प्रमुख दैनिकांचे संपादक या नात्याने प्रसिध्दि ही काकासाहेब यांच्या हातांतील एक सिध्दि होती. पण तिचा उपयोग त्यांनी स्वतःची टिमकी पिटण्याकडे केव्हांच केला नाही. आजच्या जमान्यांत हे थोडेसे चमत्कारिक वाटते खरे पण काकासाहेबांच्या बाबतींत वस्तुस्थितीच तशी होती. त्यामुळे कृ. ग. लिमये हे नांव ‘ज्ञानप्रकाश पत्राचे संपादक असलेल्या व्यक्तीचे आहे. याची सर्वसाधारण माहिती अनेकांना असली तरी ही कृ.ग. लिमये व्यक्ति कोण यांचा उलगडा फारच थोड्यांना होई. स्वत: अंधारांत राहून आपल्या
इतरांचे मार्गदर्शन करणाऱ्या एखाद्या टॉर्नचीच उपमा सार्थपणे काकासाहेबांच्या अजब प्रसिध्दिपण्ड; मुखतेला देता येईल.. त्या काळच्या ‘भाला ‘ या चरचरीत आणि चुणचुणीत साप्ताहिकाचे संपादक ‘भाला’ कार (भास्करराव) भोपटकर यांनी आपल्या पत्राच्या स्तंभांतून एकदां जाहिरव पृच्छा केली की, ‘ज्ञानप्रकाश’चे संपादक काकासाहेब लिमये म्हणून जे कोणी आहेत त्यांनी आपला फोटो तरी एक वेळ ‘ज्ञानप्रकाशांत’ छापावा म्हणजे हे काकासाहेब लिमये कोण हें तरी आम्हाला कळेल! काकासाहेबांनी ‘भाला’ कारांच्या या जाहिर आव्हनाचा स्विकार केला नाही ही गोष्ट अर्थातच निराळी. ज्ञानप्रकाश’च्या झोताने काकासाहेबांनी ज्या अनेक व्यक्तींना किंवा संस्थांना प्रसिध्दीच्या प्रकाशांत आणले त्यांत आमचा स्वतःचा समावेश आहे हे आम्ही कृतज्ञतेने नमूद करतो. किंबहुना आमच्या साहित्यिक, सार्वजनिक, आणि व्यावसायीक (पत्रकार म्हणून) जीवनाचा पाया खंबीरपणे भरण्यास ‘ज्ञानप्रकाश’ द्वारा काकासाहेबांनी केलेली आमची मुक्तकंठ प्रशस्ती आणि निःसंकोच प्रसिध्दिच बव्हंशी कारणीभूत झाली असे म्हणण्यास कांहीच प्रत्यवाय नाहीं व्यक्तिशः आमच्यावरील या काकासाहेबांच्या ऋणाचा आम्हाला कदापिही विसर पडणं शक्य नाही. ‘ज्ञानप्रकाश’चे संपादक या व्यवसायपरत्वे त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीतून | काकासाहेबांच्या उपकारांचे जे ओझे आमच्या | बाहूवर अवतरले त्याचा येथवर उल्लेख केला. पण व्यक्ति म्हणून काकासाहेबांच्या सोज्वळ | मार्गदर्शनाचा, प्रेमळ सहवासाचा, आत्मीय | अस्मितेचा आणि अविस्मरणीय स्नेहलतेचा जो लाभ आम्हांला झाला त्याचे वर्णन करणेही शक्य नाही. तसें पाहिल्यास व्यक्तिशः | काकासाहेब आणि आम्ही स्वतः यांच्यांत साम्य कमीच. आम्ही एकप्रकारे उच्छशृंखल. | काकासाहेब कमालीचे संयमी, आम्ही | अद्ययावत पाश्यात्य पोषाखांत वावरणारे,
काकासाहेब सदरा, लांब कोट, धोतर, काळी टोपी यांच्या पलिकडे न जाणारे, आम्ही भांडखोर, काकासाहेब प्रसंगी पडते घेऊनहि तंटा टाळणारे आम्ही बंडखोर, बंधनांना न जुमानणारे, काकासाहेब ‘सबूर’ वादी, आम्ही फटकळ, काकासाहेब मृदुभाषी, आम्हां उभयतात इतकी विसंगति असूनहि त्यांचा आमचा स्नेह अभेद्य आणि अतूट राहिला. ‘ज्ञानप्रकाश’ ज्या संस्थेचे मुखपत्र त्या भारत सेवक समाजाची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टि ‘मवाळ’ किंवा ‘प्रागतिक’ ‘जहाल’ राजकारण तसे म्हटल्यास काकासाहेबांनाच मान्य नव्हते, परंतु विरोधासाठी म्हणूनच विरोध | ही ‘मवाळ’ दृष्टी त्यांनी काँग्रेसच्या विशेषतः | जहाल राजकारणाबाबत केव्हाहि अंगिकारली | नाही. परंतु खरे सांगवयाचे म्हणजे | काकासाहेबांना राजकारणापेक्षा समाजकारणांतच | अधिक रस वाटे. सनातनी वृत्तीचे आगर म्हणून त्याकाळी मानल्या गेलेल्या पंढरपूर | क्षेत्रांतील एक कुटुंबीय ही वस्तुस्थिति असतांही | काकासाहेब वृत्तीने खरेखुरे आणि मनोमन समाजसुधारक होते. अस्पृश्योध्दार, स्त्रीशिक्षण,
विधवाविवाह इत्यादी समाजसुधार चळवळींचा पुरस्कार ते केवळ ‘ज्ञानप्रकाश’ च्या रकान्यांतून करूनच थांबत नसत तर वेळप्रसंगी स्वतः पुढाकार घेऊन किंवा त्यांत समभागी होऊन त्यांना ते सक्रिय प्रोत्साहन देत. प्रिन्सिपॉल प्रल्हाद केशव अत्रे, बी.ए., बी. टी., टी. डी. (लंडन) या आमच्या मालगाडीवजा, लांबलचक नामाभिधानाचा हल्लीचा रूढ सुटसुटीत संक्षेप ‘आचार्य प्र. के. अत्रे’ करण्याचे श्रेय सर्वस्वी काकासाहेबांनाच आहे. |स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी
मराठी भाषेतून परकीय शब्दांना गचांडी देऊन त्यांच्या जागी निव्वळ मराठी शब्दांची योजना करण्याची मोहिम उघडली आणि काकासाहेबांनी हिरीरीने ती सक्रिय अंमलात आणण्याचा उपक्रम आरंभला. त्यांत आमच्या प्रिन्सिपॉलपदावर कुल्हाड पडली आणि आचार्य ही उपाधि आमच्या नावामागे कायमची चिकटली! काकासाहेब १९४८ साली | वारले. त्यापूर्वी सुमारे एक तपभर त्यांची आमची गट्टी टिकली. अत्रे-लिमये सख्य |म्हणजे अनेकांना पडलेले आणि त्यांना न | सुटलेले एक कोडेच! चमत्कृतिजन्य तर ते होतेंच. त्याच्या कुतूहलाने ज्या प्रमाणे अनेकांना मोहित केले त्याचप्रमाणे अनेकांना असूयाप्रेरितही केले. काकासाहेबांचा लोभ, त्यांचे प्रेम आणि त्यांची माया यामुळे आमचा स्वतःचा अपरंपार फायदा झाला. त्यांचा भातृतुल्य भाव आम्हास सदैव मार्गदर्शक ठरला. त्यांची आमच्यावरील माया सदैव आमच्या पाठीशी एक मोठी शक्ती म्हणून उभी राहिली. दुर्दैवानें आमचा जो लाभ तोच काकासाहेबांना हानिकारक ठरला. अत्रे लिमये गट्टीच काकासाहेबांच्या ‘ज्ञानप्रकाश’ संपादकीय निवृत्तीला (सक्तीच्या) निमित्त ठरली हे उपड गुपित आहे. काकासाहेबांनी मात्र आपल्या अंत्य घटकेपर्यन्त याची एकदाही कबुली दिली नाही. काकासाहेबांचा सर्वात थोरपणा कोणता असेल तर तो हाच होता की, आपल्या कट्ट्यातील कट्ट्या प्रतिस्पर्ध्याविरोधातही त्यांनी कधी दुर्भावना व्यक्त केली नाही की, त्याच्याबद्दल अनुदार, उद्गार काढले नाहीत. अंत:करणांत आग पेटली असतांना ही निर्विकार मुद्रेने ‘यांत काय झाले’ अशीच ते त्यावर सारवासारव करीत. काकासाहेब सहसा कर्धी भडकत नसत. पण
एकदा काय झाले. त्यांच्या एका सत्काराच्या सभेत आम्ही आमच्या नेहमीच्या पद्धतीने एक त्वेषपूर्ण विधान केले. आम्ही जे बोललो ते खोटं नव्हतेच. फक्त त्या विधानाने आमच्या म्हणण्याला धार दिली गेली. काकासाहेबांनी तेथेच जाहीर भाषणांत आपल्या सौम्य पध्दतीनं आमची हजेरी घेतली आणि सभा संपल्यानंतर त्यांनी आम्हाला चक्क बजावले की, आमची भावना योग्य असली तरी वापरलेली भाषा ठीक नव्हती. काकासाहेबांचे आणि आमचे विचार एकमेंकाना पटले नाहीत, असे कितीतरी प्रसंग सांगतां येतील. पण अशा या विचारसंघर्षाचे पर्यवसान त्यांची आमची मैत्री किंवा परस्पर प्रेमभाव यत्किंचितही दुरावण्यांत कधी झालें नाहीं. काकासाहेबांच्या हयातीत एक मराठी दैनिक काढण्याची आमची जिद्द अनेकदा आम्ही त्यांच्यापाशी व्यक्त केली आणि प्रत्येक वेळी काकासाहेबांनी ‘बाबूराव, त्या भानगडींत तुम्ही पडू नका’ असे सांगून आम्हास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही ‘जय हिंद’ दैनिक काढले आणि त्यावेळी विकलांग स्थितीत रुग्णशय्येवर असलेल्या काकासाहेबांनाच त्याचा प्रथमांक अर्पण केला. तो अंक हातांत घेतल्यावर काकासाहेबांच्या डोळ्यातून वाहलेल्या अश्रुधारांची आठवण होऊन आजही आमचे हृदय कलकलते. दैनिक मराठ्याची आम्ही प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळी काकासाहेब हयात नव्हते. पण आमची आजही मनोमन भावना आहे कीं, काकासाहेबांच्या आशीर्वादाखेरीज दैनिक मराठ्याला आजची लोकप्रियता, प्रतिष्ठा आणि भरभराट प्राप्त झालेली नाहीत. काकासाहेबांच्या पुण्यस्मृतीला दैनिक मराठा आणि काकासाहेबांचे अनेक चाहते यांच्या वतीने आमचे शतशः प्रणाम

आचार्य अत्रे

अशी झाली परिषदेची स्थापना…

0

.. अशी झाली मराठी पत्रकार परिषदेची स्थापना

मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वसमावेशक अशी एकमेव संघटना आहे. राज्यातील ३६ जिल्हे आणि जवळपास सर्वच म्हणजे ३५८ तालुक्यात परिषदेचा शाखा विस्तार झालाय. दिल्ली, पणजी, हैदराबाद, विजापूर, बेळगाव, निपाणी सह अन्य काही राज्यातील शहरातही परिषदेच्या शाखा कार्यरत आहेत. देशभरातील ९ हजारांवर मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.. सर्वच सदस्यांचं परिषदेवर निस्सीम प़ेम आहे.. म्हणूनच राज्यातील पत्रकार परिषदेला आपली मातृसंस्था मानतात..
३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत स्थापन झालेल्या परिषदेचा इतिहास रोमहर्षक आणि पत्रकारांच्या नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. पत्रकारितेत ज्यांनी उल्लेखनिय कार्य केलेलं आहे असे अनेक मान्यवर आणि नामंवत संपादक, पत्रकार मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले होते. परिषदेच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यातील अनेक जण परिषदेचे अध्यक्षही होते. मराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक सदस्यांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.

महाराष्ट्रात मराठी पत्रकारांची आर्थिक, बौध्दिक आणि वैचारिक उन्नती व्हावी यासाठी एखादी संघटना असावी असा एक विचार स्वातंत्र्याच्या बराच अगोदर तत्कालिन पत्रकारांच्या समोर आला.त्याला मूर्त स्वरूप देता यावं यासाठी १९३३ मध्ये पुण्यात संपादकांचं एक संमेलन भरविण्यात आलं होतं. त्यासाठी गोपाळराव ओगले यांनी पुढाकार घेतला होता. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देखील तेच होते. संमेलनाचा त्यावेळी मोठा गाजावाजा झाला मौजनं तर खास विशेषांकही काढला. तात्यासाहेब केळकर यांच्यासारख्या ज्येष्ठांचा संमेलनात सहभाग होता. तथापि ज्या उद्देशानं हे संमेलन भरविण्यात आलं होतं तो उद्दश काही सफल झाला नाही. पत्रकार संघटना स्थापनेच्यादृष्टीन काहीही निर्णय होऊ शकला नाही. याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ओगले यांच्या भाषणात संयुक्त ‘महाराष्ट्राच्या कल्पनेचं बिजारोपण केलेलं होतं. मुख्य मुद्दा सोडून उपस्थित झालेला हा विषय अनेकांना आवडला नाही. त्यामुळे मंडळी जमली,वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून निघून गेली. त्याकाळी मुंबईत पत्रकारांची अशी मासिक संमेलन भरत. पुण्यातल्या या संमेलनाला मुंबईतील पत्रकारांच्या मासिक संमेलनासारखंच स्वरूप आलं होतं.त्यामुळं या संमेलनाची चर्चा झाली पण विषय चर्चेवरच थांबला.. कालांतराने विषय लोकांच्या विस्मृतीतही गेला. पाच-सहा वर्षे मग काहीच झालं नाही. ती वर्षे अशीच गेली. नंतरच्या काळात वृत्तपत्र व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याने अडचणीत आला होता. कमालीचं अस्थैर्य आलं. पत्रकारांना मानसन्मानानं जगणं, केवळ कठिणच झालं असं नाही तर ते दुरापास्तही झालं. दुसरीकडं अभ्यासू, हाडाच्या पत्रकारांचीही उणिव भासायला लागली. निस्पृह भावनेनं पत्रकारितेला वाहून घेणारे पत्रकार दुर्मिळ झाले होते. (म्हणजे पत्रकारितेत निस्पृहपणे, एक सेवा किंवा व्रत समजून काम करणाऱ्या पत्रकारांची ‘टंचाई’ केवळ आजच भासते आहे असं नाही तर ८२ वर्षांपूर्वी देखील हीच परिस्थिती होती, ध्येयवादी मंडळींची पत्रकारितेला तेव्हाही गरज होती. आजही आहे.) माध्यमांसमोरील या अडचणी आणि इंग्रज सरकारकडून वेगवेगळे कायदे करून माध्यमांची होणारी मुस्कटदाबी यामुळं सारी वृत्तपत्रसृष्टीच त्रस्त झाली होती. वृत्तपत्र व्यवसायावर सातत्यानं व्यवस्थेकडून होणारा अन्याय आणि आर्थिक अस्थैर्यामुळं आलेलं नैराश्य दूर करून परत एकदा वृत्तपत्र व्यवसायाला नवी उभारी देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं, संघटीत प्रयत्न करणं गरजेचं होतं. तशी गरजही पुन्हा एकदा सर्वांनाच जाणवायला लागली होती. त्या अंगाने प्रयत्नांनीही मग वेग घेतला. १९३९च्या सप्टेंबरमध्ये भा.वि. वरेरकर, लालजी पेंडसे, अनंत काणेकर, गो. बा. महाशब्दे यांच्यासारखे काही मान्यवर, ‘मराठी पुरोगामी लेखक संघा’च्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आले होते. बैठकीत या सर्वांनी लेखक संघाप्रमाणं संपादक, उपसंपादकांचे एक संमेलन बोलावून ठोस अशी काही तरी योजना अंमलात आणावी असा निर्णय घेतला. ही सारी मंडळी मग केवळ चर्चा करूनच थांबली नाही तर संपादक, उपसंपादक आणि बातमीदारांची एक बैठक २५ ऑक्टोबर १९३९ रोजी मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये बोलावण्यात आली. भा. वि. वरेरकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस १९ नियतकालिकांचे संपादक, उपसंपादक उपस्थित होते. बैठकीत पत्रकारिते समोरील विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा झाली. पत्रकारांच्या स्थितीवरही अनेकांनी मतं व्यक्त केली. ही सारी परिस्थिती बदलायची असेल तर सामुहिक प्रयत्नांची गरज आहे आणि त्यासाठी एखादं प्रभावी व्यासपीठ असलं पाहिजे यावर उपस्थितांचं एकमत झालं. पत्रकारांची ही संघटना महाराष्ट्रव्यापी असावी असंही बैठकीत ठरलं.मराठी पत्रकार परिषदेची मुहूर्तमेढ इथंच रोवली गेली. संघटना स्थापन करताना पत्रकारांचं महाराष्ट्र पातळीवरचं एक अधिवेशन किंवा परिषद भरविली जावी अशी सूचना के.रा.पुरोहित यांनी मांडली. ती स्वीकारण्यात आली. संघटना स्थापन करण्याचं ठरलं पण संघटनेचं नाव काय असावं यावर बैठकीत तब्बल दोन तास काथ्याकूट झाला. अंतिमतः अनंत काणेकर यांनी संस्थेचं नाव मराठी पत्रकार परिषद असावं असं सूचवलं. त्यावर उपस्थितीतांची मत आजमाविली गेली. सर्वांना हे नाव मान्य होतं. आता वेळ घालविण्याची कोणाचीच तयारी नव्हती. ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईतील ‘विल्सन हायस्कूल’च्या प्रांगणात ‘मुंबई मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आलं होतं. तत्कालिन पत्रकारांमध्ये अनेकजण ज्येष्ठ साहित्यिक असल्यानं साहित्य संमेलनातच मराठी पत्रकार परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत झाल्यानंतर परिषदेच्या पहिल्या कार्यकारिणीची निवडही याच संमेलनात गुप्त मतदान पध्दतीनं केली गेली. बारा उमेदवार होते. त्यापैकी वा. रा. ढवळे, र. धो. कर्वे, के.रा. पुरोहित, य. कृ. खाडीलकर, वरेरकर, का.म. ताम्हणकर, आप्पा पेंडसे यांची कार्यकारिणीवर निवड गेली. कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत सुंदर मानकर, द. पु. भागवत, आणि पालेकर यांना स्वीकृत सदस्य म्हणून कार्यकारी घेण्यात आलं. परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्यकारी मंडळान ज्ञानप्रकाश काकासाहेब लिमये यांची एकमतान निवड केली . तेच परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. कार्याध्यक्ष म्हणून भा.वि. वरेरकर यांची निवड केली गेली. स्वागताध्यक्ष नवाकाळचे संपादक य.कृ.खाडीलकर झाले. के.रा.पुरोहित हे मराठी परिषदेचे पहिले सरचिटणीस झाले. याच वेळी संघटनेच काम वाढविण्यासाठी आणि पुण्यात परिषदेच्या शाखा स्थापन करण्याचा आणि पुरोहितांनी पुण्यात पेंडसे यांनी मुंबईत परिषदेला अधिकाधिक पत्रकारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प़यत्न करावा असे ठरले. तशी जबाबदारी त्या दोघांवर सोपविली गेली. मुंबईसाठी मुंबई पत्रकार परिषद स्थापन करावी असा ठराव पुरोहितांनी मांडला. या ठरावासह काळे आणि मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य अत्रे यांनी पाठिंबा देत हा ठराव संमत केला गेला. परिषदेच्या या अधिवेशनास ६९ नियतकालिकांचे प्रतिग मिळून ११० पत्रकार उपस्थित होते. यावेळी इतरही काही ठराव संमत झाले. अशा प्रकारे ३ डिसेंबर १९३९ रोजी मराठी पत्रकार परिषदेची अधिकृतरित्या स्थापना झाली.

काकासाहेब लिमये यांनी१९३९ पासून पुढील अधिवेशनापर्यत एका कार्यकारी मंडळाची निवड केली. पत्रकार परिषदेच्या या मध्यवर्ती मंडळात अधयक्ष कृ.ग. लिमये, उपाध्यक्ष शं.बा. किर्लोस्कर व त्र्यं.र.देवगिरीकर यांच्यासह एकूण सोळा सभासद होते.पुरोहित आणि रा.गो. कानडे हे सरचिटणीस होते. मुंबई शाखेचे पहिले अध्यक्ष म्हणून अनंत काणेकर यांची निवड केली गेली होती. चिटणीस द.पु. भागवत होते अन्य नऊ सभासद होते. दा.वि. गोखले हे पुणे शाखेचे पहिले अध्यक्ष होते. दि.वा. दिवेकर चिटणीस होते.तसेच अन्य दहा सदस्य कार्यकारिणीत होते.

मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली. पुणे आणि मुंबईतील शाखांचे काम जोरात सुरू झालं. राज्यातील पत्रकारही परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आले. परिषदे निमित्तानं मराठी पत्रकार प्रथमच एकत्र आले होते. पत्रकार संघटीत झाल्यामुळे सरकारच्या प्रांतिक वृत्तपत्र सल्लागार समितीवर परिषदेचा एक प्रतिनिधी घेतला जावा अशी मागणी केली गेली.. ती सरकारला मान्य करावी लागली य. कृ. खाडीलकर यांची पहिले प्रतिनिधी म्हणून समितीवर नेमणूक केली गेली. परिषदेच्या काही बैठका पुण्यात तर काही मुंबईत घेतल्या गेल्या. त्यात पत्र सल्लागार समितीवर मराठीचा आणखी एक प्रतिनिधी असला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. ती ही मान्य केली गेली. समितीवर कोणाला पाठवायचे यासाठी निवडणूक घेतली गेली. त्यात काकासाहेब लिमये यांना पुण्यातर्फे पाठविण्याचं ठरलं.

दुसरं अधिवेशन पुण्यात

परिषदेचं पहिलं अधिवेशन मुंबईत तर दोन वर्षांनी परिषदेचं दुसरं अधिवेशन १८ मे १९४९ रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात घेण्यात आलं. पहिल्या अधिवेशनाप्रमाणंच अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून न. र. फाटक यांची निवड झाली.. केसरीचे संपादक तात्यासाहेब करंदीकर हे स्वागताध्यक्ष होते. पुण्याच्या अधिवेशनात विविध ठराव संमत झाले. पहिल्या आणि दुसन्या अधिवेशनाच्या काळात अनेक घडामोडी घडल्या होत्या, रत्नागिरीत भरलेल्या साहित्य समेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना ना. सी. फडके यांनी पत्रव्यवसायावर आणि संपादक, उपसंपादकांवर सपाटून टीका केली होती. या संमेलनास पत्रकार परिषदेचे सरचिटणीस पुरोहित तसेच पेडसे उपस्थित होते. अध्यक्षांनी वृत्रपत्रसृष्टीवर केलेली टीका या दोघांना मान्य होणं शक्य नव्हतं. या दोघांनी तसेच संमेलनास उपस्थित असलेल्या अन्य पत्रकारांनी फडके यांच्याकडे जाहीर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी ती धुडकावून लावल्यानं विषय नियामक सभेत आला.. तेथे अध्यक्षांच्या विरोधात निंदाव्यंजक ठराव मांडण्यात आला. तो ठराव संमत झाला नाही हे जरी खरं असलं तरी साहित्य संमेलनाच्या इतिवृत्तांत त्याची नोंद घ्यावी लागली. एवढं सारं रामायण घडल्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमात फडके काहीसे नरमले आणि आपली तक्रार सर्वच पत्रकारांबद्दल नसून काहींबद्दल आहे’ अशी आजच्या नेत्याला शोभेल अशी टिप्पणी त्यांनी केली. काही म्हणजे नेमक्या कोणत्या यावर मात्र ते काही बोलले नाहीत किंवा कोणत्या वर्तमानपत्राचं नावही ते घेऊ शकले नाहीत. या घटनेचे पडसाद मराठी पत्रकार परिषदेच्या पुण्यातील अधिवेशनात उमटणे स्वाभाविक होते. त्यावर जोरदार चर्चा झाली. पुरोहित आणि पेंडसे यांनी फडके याच्या वक्तव्याला रत्नागिरीत जोरदार आक्षेप घेऊन ‘कारण नसताना कोणी पत्रकारांना डिवचले तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्याला तीव्र प्रतिकार करू आणि प्रसंगी जश्यास तसे उत्तर देऊ’ हे दाखवून दिलं. परिषदेचा हा लढाऊबाणा पुढच्या काळात आणि आजतागायत कायम राहिला. पत्रकारांचे हक्क आणि पत्रकारांच्या स्वाभिमानाच्या लढ्यात परिषद नेहमीच आक्रमक राहिली हे आपणास दिसेल. बिहार प्रेस बिलाचा विषय असो की नंतर राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा विषय असो परिषद नेहमीच मुठी आवळत रस्त्यावर उतरलेली दिसेल. विशेषतः एस. एम. देशमुख २००० मध्येपरिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर परिषद अधिकच आक़मक झाली.. नंतरच्या काळात अशक्य वाटणारा पत्रकार संरक्षण कायदा झाला.. महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव असे राज्य आहे की जेथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण आहे.. या कायद्याचं श्रेय मराठी पत्रकार परिषद आणि एस.एम.देशमुख यांच्या नावावर आहे.. या कायद्यासाठी राज्यातील पत्रकारांना बारा वर्षे संघर्ष करावा लागला.. परिषदेच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील पत्रकारांना पेन्शन मिळू लागले.. निवृत्त पत्रकारांना ११,००० रूपये पेन्शन मिळते..बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिधुदुर्ग येथील स्मारकाचा विषय देखील परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामुळे मार्गी लागला.. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण योजना केवळ परिषदेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागली.. त्याचा शेकडो गरजू पत्रकारांना लाभ मिळाला.. मजिठियाचा विषय असो किंवा छोट्या वृत्तपत्रांच्या जाहिरातदराचा विषय असो, परिषदेने हे विषय हाती घेत निर्धाराने लावून धरले.. सोडवले. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी परिषद नेहमीच जागरूक आणि आक़मक राहिली आहे.. परिषदेने राज्यात मोठी चळवळ उभी केली असल्याने पत्रकार जसे संघटीत झाले तसेच ते निर्धास्त झाले.. परिषद है ना.. हा विश्वास राज्यातील पत्रकारांच्या मनात निर्माण करण्यात परिषद यशस्वी झाली.. मराठी पत्रकार परिषद केवळ हककासाठीच लढणारी संघटना नाही तर परिषद हे कुटुंब समजून गरजू पत्रकारांना मदतीचा हात पुढे करताना परिषदेने कधी आखडता हात घेतला नाही.. कोरोना काळ असो की, त्याच्या अगोदरचा काळ परिषद खंबीरपणे पत्रकारांबरोबर राहिली.. गेल्या ३ वर्षात परिषदेने जवळपास ७० लाख रूपयांची मदत गरजू पत्रकारांना केली.. कोरोना काळात पुण्यात जीवनावश्यक वस्तू सर्वच सदस्यांना देण्यात आल्या.. अन्यत्रही कोरोना काळात पत्रकारांना मोठी मदत दिली गेली.. त्यामुळे परिषदेबददल विश्वास आणि आपुलकीचे वातावरण राज्यात निर्माण झालेले आहे.. आज राज्यात मराठी पत्रकार परिषदच ही अशी एकमेव संघटना आहे की, जी कायम पत्रकारांबरोबर आहे.. परिषद ही आपलै कुटुंब समजते.. हे कुटुंब अधिक व्यापक व्हावं यासाठी पुढील काळात अधिक प़भावी पणे काम करण्याचा परिषदेचा निर्धार आहे..

एस.एम.देशमुख

10 साल के बाद भी…

0

एक दशक उलटूनही मजिठिया आयोगाची अंमलबजावणी नाही

लढण्यासाठी पत्रकारांमध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांएव्हढेही त्राण उरल नाही

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची खंत

मुंबई – देशातील वृत्तपत्रांनी मजिठिया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी अशी अधिसूचना सरकारने काढली होती. त्याला काल 11 नोव्हेंबर रोजी एक दशक उलटूनही दुर्दैवाने देशातील एकाही वृत्तपत्राने मजिठिया आयोगाच्या शिफारशींची पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे देशातील पत्रकारांची अवस्था महाराष्ट्रातील एस.टी. कर्मचाऱ्यांपेक्षाही वाईट झाली असून एस.टी. कर्मचारी तरी संघटीतपणे अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. पण पत्रकारांमध्ये तेव्हढेही त्राण उरले नाहीत अशी खंत अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

एस. एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, 11 नोव्हेंबर 2011 हा दिवस पत्रकारांसाठी महत्वाचा होता. जी वृत्तपत्रे मजिठिया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्या सरकारी जाहिराती बंद कराव्यात अशी विनंती अ.भा. मराठी पत्रकार परिषदेसह देशातील विविध पत्रकार संघटनांनी सरकारला वारंवार केली होती. मात्र त्याकडे दूर्लक्ष केले गेले होते. मजिठिया लागू न झाल्याने पगार वाढले नाहीत त्यातच कोरोनाचे निमित्त करून आहे ते पगार कमी केले गेले किंवा पत्रकारांना नोकरीवरून कमी केले गेले. त्याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसला. या अन्यायाविरोधात देशभर ज्या पद्धतीने आवाज व्यक्त व्हायला हवा होता, तो होत नाही. आज एस.टी. कर्मचारी तरी संघटितपणे अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत, पत्रकारांमध्ये तेव्हढेही त्राण उरले नाही. ज्या पत्रकारांनी नोकऱ्या गमविल्या ते हतबल आहेत आणि जे नोकऱ्यांवर आहेत त्यांना आपली नोकरी टिकविण्याची चिंता आहे. अशा स्थितीत बहुसंख्य पत्रकार कोंडीत सापडले आहेत. यातून सुटका कशी होणार असा सवाल व खंत व्यक्त करीत संघटितपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची गरज एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केली.


पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव

0

मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा
पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
निलेश खरे, मृणालिनी नानिवडेकर, दीपक कैतके, दीपक प़भावळकर,राजेंद्र काळे, अच्युत पाटील, भारत रांजनकर, उत्तमराव दगडू यांचाही होणार सन्मान

मुंबई दि. ८ : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतीष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मार्मिकचे माजी संपादक पंढरीनाथ सावंत यांना जाहिर करण्यात आला आहे.. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून उरूळी कांचन येथे होणारया परिषदेच्या अधिवेशनात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प़सिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे..परिषदेच्या अन्य पुरस्कारांची घोषणा देखील आज करण्यात आली आहे..
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील पत्रकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.. दर्पणकारांच्या नावाने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यापुर्वी मा. गो. वैद्य, दिनू रणदिवे तसेच अन्य ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात आला होता.. यावर्षी पंढरीनाथ सावंत यांना या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.. पंढरीनाथ सावंत यांनी मार्मिकसह विविध दैनिकातून संपादक म्हणून उल्लेखनिय कार्य केले आहे.. सामांन्याची बाजू घेत त्यांनी आयुष्यभर अत्यंत निष्ठेने पत्रकारिता केली.. लेखक म्हणूनही पंढरीनाथ सावंत ख्यातकीर्त आहेत..

परिषदेचे अन्य पुरस्कारही आज जाहीर करण्यात आले आहेत..आचार्य अत्रे यांच्या नावाने विद्यमान संपादकाला दिला जाणारा पुरस्कार झी – 24 तास चे संपादक निलेश खरे यांना, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महिला पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार मृणालिनी नानिवडेकर यांना,, उद्योगपती रावसाहेब गोगटे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पालघर येथील ज्येष्ठ पत्रकार सकाळचे अच्युत पाटील यांना, नागोरावजी दुधगावकर स्मृती पुरस्कार वसमत येथील गाववाला दैनिकाचे संस्थापक संपादक उत्तमराव दगडू यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार कृषीवलचे वृत्तसंपादक भारत रांजनकर यांना, पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार दैनिक बेळगाव तरूण भारतचे सातारा येथील आवृत्ती प्रमुख दीपक प़भावळकर यांना आणि पत्रकार शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक कैतके यांना जाहिर करण्यात आला आहे.. अकोल्याचे पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती प़मुख राजेंद्र काळे यांना जाहीर करण्यात आला आहे..
मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी पुण्याजवळ उरूळी कांचन येथे होत आहे. या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते वरील सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी,सोशल मिडिया परिषदेचे राज्य प़मुख बापुसाहेब गोरे, राज्य महिला आघाडीच्या संघटक जान्हवी पाटील, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी एका प़सिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.. पुरस्कार प़ाप्त सर्व पत्रकारांचे एस. एम.देशमुख यांनी अभिनंदन केले आहे…

तारखा बदलल्या..

0

मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथील अधिवेशनाच्या तारखा बदलल्या

अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर रोजी

पुणे दिनांक ७ : मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया अधिवेशनाच्या तारखा बदलल्या असून हे अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार अधिवेशनाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकात देण्यात आली आहे..
मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर रोजी होणार होते.. मात्र अचानक उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय काल झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.. बदललेल्या तारखांची नोंद घेऊन राज्यातील पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त संख्येनं अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे..
उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य प़ांगणात हे अधिवेशन होत असून तेथे २००० पत्रकार बसू शकतील असा भव्य मांडव घालण्यात येत आहे.. शरद पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.. अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.. पत्रकावर एस.एम.देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया सेलचे पुणे जिल्हा प़मुख जनार्दन दांडगे, तुळशिराम घुसाळकर, गणेश सातव आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत..

हम सब साथ है!

0

आता कोणताही पत्रकार एकाकी नाही
हम सब साथ है!

पुणे :मराठी पत्रकार परिषद ही केवळ पत्रकार संघटना नसून ते पत्रकारांचे कुटुंब आहे ही आमची भावना आहे.. त्यामुळे कुटुंबातील कोणताही सदस्य अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणे ही परिषदेला आपली जबाबदारी वाटते.. ही जबाबदारी परिषद आणि पुणे जिल्हा आणि हवेली तालुका पत्रकार संघाने काल पुन्हा एकदा कर्तव्य भावनेतून पार पाडली.. राज्यातील कोणताही पत्रकार एकाकी नाही आम्ही सारे त्याच्या बरोबर आहोत हा संदेश त्यातून दिला गेला.
.
४४ वे अधिवेशनात ज्या हवेली तालुक्यात होत आहे तेथील तालुका संघाचे एक सदस्य आणि पुण्य नगरीचे पत्रकार धनराज साळुंखे ( रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे ) यांच्या गळ्यात तीन  गाठी आल्या होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने गॅलक्सी रुग्णालय, डेक्कन जिमखाना, पुणे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्या गाठी काढून टाकल्या. शस्त्रक्रिया व त्यानंतरचे औषधोपचार यासाठी बराच मोठा खर्च येणार आहे. बहुतेक पत्रकारांची असते तशीच त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मराठी पत्रकार परिषद, पुणे जिल्हा पत्रकार संघ, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमधील १९९९ची बॅच तसेच हवेली तालुका पत्रकार संघाच्यावतीने ७६,००० रूपयांची मदत धनराजच्या कुटुंबियांकडे काल सुपूर्द करण्यात आली…
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस एम देशमुख , लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या हस्ते धनराज साळुंखे यांची पत्नी व मुलाकडे काल ही रक्कम सोपविण्यात आली.. यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया परिषदेचे जिल्हा प़मुख जनार्दन दांडगे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर, मार्गदर्शक तुळशीराम घूसाळकर आदि उपस्थित होते…

POPULAR POSTS

error: Content is protected !!