मुंबईला जोडणारे सारे महामार्ग चौपदरी झाले होते.मुंबई-नाशिक,मुंबई आग्रा,मुबई-पुणे मार्गाचा त्यात समावेश होता.पुण्याला राज्यातील अन्य शहरांना जोडणारे जसे पुणे-कोल्हापूर,पुणे औरंगाबाद,पुणे -सोलापूर हे मार्गही चौपदरी झाले होते.मात्र मुंबईला थेट दक्षिणेला जोडणारा मुंबई-गोवा महामार्गाकडं कोणाचंच लक्ष नव्हतं.स्थानिक राजकारण्यांनाही मुंबई-गोवा चौपदरी व्हावा अशी गरज वाटत नव्हती.त्यांचे आडाखे काही वेगळे असतीलही,पण रोज रस्त्यावर रक्ताचे सडे सांडले जायचे ते पाहून कोकणातील पत्रकार अस्वस्थ व्हायचे.अरूंद रस्ता,रस्त्यावरील वळणं,खराब रस्ते,वाढलेली प्रचंड रहदारी ही अपघाताची कारणं होती.रस्ता चौपदरी झाला तर वळणं निघतील,वाहतूक एकेरी होईल आणि अपघातही थांबतील अशी अपेक्षा होती.त्यामुळं संवेदनशील पत्रकारानी हा विषय हाती घेतला.या लढ्याचं नेतृत्व कऱण्याची संधी मला मिळाली.सतत चार वर्षे सनदशीर मार्गानं आम्ही आंदोलनं केली.रस्ता रोको,धऱणे,उपोषणं,लॉंग मार्च,मशाल मार्च ,मानवी साखळी असे सारे फंडे वापरले.थेट दिल्लीपर्यत धडक दिली.तेव्हा कुठं रस्त्याच्या पहिल्या टप्प्यला मंजुरी मिळीली आणि कामही सुरू झालं.पत्रकारांनी एखादा विषय हाती घेतला,त्यासाठी सतत चार वर्षे शांततेच्या मार्गानं लढा दिला आणि यश पदरात पाडून घेतल्यानं हे राज्यातलं एकमेव आणि अनोखं उदाहरण होतं.त्यामुळं प्रश्न मागी लागतोय म्हटल्यावर स्वाभाविकपणे आम्हाला आनंत झाला होता.या आनंदात आम्ही पेण येथे विजयी मेळावाही घेतला होता.पनवेलजवळच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मिटरच्या मार्गाच्या रूंदीकऱणाचं काम सुरू झालं.सुप्रिम आणि महावीर इन्फ्रस्ट्रक्चर या कंपन्यांना 900 कोटी रूपयांच्या या कामाचं टेंडर मिळालं.मात्र पहिल्या पासूनच या कंपन्यांनी कामाकडं दुर्लक्ष केल्याचं दिसून आले.अडथळे होतेच,पण कंपन्यांनाही उत्साह नव्हता.त्याचं लक्ष केवळ पैश्यावर होतं.केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले होते.त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता.अपघात वाढले होते.त्यामुळं “चौपदरीकऱण नको पण कुत्रे आवर ” अशी अवस्था रायगडकरांची झाली होती.त्याबद्दल संताप असताना आणि या कंपन्यांवर यासंदर्भात गुन्हे दाखल झालेले असतानाच या कंपन्यांनी आता तर गेली पंधरा दिवस झाले कामच बंद पाडले आहे.खरं म्हणजे जून 2015 मध्ये हे काम पूर्ण व्हायला हवे होते.आजपर्यत केवळ33 टक्केच काम झालंय.आजची गती बघता काम कितीदिवस चालेल सांगता येत नाही.कामाला जेवढा उशीर होईल तेवढं बजेट वाढणार आहे.
आश्चर्य म्हणजे नितीन गडकरी उरणला आले तेव्हा त्यांनी या महामार्गाचं काम वेगानं पूर्ण कऱण्याचं आश्वासन दिलं होतं.त्यानंतर त्यांनी रत्नागिरीत जाऊन इंदापूर ते रत्नागिरी या 3000 कोटीच्या दुस़ऱ्या टप्प्याच्या कामाचं भूमिपूजनही केलं होतं.” गडकरी हे रोडकरी” असल्यानं आता चिंता नाही अशीच पत्रकारांची समजूत होती.दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही.कारण कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत महामर्गाच्या कामांचा आढावा घेतला.त्यासंबंधीच्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यात त्यांनी मुबई-गोवा महामार्गाच्या कामाचा काही उल्लेख केल्याचे दिसत नाही.त्यान ी रत्नागिरी -नागपूर अशा नव्या 10 हजार कोटी रूपयांच्या मार्गाला मात्र मंजूरी दिल्याचे म्हटले आहे.या मार्गाचा थेट फायदा कोकणाला होइील असं वाटत नाही.पण जो मुंबई -गोवा महामार्ग कोकणाच्या विकासाचा महामार्ग होऊ शकतो त्या मार्गाकडं दुर्लक्ष करायचे,तो होणार नाही असं बघायचं आणि नव्या मार्गाची घोषणा करून कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचं ही नीती संतापजनक आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचं काम का बंद पडलंय? कळत नाही पण याची जी चर्चा कोकणात सुरू आहे ती खरी असेल तर ती चीड आणणारी आहे.कोकणात भाजपच्या वाट्याला केवळ पनवेलची एकच जागा आलेली आहे.ती देखील रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिगत करिष्म्यामुळे आलेली आहे.कोकणानं भाजपला ठेंगा दाखविला.जठार,विनय नातू हे भाजपचे महत्वाचे शिलेदारही चारीमुंड्या चित झाले.त्यामुळे भाजपचं नेतृत्व कोकणावर चिडलेलं आहे आणि त्यातून हे काम बंद पाडलं गेल्याची वदंता आहे.हे खऱं असेलच असं नाही पण भाजप राज्यात सत्त्वर येणं आणि लगोलग सुरू असलेलं काम बंद होणं यामागचा कार्यकारणभाव तपासणं नक्कीच आवश्यक आहे.एकीकडं प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत आहेत.त्यांच्या प्रश्नाकडंही सरकार मुजोरपणे दुर्लक्ष करतंय आणि आता तर कामच बंद आहे.ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारनं ताब्यात घेतल्यात ज्यांची घरं रूंदीकरणात पाडली गेली त्यानी आता याविरोधात कोर्टात जाण्याची गरज आहे.कंपन्या केवळ बजेट वाढविण्यासाठी वेळ लावत असताली तर रायगडमधील पत्रकार त्याविरोधात कोर्टाचे दरवाजेही ठोठवायला मागे पुढे पाहणार नाहीत.
मुंबई-गोवा महामार्ग झाला तर कोकणचा विकास होईल,रस्तयावरील अपघात थांबतील त्यामुळं या रस्त्याचं काम विनाव्यत्यय होणं ही काळाची गरज आहे.सरकार या कामाकडं राजकीय चष्म्यातून बघणार असेल तर कोकणातील पत्रकारांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याशिवाय मार्ग राहिलेला नाही हे नक्की. (SM)