राजकीय नेते जाहीर सभांमधून परस्परांवर टोकदार आरोप करीत असले तरी ते आतून कसे एक आहेत याचं एक छोटसं पण मासलेवाईक उदाहरण रायगडमध्ये बघायला मिळतं आहे.रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे निवडणूक रिंगणात आहेत.जिल्हा परिषदेच्या भावी अध्यक्षा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं.शिवतीर्थाचा त्यांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी अदिती तटकरे बिनविरोध निवडून आल्या पाहिजेत असा सुनील तटकरे यांचा प्रयत्न होता.रायगडात शेकाप बरोबर राष्ट्रवादीची युती आहे.त्यामुळं वरसे मधून शेकापनं माघार घेतली.त्यात नवल काही पण वरसे मधून शिवसेनेचे तालुका प्रमुख यांच्या पत्नी उभ्या होत्या मात्र बातमी अशी आहे की,त्यांनीही माघार घेतली आहे.शिवसेना कशी काय माघार घेऊ शकते हा प्रश्न जिल्हयात चर्चेचा आहे.मागे नगरपालिकेला शिवसेनेने रोहयातून पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा केला नव्हता.आता ही माघार गणित समजत नाही.आता तेथे राष्ट्रवादीची भाजप बरोबर लढत आहे पण तो उमेदवार एवढा दुबळा आहे की,अदिती तटकरे या राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणार्या उमेदवार ठरू शकतात.
वरसेमधून माघार घेणार्या शेकापनं खारगावमधून मात्र आस्वाद पाटील यांची उमेदवारी मागे घेतली नाही.तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवार आता अडचणीत आहे.शेकाप-राष्ट्रवादी युती असताना खारगावमधून उमेदवारी मागे घ्यावी यासाठी राष्ट्रवादीने दबाब आणला नाही.तिकडं विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरेंना देखील राष्ट्रवादीनं वार्यावर सोडलं आहे.तीच अवस्था कुरूळ मधील जनार्दन पाटील यांची.त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली गेली पण ती शेकाप निवडून यावा यासाठी .शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लढाईत शेकापचा उमेदवार निवडून यावा ही योजना होती.शेकाप-राष्ट्रवादी युती असताना कुरूळमध्येही शेकापनं माघार घेतली नाही.हे गेम प्लान लक्षात आल्यावर राष्ट्रवादीचे जनार्दन पाटील यांनी उमेदवारी तर माघारी घेतलीच पण पक्षाचाही राजीनामा दिला.घरातील उमेदवारांसाठी वाट्टेल त्या तडजोडी करणारे नेते इतर कार्यकर्त्यांना कसे वार्यावर सोडतात हे वरील उदाहरणांवरून दिसते.तरीही कार्यकर्ते मात्र जय हो चे नारे देण्यात धन्यता मानतात हे विशेष.–