पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यवस्थेच्या किंवा प्रस्थापितांच्या विरोधात उठविलेल्या आवाजाची किंमत नेहमीच मोजावी लागते.कधी ती धमक्यांच्या स्वरूपात असते,कधी ती थेट जिवघेण्या हल्ल्याच्या स्वरूपात असते,कधी आर्थिक कोंडीच्या स्वरूपात असते,तर कधी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करण्याच्या स्वरूपातली असते.आयबीएन-लोकमतला त्याच्यावर आज दाखल झालेल्या गुन्हयाच्या स्वरूपात ती मोजावी लागत आहे तर जळगावच्या जनशक्तीचे संपादक विक्रांत पाटील यांनीही पाचोऱ्याच्या आमदारानं केलेल्या दमदाटीच्या स्वरूपानं ती मोजावी लागत आहे.कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी ना आयबीएन-लोकमत त्याला भिक घालेल ना विक्रांत पाटील.माध्यमांवर एवढे हल्ले झाले तरी माध्यमं नेटानं आपलं काम करीतच राहिले आहेत.सामाजिक चळवळीतले कार्यकर्तेही गप्प बसलेले नाहीत.ज्यांचे हेतू शुध्द असतात त्यांना कोणाची भिती वाटत नाही,त्यामुळे त्यांना कोणाला भिकही घालण्याची गरज पडत नाही.
गेली पंचवीस वर्षे मी पत्रकारिता आणि चळवळीत आहे .या काळात व्यवस्थेच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधात बोलण्याची शिक्षा मला वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेली आहे.सर्वांना माहिती आहे की,अलिकडच्या काळात एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या विरोधात बोलल्यानं मला माझ्या 18 वर्षाच्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं होतं. त्यामागं माझी आर्थिक कोडी करून मला शांत कऱण्याचाच हेतू होता.हा हेतू शुद्द नसल्यानं तो यशस्वी झाला नाही.मी अनेक अडथळ्यावर मात करीत लढत राहिलो.माझ्या शेतातील उस कोणत्याही कारखान्याने नेऊ नये असाही प्रय़त्न अलिकडेच झाला.तो कटही वरच्या पातळीवरून रचला गेला होता.हे सारं कमी होतं म्हणून की,काय आता बदनामीचं हत्यार उपसलं जातंय.त्यासाठी काट्यानं काटा काढावा या न्यायानं पत्रकाराचाच ढालीसारखा वापर केला जातोय.
.मी एका वार्ताहराची तब्बल 200 रूपयांची फसवणूक केली अशी अशी एका पत्रकार मित्राची तक्रार आहे.वस्तुतः ज्या वार्ताहरानं ही तक्रार दिली आहे,त्याला मी ओळखतही नाही.किंवा त्याचं नाव ,ठावठिकाणाही मला माहिती नाही. ज्या मराठी पत्रकार परिषदेचा मी आज पदाधिकारी नाही त्या संस्थेचा विषय पुढं करून ही बदनामीची मोहिम सुरू आहे. 76 वर्षांची परंपरा असलेली आणि आचार्य अत्रे यांच्या पासून अनेक मान्यवर पत्रकारांनी ज्या संस्थेचं अध्यक्षपद भूषविलं ती पत्रकार परिषद अस्तित्वातच नाही असा जावाईशोध तक्रारदार पत्रकार मित्रानं लावलाय.एकीकडं या संस्थेचं अस्तित्वच नाकारणाऱ्या या पत्रकारानं दुसऱ्या बाजुला या संस्थेवर 2005 पासून धर्मदाय आयुक्त प्रशासक असाही दावा केलाय.धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार ज्या संस्थेच्या 2011 मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यानंतर जे पदाधिकारी निवडून आले तेच बोगस आहेत आणि त्यांना संस्थेचा कारभार चालविण्याचा,जिल्हा संघांची वर्गणी जमा कऱण्याचा कोणताही अधिकार नाही असेही तर्कट लढविले गेले आहे.तक्रारदाराच्या मागे जी मंडळी आहे त्यांना हे नक्की ठाऊक आहे की,मराठी पत्रकार परिषदेवर एकदा हातोडा मारला .या संस्थेबद्दलच संशयाचे वातावरण निर्माण केले की,देशमुख यांनी गेली काही वर्षे मोठ्या कष्टाने चालविलेली पत्रकारांच्या हक्काची चळवळ आपोआपच डॅमेज होईल. संस्थेला आणि त्या निमित्तानं देशमुख यांना बदनाम केले की,परिषदेलाही कुलूप लागेल.आणि पत्रकारांची चळवळ देखील पुन्हा एकदा नामशेष होईल.मात्र माझ्या पत्रकार मित्राच्या मागून कट-कारस्थानं कऱणाऱ्याचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही.कारण परिषदेचा मी आज पदाधिकारी नसलो तरी परिषदेला आम्ही सारे मराठी पत्रकार मातृसंस्था मानतो.त्यामुळे पत्रकार चळवळीच्या विरोधातले कुठलेही डावपेच आम्ही य़शस्वी होऊ देणार नाही.आमच्या विरोधात 200 रूपयांची फसवणूक क ेल्याची जी तक्रार आहे त्यामागचा तक्रारदाराचा आणि त्यामागच्या मास्टरमाईंडचा हेतू केवळ माझी बदनामी कऱण्याचा,जनमानसातील माझ्या स्थानाला धक्का पोहोचविण्याचा आणि त्यातून चळवळ बंद करण्याचा आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.
मी तक्रारदांरांना नम्रपणे सांगू इच्छितो की,मी बदनामीच्या अशा कोणत्याही प्रयत्नाला घाबरून घरी बसणार नाही,माझी चळवळही बंद होऊ देणार नाही.जो पर्यत महाराष्ट्रातील पत्रकारांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यन्त माझ्यावर केला जाणारा कोणताही प्रयोग यशस्वी यशस्वी होणार नाही.कोणी तरी उठावं,कोणाच्या तरी खादयावर बंदूक ठेवावी आणि खोट्या-नाट्या तक्रारीकरून चळवळीला मोडता घालण्याचा प्रयत्न करावा एवढी आमची चळवळ लेचीपेची नक्कीच नाही.अनेक संकटातून ताऊन-सुलाखून निघालेली आमची चळवळ कोणाला शरण जाणार नाही,व्यक्तिशा मी देखील कोणत्याही कट-कारस्थानाला भिक घालणार नाही हे येथे निक्षूण सांगतो.चळवळीसाठी अनेक दिव्यातून मी गेलो आहे. अशा स्थितीत कोण्या-लुंग्या शुंग्याच्या बदनामीच्या प्रयत्नावर महाराष्ट्रातील पत्रकार विश्वास ठेवतील असा कोणाचा भ्रम असेल तर त्यांनी तो दूर केला पाहिजे.कारण महाराष्ट्रातील पत्रकार मला गेली 30 वर्षे मला आणि माझ्या चळवळीला ओळखून आहेत.( SM)