पत्रकार शार्दुलला न्याय मिळाला..
निकित शार्दुलला या तरूण पत्रकाराला न्याय मिळवून देण्यासाठीची लढाई(?) आज अखेर यशस्वी झाली आहे.शार्दुलच्या वडिलांची ज्या पध्दतीने केइएममध्ये हेळसांड झाली त्याची पोस्ट व्हॉटस अॅपवर पडल्यानंतर ती महाराष्ट्रातील अक्षरशः हजारो ग्रुपवर फिरली.ही बाब काही भाजप नेत्यांनी मुख्यमत्र्यांच्या कानावर घातली.अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या घटनेची माहिती घेतली आणि शार्दुलच्या वडिलांवर मोफत आणि व्यवस्थित उपचार झाले पाहिजेत अशा सूचना आपल्या अधिकार्यांना दिल्या.त्यानुसार सीएमओतून केइएमचे डीन डॉ.सुपे यांना फोन गेला आणि शार्दुलच्या वडिलांवर नियमानुसार मोफत उपचार कऱण्याच्या आदेश दिले गेले.त्यानुसार आता सोमवारी शार्दुलच्या वडिलांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे.आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी असल्याने नक्कीच शस्त्रक्रिया यशस्वी होऊन ते ठणठणीत होऊन घरी परततील यात शंका नाही . एका पत्रकाराला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्टातील शेकडो पत्रकारांनी जी तडफ,जो आपलेपणा आणि जी एकजूट दाखविली त्याबद्दल आम्ही राज्यातील तमाम पत्रकारांचे आभारी आहोत.पोस्ट पडल्यानंतर अनेकांनी फोन करून डीन डॉ.सुपे यांची हजेरी घेतली.कित्येकांनी एसएमएस पाठवून जाब विचारला.त्यामुळे पत्रकारांची एकजूट आणि ताकद त्यांनाही दिसली आणि ते पुरते नरमले.शार्दुल यांनाही दोनशेच्यावर फोन गेले.आम्ही आपल्या पाठिशी आहोत हा विश्वास त्यांना दिला गेला.आर्थिक मदतीची तयारीही अनेकांनी दाखविली.त्यामुळे शार्दुलही ही भारावून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,हा विषय लाऊन धरणारे विनोद जगदाळे,किरण नाईक आणि राज्यातील तमाम पत्रकारांचे आम्ही आभारी आहोत.राज्यातील कोणत्याही पत्रकारावर जेव्हा अशी काही वेळ येईल तेव्हा आपणास अशीच एकजूट दाखवावी लागेल.
पत्रकार एकजुटीचा विजय असो.
एस.एम.देशमुख ,
अध्यक्ष
मराठी पत्रकार परिषद,मुंबई