मा.गो.वैद्य यांचा रविवारी ‘”जीवन गौरव” पुरस्काराने  सन्मान करणार 
मराठी पत्रकार परिषदेच्या अन्य पुरस्कारांचेही वितरण 
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही होणार सन्मान 
नागपूर दिनांक २१ ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ पत्रकार,विचारवंत मा.गो.तथा बाबुराव वैद्य यांचा येत्या रविवारी,२५ जून  रोजी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी भूषविणार आहेत.२५ हजार रूपये रोख.मानपत्र,स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिल्या जाणार्‍या अन्य पुरस्कारांचेही वितरण केले जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज येथे एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.   डॉ. हेडगेवार स्मारक समिती,रेशीमबाग येथील महर्षि व्यास सभागृहात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमास नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे,नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार आणि महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात पत्रकार संरक्षण कायदा करून राज्यातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची लढाई राज्यातील पत्रकारांनी  सलग बारा वर्षे लढली .या लढयातील महत्वाच्या घटनांची माहिती देणारे कथा एका संघर्षाची या एस.एम.देशमुख लिखित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी पत्रकारितेत उत्कृष्ठ काम करणार्‍या तरूण आणि ज्येष्ठ पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.माध्यम जगतात या पुरस्कारांना विशेष प्रतिष्ठा आहे. यावर्षी मा.गो.वैद्य यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.मा.गो.वैद्य यांच्याबरोबरच पत्रकारितेत उत्कृष्ठ कार्य करणार्‍या अन्य मान्यवर पत्रकारांचाही विविध पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे.त्यामध्ये  ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानिते केले जात आहे.११ हजार रूपये रोख स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आचार्य अत्रे पुरस्काराने महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी सुनील चावके यांना सन्मानित केले जाणार आहे.ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार यंदा लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी  संपादक गजानन जानभोर यांना जाहीर झाला आहे.मराठवाडयातील पत्रकारांसाठीचा नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार बीड येथील दैनिक चंपावतीपत्रचे मालक,संपादक नामदेवराव क्षीरसागर यांना जाहीर करण्यात आला आहे.
महिला पत्रकारांसाठी असलेल्या सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांची निवड करण्यात आली आहे.कोकणातील पत्रकारांसाठी असलेला उद्योगपती रावसाहेब गोगटे पुरस्कार यंदा सिंधुदुर्गमधील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत यांना दिला जाणार आहे. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कारासाठी रायगड टाइम्सचे युवा संपादक राजन वेलकर यांची निवड करण्यात आली असून भगवंतराव इंगळे पुरस्कार धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार तथा एकला चलो रे चे  संपादक गो.पी.लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.मुंबईतील तरूण पत्रकारासाठी यंदा पासून सुरू करण्यात आलेला स्व.शशिकांत सांडभोर पुरस्कार यंदा न्यूज  २४ चे ब्युरो चीफ  विनोद जगदाळे यांना घोषित करण्यात आला आहे.पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  दिला जाणारा शोध पत्रकारिता पुरस्कार  हितवादचे प्रतिनिधी    कार्तिक लोखंडे  यांना दिला जाणार आहे.
या पुरस्कारांव्यतिरिक्त राज्यात सर्वोत्कृष्ठ कार्य करणार्‍या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांचा गौरवही मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने केला जातो. पत्रकारांसाठीचे विविध उपक्रम राबवून राज्यात सर्वोत्कृष्ठ कार्य करणार्‍या पुणे जिल्हा पत्रकार संघाला यंदाचा पत्रमहर्षि रंगाअण्णा वैद्य उत्कृष्ठ जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार दिला जाणार आहे.,मानपत्र,स्मृतीचिन्ह असे या  पुरस्कारांचे स्वरूप आहे..याच कार्यक्रमात वसंतराव काणे उत्कृष्ट तालुका पत्रकार संघांच्या यापुर्वीच जाहीर झालेल्या पुरस्कारांचेही वितरण केले जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकातं देण्यात आली आहे.पत्रकावर परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर नागपूर विभागीय चिटणीस हेमंत डोर्लिकर तसेच अमरावती विभागीय सचिव राजेंद्र काळे नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमटवार आणि सरचिटणीस योगेश कोरडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
मा.गो.वैद्य यांचा अल्पपरिचय
माधव गोविंद तथा बाबुराव वैद्य यांचा जन्म ११ मार्च १९२३ रोजी वर्धा जिल्हयातील तरोडा येथे झाला.संस्कृत विषयात नागपूर विद्यापीठातून त्यांनी १९४६ मध्ये एम.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.नंतर त्यांनी माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनाचे कार्य केले.१९६६ ते १९८३ अशी तब्बल १७ वर्षे ते नागपूर तरूण भारतचे संपादक होते.नंतर  १९८३ ते १९९६ या काळात नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध संचालक आणि अध्यक्ष होते.हिंदुत्व आणि अन्य विषयांवरची त्यांची अनेक  पुस्तकं प्रसिध्द आहेत.स्पष्टोक्ते आणि निर्भिड पत्रकार अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.संघाचे बौध्दिक प्रमुख आणि अखिल भारतीय प्रचार प्रमुख या जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या.त्यांचे स्पष्ट आणि सडेतोड  अग्रलेख तसेच मागोवा हे सदर त्या काळात वाचकांसाठी एक आनंद पर्वणी असायची.प्रचलित विषयांवरची स्पष्ट मते जाणून घेण्यासाठी माध्यमं आजही उत्सुक असतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here