पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे, प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षांचे मत

0
836

पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे,
प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षांचे मत

महाराष्ट्रात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद सातत्यानं पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी करीत आहेत.महाराष्ट्राच्या राज्यपालांनीही पत्रकारांची ही मागणी अनेकदा उचलून धरत महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे अशी सूचना केली आहे.आता प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने देखील पत्रकारांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा झाला पाहिजे असा आग्रह धरला आहे.
गेल्या दोन दिवसात बिहार तसेच झारखंडमध्ये दोन पत्रकारांच्या निर्घृण हत्त्या झाल्या आहेत.महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात किमान पाच पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.या पार्श्‍वभूमीवर प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चंद्रमौळीकुमार प्रसाद यांनी स्वतंत्र कायद्याची सूचना केली आहे.पत्रकारांवरील हल्ल्याच्या 96 टक्के घटनांमध्ये पुढील कायदेशीर निवाडा होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले .आजही देशातील विविध न्यायालयात पत्रकारांवरील हल्ल्याची शेकडो प्रकरणे प्रलंबित असून त्याचे पुढे काय होते हे समजायला मार्ग नसल्याचे वास्तवही त्यांनी समोर मांडले आहे.बिहार तसेच झारखंडमध्ये झालेल्या पत्रकार हत्त्याचा ंप्रेस कौन्सिलने धिक्कार केला आहे.
संघटना गप्प
दोन दिवसात देशातील दोन पत्रकारांच्या हत्त्या झाल्यानंतरही देशभरातील पत्रकारांच्या प्रमुख संघटनांनी मात्र यावर मौन बाळगल्याचे दिसते आहे.ज्या पत्रकारांच्या हत्त्या झाल्या ते पत्रकार ग्रामीण भागातील होते,हाय प्रोफाईल नव्हते म्हणून या घटनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काही पत्रकारांनी केला आहे.महाराष्ट्रात मात्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने तातडीने या घटनांचा निषेध केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here