मुख्यमंत्र्यांची भेट

0
748
 पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल.
पत्रकार संरक्षण कायदा,पेन्शनचा प्रश्‍न
लगेच मार्गी लावणार ःदेवेंद्र फडणवीस
मुंबई दिनांक 16( प्रतिनिधी ) पत्रकार पेन्शन आणि पत्रकार संरक्षण कायद्याचा विषय लगेच मार्गी लावण्यात येईल असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने काल विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकारांच्या मागणीस लेखी पाठिंबा देणार्‍या नऊ खासदारांची आणि 116 आमदारांची पत्रे मुख्यमत्र्यांना सादर केली.या पत्राव्दारे सर्वपक्षीय आमदारांनी राज्यातील पत्रकारांना पेन्शन लागू करावी आणि पत्रकार संरक्षण कायदा करावा अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना समितीने पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजना तातडीने लागू कऱण्याची आग्रही मागणी केली.त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही विषय याच अधिवेशनात मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून ठराविक आणि बोटावर मोजण्या एवढ्याच आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते.त्यात बदल करून सर्वच आजारांसाठी मदत देण्याची तरतूद त्यात करावी अशी समितीची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.अधिस्वीकृती पत्रिका नसलेल्या परंतू ती मिळण्यास पात्र असलेल्या पत्रकारांनाही शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचा लाभ मिळावा अशी विनंतीही समितीने यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.
या शिवाय ज्या पत्रकारांचे वय पन्नास आहे आणि ज्यांचा अनुभव वीस वर्षांचा आहे अशा पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती पत्रिका देण्याबाबत आधिस्वीकृती समितीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी देखील तातडीने कऱण्याची एस एम देशमुख यांची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य करून तशा सूचना उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.यावेळी बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडाळात मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली,परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,तसेच सर्वश्री हेमंत बिर्जे,शरद पाबळे,शशिकांत सांडभोर, विनोद जगदाळे,बापूसाहेब गोरे,हरिष पाटणे,सुनील वाळूंज,संजय पितळे,दिलीप शिंदे,संतोष पवार,राहूल लोंढे, मिरगणे आदि पत्रकार उपस्थित होते.समितीच्या शिष्टमंडळाने नंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेतली.पत्रकारांच्या मागण्यांसदर्भात आपण सभागृहात प्रश्‍न उपस्थित करून त्याचा पाठपुरावा करू असे आश्‍वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
दरम्यान कालचे एस एम एस भडिमार आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा समितीने केला आहे.मुख्यमंत्री आणि दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना राज्यभरातून पंधरा हजारांवर एसएमएस पाठविले गेल्याने तीनही नेत्यांचे फोन बंद पडले होते.समितीच्या प्रसिध्दी पत्रकात नमुद कऱण्यात आले असून राज्यातील पत्रकारांनी समितीच्या आवाहनास जो भरभरून पाठिंबा दिला त्याबद्दल राज्यातील पत्रकारांचे तसेच पत्रकारांच्या मागण्यांना लेखी पाठिंबा देणार्‍या आमदार,खासदारांचे समितीच्या वतीन एस.एम.देशमुख यांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here