दीक्षितसर मला माफ करा..
पत्रकार असो की, अन्य कोणी व्यक्ती.. त्याच्या निधनानंतरच आपणास त्यांच्याबद्दलचा प्रेमाचे उमाळे येत असतात..व्यक्ती जिवंत असताना आपल्याला त्याचा चांगुलपणा कधी दिसत नाही.. त्याची चौकशी करायलाही आपल्याकडं वेळ नसतो. उदाहरण अनंत दीक्षित सरांचंच घ्या.. दीक्षितसर गेली दोन तीन वर्षे किडनीच्या विकाराने अंधरूनाला खिळून होते.. आर्थिक अडचणीत होते.. मी दोन तीन वेळा फोन केला तेव्हा “देशमुख पेन्शन कधी सुरू होणार”? अशी विचारणा त्यांनी केली होती.. त्यातून त्यांची आर्थिक स्थिती मला समजली होती.. मी एकदा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत मिळवू असे म्हणालो, मात्र त्यांच्या मुलीनं त्यास विरोध केला.. कदाचित हा विरोध त्राग्यातून केलेला असेल पण नंतर माझाही संपर्क राहिला नाही.. कोल्हापूरकरांना त्यांनी जे पत्र लिहिलंय ते संवेदनशील पत्रकारांच्या काळजाला घरं पाडणारं आहे.. त्यांनी या पत्रात आपण अनेकांना मदत केल्याचा उल्लेख केलेला आहे.. त्यांनी मदत केलेले देखील त्यांच्या अखेरच्या दिवसात त्यांच्याकडे फिरकले नाहीत.. हे त्यांच्या पत्रातून ध्वनित होतं.. त्यांनी ज्या वृत्तपत्रात संपादक म्हणून अापलया आयुष्याची अनेक वर्षे घालविली त्या पत्रांनी देखील त्यांना काही मदत केली असं झालं नाही..थोडक्यात आपण सारयांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं.. त्यामुळे अत्यंत असहाय अवस्थेत दिक्षित गेले.. आज मात्र आपण कोरडे उसासे टाकत त्यांच्याबद्दल उमाळे व्यक्त करतो आहोत.. . आपण सारे ढोंगी आहोत असं मला वाटतं.. मला अनेकदा प्रश्न पडतो की, माणूस हयात असताना जो समाज त्याची करता येईल तेवढी उपेक्षा करतो त्या समाजाला त्या व्यक्तीच्या निधनाची बातमी कळताच अचानक तय व्यक्तीचा मोठेपणा दिसतो, त्याच्याबद्दलच्या प्रेमाचे उमाळे येवू लागतात.. या सारयाला काही अर्थ नाही..
मी काही लगेच मरणार नाही.. पण मी गेल्यानंतर मला कोणी श्रध्दांजली वाहिलेलं अजिबात आवडणार नाही.. माणूस जिवंत असेपर्यंतच त्याच्यासाठी जे करणं शक्य आहे ते करावं असं मला वाटतं.. दीक्षित सरांसाठी काही करता आलं नाही.. याची खंत आहे.. दीक्षित सर मला माफ करा..
SM