Friday, April 26, 2024
Home Blog Page 2

मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

0

मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची उदासिनता यामुळे एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पत्रकारांनी महामार्ग चौपदरीकरणासाठी सतत पाच वर्षे आंदोलनं केली.. फलस्वरूप पनवेल ते इंदापूर या पहिल्या टपपयास २००७ मध्ये मान्यता मिळाली.. २०१०मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले.. बारा वर्षे झाली तरी ८१ किलो मिटरचं ८० टक्केच काम पूर्ण झालंय एवढंच सरकार सांगतंय.. इंदापूर ते झारप या टप्प्याच्या कामाचं असंच रडगाणं सुरू आहे..
एन. एच. ६६ म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? माहिती नाही.. यापुर्वी सरकारने सहा वेळा वायदे केले.. ते पूर्ण झाले नाहीत.. या संदर्भात सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळेस नॅशनल हाय वे अॅथोरिटीने मार्च २०२२ मध्ये महामार्गाचं काम पूर्ण होईल असं न्यायालयाला वचन दिलं.. मात्र जानेवारी२२ मध्ये गोव्यात एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी “२ वर्षात म्हणजे २०२४ ला काम पूर्ण होईल” असं सांगितलं.. कामाची कुर्मगती आणि अनेक पुलांची आणि बोगदयाचं रखडलेली काम बघता २०२४ ला तरी काम पूर्ण होईल का याबद्दल साशंकता आहे.
तब्बल १२ वर्षे झालीत.. का रखडला हा प्रकल्प? नितीन गडकरी यांनी जी कारणं दिलीत ती बघा.. गडकरी म्हणतात,” वन विभागाच्या परवानग्या वेळेत मिळाल्या नाहीत, आणि भूसंपादनही वेळेत न झाल्याने काम रखडलं” ही दोन कारणं असू ही शकतात पण, वारंवार ठेकेदार बदलत गेले, काहींना सरकारने टर्मिनेट केले, काहींनी स्वतः हून कामं सोडली, काही जण न्यायालयात गेले.. परिणामत कामाचा खेळखंडोबा झाला.. हे ही एक महत्वाचं कारण आहेच..
मुंबई – गोवा महामार्ग कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरू शकतो.. मात्र स्थानिक पुढारी या रस्त्याबाबत कायम उदासिन आहेत.. ४७५ हा महामार्ग १२ वर्षे रखडला, कोणत्याच नेत्याला, पक्षाला काही वाटत नाही? कोणी रस्त्यावर उतरत नाही, आंदोलन करीत नाही.. असं का? त्यांना अन्य प्रकल्पात रस आहे.. किनारपट्टीला चिकटून कोकण एक्स्प्रेस वे व्हावा..अशी स्थानिक नेत्यांची इच्छा आहे.. मध्यंतरी तर सरकारने सरकारने ७० हजार कोटींच्या “ग्रीन फिल्ड कोकण एक्स्प्रेस वे” ची घोषणा केली.. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारचे चांगलेच कान उपटले.. “मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही नव्या प्रकल्पांना परवानगी देणार नाही” अशी स्पष्ट तंबीच न्यायालयाने दिली.. राज्यकर्ते एनएच ६६ बाबत का उदासिन आहेत? . या संदर्भात हा लढा लढलेले ज्येष्ठ पत्रकार एस. एम देशमुख सांगतात, “किनारपट्टी भागात बहुतेक पुढारयांनी जमिनी खरेदी करून ठेवलेल्या आहेत. अशा स्थितीत या जमिनी जवळून सागरी महामार्ग गेला तर जमिनीला सोनयापेक्षाही जास्त दर येईल.. म्हणून सागरी महामार्गाचं खूळ.. सागरी महामार्गाला आमचा विरोध नाही पण त्याचा फायदा कोकणाला होणार नाही मुंबईहून थेट गोव्याला जाणारया पर्यटकांसाठी तो मार्ग सोयीचा होईल मात्र एनएच ६६ ही कोकणची जीवन वाहिनी आहे.. तेरा तालुके आणि अनेक पर्यटन स्थळं याच मार्गावर असल्याने कोकणच्या विकासाला गती येईल, पर्यटक वाढतील.. म्हणून या मार्गाचे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे”..
काम रखडलयाचे काय परिणाम होत आहेत? कोकणच्या विकासाला खिळ बसली, कोकणातले रस्ते जीवघेणे असल्याची प्रसिध्दी झाल्याने गेल्या काही वर्षात कोकणात येणारया पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली.. अगदी कोकणी माणसाला गावाकडं जायचं झालं तरी ते सातारा, कोल्हापूर मार्गे जातात.. एच एच ६६ वरून जाण्याची हिंमत करीत नाहीत.. त्याचा फटका कोकणी अर्थ व्यवस्थेला बसला.. चिंता वाटावी एवढ्या संख्येनं अपघात वाढले.. रस्त्यावर पडलेला राडा रोडा, गुडघ्याला लागतील एवढे खड्डे, अचानक समोर येणारे डायव्होर्सन आणि ट्रॅफिक जॅममुळे सतत अपघात होत असतात.. .. सरकारनेच न्यायालयात सांगितले की, “गेल्या दहा वर्षात झालेल्या ४५०० अपघातात २५०० निष्पाप पर्यटक किंवा स्थानिकांचे बळी गेले” .. जे कायम जखमी झाले त्यांची संख्या यापेक्षा किती तरी मोठी आहे.. प्रश्न आहे सरकार आणखी किती बळी जाण्याची वाट पहात आहे? नितीन गडकरी यांची प्रतिमा झटपट निर्णय आणि वेगवान काम करणारे मंत्री अशी आहे.. त्यांनी सावित्री नदीवरचा फूल अवध्या तीन महिन्यात बांधण्याचा विक्रम करून आपल्या कामाची चुणूक दाखविली होती.. अनेक महामार्ग त्यांनी निर्धारित वेळेपुर्वी पूर्ण करण्याचा पराक्रम केला.. मात्र मुंबई – गोवा महामार्गाच्या बाबतीत गडकरी देखील हतबल दिसतात.. निधीची कमतरता नाही असे वारंवार सांगितले जाते.. ते खरं असेल तर राजकीय इच्छा शक्तीची कमतरता हेच एकमेव कारण हा प्रकल्प रखडण्यामागं असू शकतं.. कारण पुणे – नाशिक मार्गाचं काम किती तरी उशिरा झालं, असंख्य अडथळे पार करीत ते वेळेत पूर्ण झालं मग कोकणावरच असा अन्याय का? असा संतप्त सवाल पत्रकार मिलिंद अष्टीवकर विचारतात.. “हा महामार्ग लवकर पूर्ण झाला नाही तर पत्रकारांना एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा रस्त्यावर उतरावे असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजनकर यांनी दिलाय” सरकार आमच्यावर ती वेळ येऊ देणार नाही अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त त्यांनी केलीय..

शोभना देशमुख, पत्रकार

पुन्ह एकदा पुष्पा

0

“पुष्पा” हा चित्रपट मला आवडला नाही हे मी यापुर्वीच स्पष्ट केलं आहे. इतर कोणाला तो आवडला असेल तर त्याबाबत माझी तक्रार नाही.. आवडीनिवडी भिन्न असू शकतात.. त्यावर बंधनं कोणी आणत नाही किंवा आणू ही शकत नाही..या मतांचा मी आहे..
माझा आक्षेप या चित्रपटात गुनहेगारीचं उदात्तीकरण करण्याला आहे.. “झुकुंगा नही” म्हणत वरिष्ठ पोलीस अधिकरयाला नागडं करणारा पुष्पा मला मान्य नाही.. यावर काही लोकांचं म्हणणं असंय की,” लाचखोर अधिकरयाला अशीच अद्दल घडविली पाहिजे..” क्षणभर हा युक्तीवाद मान्य करा पण ही अद्ल कोण घडवतोय? जंगलातील मौल्यवान चंदन विकून गबर झालेला तष्कर.. स्वतः गुन्हेगार असलेली व्यक्ती भ्रष्ट पोलीस अधिकरयाला नागडा कसं करू शकते…,? त्याचं समर्थन तरी कुठल्या तोंडानं करायचं? एखाद्या प्रमाणिक व्यक्तीनं असं केलं असतं तर एकवेळ त्याचं समर्थन शक्य होतं.. पुष्पाबाबत तसं नाही..एक गुन्हेगार सांगतोय समोरचा अधिकारी भ्रष्ट आहे.. आणि आपण त्यावर टाळ्या वाजवतो.. गंमत आहे..
अन्य एका मित्राचा आक्षेप असा की, “अन्य असे असंख्य सिनेमे आहेत की त्यातही गुनहेगारीचं समर्थन केलेलं दाखविलं आहे..त्यावर तुम्ही कधी बोलले नाही” .. एक तर फार सिनेमे पहायला मला वेळ मिळत नाही.. दुसरी गोष्ट अशी की, अनेक चित्रपट असे आहेत की, चित्रपटाच्या शेवटी सत्याचा असत्यावर विजय दाखविला आहे.. आपल्याकडे जशी म्हण आहे, “देर है लेकिन अंधेर नाही.” सिनेमात का होईन गुन्हेगाराचा खातमा झाल्याचा आनंद सामान्य प्रेक्षकांना होतो आणि ते आनंदाने टाळ्या वाजवतात.. पुष्पात फक्त अंधेरच आहे.. म्हणजे सारं करून सवरून एका गुन्हेगाराचा विजय दाखविला गेला आहे.. प्रत्यक्ष जीवनातही नंगानाच करणारयांना तुरूंगाची हवा खावी लागते.. अधिकरयाला नागडं करून इथं पुष्पा बोहल्यावर चढतो..यातून जिसकी काठी उसकी भैस हा संदेश गेला, गुन्हेगारीवृती वरचढ आहेत हे जाणवू लागले तर बेबंदशाही माजेल.. लहान मुलांवर त्याचे कोणते आणि कसे परिणाम होतील याचा विचार अंधपणे पुष्पांचं समर्थन करणारांनी करावा..ही विनंती..
पुष्पाचे जे कोणी निर्माते, दिग्दर्शक आहेत त्यांची माझी ओळख असण्याचं कारण नाही.. त्यामुळे माझा विरोध व्यक्तीव्देषातून आहे असे कोणी समजू नये.. “अन्य अशाच सिनेमांना का विरोध केला नाही”? या सवालातून हा भाव दिसतो म्हणून खुलासा…
मला करवीर तालुक्यातील नागाव येथील शाळेला विशेष धन्यवाद द्यायचे आहेत.. माझ्या वरील विवेचनाचा धागा पकडत त्यांनी आपल्या सुविचार फलकावर कोण, कुठला हा पुष्पा? तो कसा आमचा आदर्श होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे.. छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग हेच आमचे आदर्श आहेत असे शाळेनं ठणकावून सांगितलं आहे.. मुलांना अशा वहायरसपासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणारया नागाव विद्यालयाचे अनुकरण सर्वत्र व्हायला पाहिजे.. एवढंच..

मोदींचे एकही भाषण “कॉंग्रेस उल्लेख मुक्त” का नसते?

0

मोदींचे एकही भाषण “कॉंग्रेस उल्लेख मुक्त” का नसते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून फक्त कॉंग्रेस आणि कॉग्रेसलाच टार्गेट का करताहेत ? त्याचं एकही भाषण “कॉंग्रेस उल्लेख मुक्त” का नसते? एकीकडे कॉंग्रेस हा दुबळा, विकलांग झालेला पक्ष आहे म्हणायचे, पुढील शंभर वर्षे पक्ष सत्तेत येणार नसल्याचा शापही द्यायचा आणि टीकाही फक्त कॉंग्रेसवरच करायची… का? भाजपाला कॉंग्रेसची भिती वाटतेय का? तसं नसेल तर भाजपाला ध्यानी मनी कॉग्रेस का दिसतेय? जो पक्ष पुढील शंभर वर्षे सत्तेवर येऊ शकत नाही अशा “क्षुल्लक” पक्षाची पंतप्रधानांनी दखल घेण्याचं कारणच काय? कालचं मोदींचं संसदेतील भाषण बघा, पंतप्रधानांनी भाषणाचा जास्तीत जास्त वेळ कॉग्रेसवर टीकास्त्र सोडण्यात घालविला.. कॉग्रेसने देशभर कोरोना पसरविला, कॉंग्रेस ही तुकडे तुकडे गॅंगचं नेतृत्व करते इथपासून कॉग्रेसचा मेक इन इंडियाला विरोध असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले.. मला तुलना करायची नाही पण कालच्या पंतप्रधानांच्या भाषणापेक्षा अगोदरचे राहूल गांधी यांचे भाषण मुद्द्यांना धरून होते.. राहूल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरं देण्या ऐवजी पंतप्रधान त्यांच्यावर हल्ले करीत राहिले.. याचा अर्थ असा की कॉग्रेस कितीही विकलांग, विस्कळीत झाली असली आणि लता दिदी च्या अंत्ययात्रेस उपस्थित राहण्याचंही त्राण या पक्षात नसलं तरी भाजपला जळी स्थळी फक्त कॉंग्रेस दिसते.. भाजपावाले देखील हे वास्तव खासगीत मान्य करतात.. मग प्रश्न पडतो की, ज्या पक्षाचे संसदेत पन्नास खासदार देखील नाहीत अशा पक्षाला संसदेत विक्रमी बहुमत असलेला पक्ष का घाबरतोय? काही कारणं नक्की आहेत..
कोणत्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे, नाही, कुठे किती आमदार आहेत? हे सोडा.. कॉंग्रेसची पाळंमुळं देशभर खोलवर रूजलेली आहेत..हे वास्तव आहे.. कोणी काहीही म्हणत असले तरी एक गोष्ट सर्वांना मान्य करावी लागेल की, कॉंग्रेस हा एकमेव असा विरोधी पक्ष आहे की, जो आजही देशभर आपलं अस्तित्व टिकवून आहे.. ममता पश्चिम बंगाल पुरत्या , केजरीवाल यांचा करिश्मा दिल्ली पुरता , सपा, बसपा युपी पुरते तर ,जद, राजद बिहार पुरते, एआयडीएमके तामिळनाडू पुरते, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेर फारसं अस्तित्व नाही, अकाली दल पंजाब पुरता आहे… मोदींसाठी हे सर्व प्रादेशिक पक्ष आहेत.. त्यांच्या मर्यादा आणि महत्त्वाकांक्षा देखील मोदींना ठाऊक आहेत.. यापैकी कोणीही दिल्लीचे तख्त काबिज करायचे असा निश्चय करून राजकारण करीत नाही.. त्यांना फक्त आपली संस्थानं म्हणजे राज्ये सांभाळायची आहेत.. म्हणूनच मोदी जेव्हा या पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात जातात तेव्हाच त्यांच्या विषयी बोलतात .. राष्ट्रीय व्यासपीठावर त्यांची दखल ही ते घेत नाहीत.. कारण त्यांना त्यांचं भय नाही.. कॉंग्रेसचं असं नाही.. प्रदीर्घकाळ केंद्रात सत्ता उपभोगलेलया कॉंग्रेसला केवळ केंद्रीय सत्तेतच रस आहे.. हे मोदींना माहित असल्याने ते कॉग्रेसला शत्रू नंबर एक समजतात.. “कॉंग्रेस मुक्त भारत” या घोषणेमागचे सूत्र देखील हेच आहे..किवा पप्पू म्हणून राहूल गांधींची होणारी टिंगलटवाळी याच धोरणाचा भाग म्हणावा लागेल.. विरोधाभास असाय की, कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न पाहणारे भाजप नेते “कॉंग्रेस उल्लेख मुक्त” “भाषणही करू शकत नाहीत
आणखी एक मुद्दाय … कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी हे थेट नरेंद्र मोदी यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवितात..सत्तेचे वाभाडे काढतानाची त्यांची भाषा रोखठोक, स्पष्ट असते.. अन्य विरोधी नेते प्रसंगानुरूप, हातचं राखून मोदींवर बोलत असतात हे आपण वारंवार पाहिलं आहे.. काही पक्ष असेही आहेत की, ते विरोधात जरी असले तरी केंद्रीय सत्तेला सांभाळून असतात, केंद्राशी पंगा घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत.. काही पक्ष सोयीनुसार वारंवार भूमिका बदलत राहतात.. काही पक्ष तर चक्क मोदिंना घाबरतात, काहींना मोदींकडून काही मिळवायचेही असते.. कॉंग्रेस असं करीत नाही आणि ती तसं करूही शकणार नाही.. म्हणूनच कॉंग्रेसला ठेचण्याचा भाजपचा सतत प्रयत्न असतो.. कॉग्रेस एकदा उखडली गेली की, देश पातळीवर भाजपला आव्हान देणारा एकही पक्ष शिल्लक राहणार नाही.. हे भाजपला पक्कं माहिती आहे..

खरं म्हणजे केवळ भाजपलाच कॉंग्रेसचे भय आहे का? तर असं नाही .. अन्य विरोधी पक्षांना देखील कॉंग्रेसबद्दल आसुयाच, द्वेषच आहे.. म्हणूनच ते कॉग्रेसला वगळून विरोधी आघाडी बनविण्याची भाषा करतात.. तसं शक्य असतं तर प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेसला बाजुला ठेऊन विरोधी आघाडी केव्हाच केली असती.. तसे प्रयत्न करून पाहिलेही गेले.. ते यशस्वी झाले नाहीत.. विरोधकांना आघाडीचं नेतृत्व कॉग्रेसला द्यायचं नाही.. कॉग्रेस त्याला तयार होणार नाही.. या आघाडीच्या नेतृत्वासाठी शरद पवार यांच्यासह अनेकजण उत्सुक आहेत.. पण ते होत नाही.. मध्यंतरी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला गेला.. एक बैठक घेतली गेली, त्याचं निमंत्रण कॉंग्रेसला नव्हतं.. बैठकीचा आणि “कॉग्रेस वगळून” भूमिकेचा फज्जा उडाला..तेव्हा संजय राऊत यांनी जाहिरपणे मान्य केले की, “कॉग्रेसला वगळून देशात विरोधी आघाडी होऊ शकत नाही” .. याचा अर्थच असाय की, कॉंग्रेसचं महत्व आजही दोन्ही आघाड्यांवर टिकून आहे.. कॉग्रेस या संधीचा फायदा उठविण्यात कमी पडते हे सत्य आहे.. असं नसतं तर राहूल गांधी लता दिदी च्या अंत्यदर्शनासाठी आले असते.. कॉंग्रेसला वाटते दिदी हिंदुत्ववादी, सावरकरवादी होत्या.. असतीलही.. त्याचं काय? सवत:राहूल गांधी यांनी देखील आपण जाणवेधारी हिंदू आहोत असं जाहीर केलंच होतं की…मग? शिवाय दिदी फक्त सावरकरवादी नव्हत्या.. त्या भारतरत्न होत्या.. देश – विदेशातील कोट्यवधी रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले आहे.. अशा स्थितीत वैचारिक मतभिन्नता विसरून त्यांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी येणं अपेक्षित आणि अनिवार्य होतं.. ती संधी कॉंग्रेसने गमविली..ही जखम लता दिदींवर प्रेम करणारया प्रत्येकाच्या मनात कायम राहिल.. त्याचा फटका ही पक्षाला बसू शकतो.. कॉंग्रेस अशा चुका वारंवार करते, चुकांपासून काही शिकण्याची मानसिकताच या पक्षात नाही.. ही मानसिकता बदलली नाही तर मोदी म्हणतात तसे पुढील शंभर वर्षे कॉंग्रेस सत्तेवर येणार नाही..

एस. एम. देशमुख

गरळ ओकणारयांनो…

0

मृत्यूनंतर काही जण स्वरसमा्ज्ञी लता मंगेशकर यांच्याबद्दल गरळ ओकत आहेत..त्या गायीका म्हणून मोठ्या होत्या पण माणूस म्हणून त्या किती छोट्या होत्या हे सांगायला काहींनी सुरूवात केली.. काहींनी व्यावहारिक दृष्ट्या त्या किती कंजुष होत्या हे कथन सुरू केले.. इतरांनी त्यांच्या हिंदुत्ववादी, सावरकरवादी विचारसरणीवर आक्षेप घेतला.. एका पठ्टयानं तर शेतकरी आंदोलनास लता मंगेशकर यांनी पाठिंबा दिला नाही म्हणून जळजळ व्यक्त केली.. कोणी तरी म्हटलं की, त्यांनी नवीन गायकांना संधी मिळू दिली नाही..काहींनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला… इतरही अनेक आक्षेप घेतले गेले.. आपली मतं व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार कोणी नाकरत नाही.. मात्र लता मंगेशकर या भारतरत्न होत्या.. आपण त्यांच्या पासंगालाही पुरत नाही याचे वयवधानही पाळले जाऊ नये याचे आश्चर्य वाटते.. आक्षेप घेणारयांपैकी बहुतेकजण लता दिदींना कधी भेटले ही नसतील.. म्हणजे आक्षेप ऐकिव गोष्टीवर आधारित आहेत..

क्षणभर असं गृहित धरू की, सारे आक्षेप खरे आहेत.. पण या आक्षेपांना उत्तर द्यायला दिदी आहेत कुठे? मग कोणासाठी आपण हे सारं लिहितोय? मृत्यूनंतर वैर संपते असं म्हणतात पण काही आत्मे कायम द्वेष जपत असतात.. लता मंगेशकर काय? सचिन तेंडुलकर असू देत, अमिताभ असू देत, ट शाहरूख…नाही तर अण्णा हजारे.. त्यांचं महानपण कारण नसताना सहन न होणारे आत्मे आहेत.. शेतकरी आंदोलन हा लता मंगेशकर यांचा प्रांत आहे का? नक्कीच नाही.. मग आपण त्यांच्याकडून कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा कशी करू शकतो.. आजकाल काही मंडळी कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देत असते.. त्यांना आपण तोंडाळ म्हणतो.. दिदींनी असंच व्हायला पाहिजे होतं का?

बाबांनो, थांबा रे… कंडू शमवायला इतर अनेक विषय आहेत.. एका पुण्यत्माबद्गल त्याच्या पश्चात जहरी टिका – टिप्पणी योग्य नाही…

शुधांशू.. शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद

0

सुधांशूचं बालपण मी मस्त Enjoy केलं.. त्याच्या बालपणीचे क्षण छोटे छोटेच होते… पण ते कायम माझ्या हृदयाच्या कुपित घर करून बसलेत.. सुधांशूला सकाळी गुदगुल्या करून उठवणं, त्यानं डोळे उघडताच माझ्या गळ्याला मिठी मारणं, मग त्याला अलगत उचलून बाथरूममध्ये नेणं, ब्रश करणं, आंघोळ घालताना “थंडे थंडे पाणी से” सह चांगली गाणं बेसुरात गाण, त्याच्या बुटाला पॉलिश करणं, त्याला शाळेत सोडणं आणि घरी घेऊन येणं.. वगैरे.. केवळ जबाबदारी पार पाडायची म्हणून मी हे सारं कधी केलं नाही… त्यासाठी नोकर चाकर आमच्या दिमतीला होते.. पण हे सर्व करण्यात मला स्वर्गसुखाचा आनंद मिळायचा.. म्हणून मी ते करायचो..
दिवसभर शाळा, सायंकाळी फिरून आल्यावर थकलेला सुधांशू रात्री माझ्या कुशित एक पाय माझ्या अंगावर टाकून बिलगून बिनधास्त झोपायचा… तेव्हा वाटायचं “सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं” ..?

अलिबागला बीचच्या जवळच आम्ही राहायचो..पाच – साडेपाचच्या सुमारास हा पठ्ठ्या तिसरया मजल्यावरील आमच्या घराच्या खिडकीला लावलेल्या ग्रीलमध्ये बसून माझी वाट बघायचा… खाली गाडीचा हॉर्न वाजला की, बीचवर जायच्या तयारीला लागायचा.. टापटीप राहणं त्याला लहानपणापासून आवडतं.. बीचवर जाताना देखील इन वगैरे करून टाईट असायचा.. मग आम्ही सारेच बीचवर जायचो.. हा नित्यक्रम असायचा… बीचवर सागर, सुधांशू सह आम्हा तिघांची दंगामस्ती चालायची.. सुधांशू, सागर बरोबर खेळताना मी ही पोरसवदा व्हायचो.. तेव्हा शोभना म्हणायची “अरे काय चालवलंस हे.. लोक तुला ओळखतात आणि बघताहेत” … मला फरक पडायचा नाही.. कारण हे क्षण आयुष्यात परत येणार नाहीत हे मला पक्क माहिती होतं..तयामुळं माझ्या परिनं ते मी पुरेपूर Enjoy करीत होतो..बीचवर खेळुन झालं की, मग किनार्‍यावर येऊन आम्ही भेळपुरीवर आणि नारळपाणयावर ताव मारायचो..

कधी, कधी बिर्ला मंदीर, नागाव, आक्षी, आवास, माडवा अशी आमची मोटरबाईक राईड व्हायची… छोटा सुधांशू हिरो होंडीच्या समोरच्या टाकीवर मस्त पोटावर पडायचा, मोठा सागर आमच्या दोघांच्या मध्ये असायचा.. आम्हा चौघांना मोटरबाईकवरून फिरताना अलिबागच्या रस्त्यावरून, गल्ली बोळातून जाताना अलिबागकरांनी असंख्यवेळा पाहिलं आहे.. ..कालांतरानं आम्ही अलिबाग सोडलं.. पोरांच्या बालपणीच्या आनंदाच्या क्षणाची गाठोडी घेऊन पुणं गाठलं..

महानगरात आमचं रूटीन बिघडलं आणि अलिबागमध्ये अनुभवलेले क्षण पुन्हा वाट्याला येईनासे झाले… मुलंही मोठी होत होती.. शाळा, कॉलेज, त्यांच्या नोकरया हेच रूटीन झालं.. सुधा शू ही आता जॉबला लागला होता.. एक दिवस त्यांनं स्वकमाईतून महागडी बाईक घेतली.. आणि पहिली राईड मला घेऊन मारली.. स्पोर्ट बाईकवर बसताना हा पठ्ठ्या मला सांगतोय, “पप्पा सावकाश बसा, मला घट्ट पकडा” .. आता बोला? पण तो सांगेल तसं मी करत होतो.. तेही माझ्यासाठी सुखद अनुभूती देणारं होतं.. सुधांशूच्या मागे बसताना आमचे अलिबागचे दिवस आठवले आणि पोरं मोठी झाली.. हे कळलं देखील नाही याची गंमत वाटली..

पोरांना मी कधी मारलं नाही, किंवा रागावलोही नाही.. पण आज हे दोघेही मला दम देताहेत.. . “पप्पा तुम्ही आमचं ऐकतच नाही” ही सुधांशूची काळजीयुक्त कायम तक्रार असते..” कार्यक्रम, बाहेर फिरणं बंद करा” असं त्याचं सांगणं.. . तो सर्व सोशल साईटवर मला फॉलो करतो.. आणि माझ्यावर बारीक नजर ही ठेऊन असतो.. माझा मास्क नाकाच्या खाली दिसला की थेट फोन करून मास्क वर घेण्याची सूचना करणार .. कार्यक्रमात गर्दीत मिसळलो की तंबी देणार .. अर्थात हे सगळे नियम पाळणं अनेकदा शक्य होत नाही.. फोटो काढतानाही लोक मास्क काढायचा आग्रह धरतात.. अशा वेळेस हा धाकटा लंडनला असलेल्या मोठ्या भावाला फोन करून माझं त्याच्याकडं गारहाणं गातो.. .. मग रात्री दोघं भाऊ व्हिडीओ कॉल करून माझी शाळा घेतात.. त्याचं हे दटवणं, दरडावणं देखील माझ्यासाठी आनंद देणारं असतं . आपली मुलं आपली एवढी काळजी घेतात.. यापेक्षा एका बापाला आणखी काय हवं असतं? मग मी दोघांना शब्द देतो… ” बरं बाबांनो, यापुढं सारं बंद” … पण मला आणि त्यांनाही माहिती आहे की .. चळवळ हा माझा श्वास आहे.. अन हे सारं बंद होणं हे शक्य नाही..

अनेकजण मला विचारतात एस. एम. आयुष्यात तुम्ही काय कमविलं..? तुमच्या जागेवर आम्ही असतो तर… असे बोल ही काही जण बोलून जातात.. एक खरंय की, मला व्यवहार ज्ञान अजिबात नाही.. त्यामुळे लौकिकार्थाने मला काही कमविता आलं नाही.. त्याची खंत मला कधीच वाटली नाही.. .. परंतू सुविचारी, सुसंस्कृत अशी दोन्ही मुलं हीच माझी मोठी पुंजी आहे आणि त्याबद्दल मी आमच्या कुलस्वामिनीला कायम धन्यवाद देतो.. यासाठी मी स्वतः ला भाग्यवान ही समजतो..मुलं कर्तृत्ववान निघणं यापेक्षा माझ्या सारख्या एका पत्रकार, कार्यकर्त्यास आणखी काय हवंय?

सुधांशूचा आज वाढदिवस आहे..लता दिदींच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा असल्याने आम्ही तो साजरा करणार नाही.. मात्र आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद त्याला असू द्यावेत..
सुधांशू.. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद

पप्पा

प्रिय श्रेयलाटू

0

प्रिय श्रेयलाटू

मुंबई : न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे केवळ राजकारणातच आहेत असं नाही, असे महाभाग पत्रकारितेत देखील आहेत..चार – दोन जणांची संघटना स्थापन करायची, लेटर पॅड छापायचे आणि पत्रकारितेत जे काही चांगलं घडतंय ते आपल्या मुळेच अशी मिसाज मिरवत स्वतःची टिमकी वाजवायची..
सरकारच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या नावाने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन दिली जाते.. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वर्षावर आम्ही त्यांची भेट घेतली आणि पत्रकारांच्या आरोग्यासाठी एखादी योजना सुरू करावी अशी मागणी केली.. त्यानुसार त्यांनी “स्व. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” ची स्थापना करून त्यामध्ये दोन कोटी रूपये फिक्स डीपॉझिटमध्ये ठेवले.. त्या व्याजातून पत्रकारांना आरोग्य विषयक मदत केली जाऊ लागली.. मात्र हा निधी अपुरा पडू लागल्याने आम्ही पुन्हा नंतरचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आणि निधी पाच कोटी झाला.. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हा निधी २५ कोटी झाला.. दरम्यानच्या काळात पत्रकारांना पेन्शन देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला.. त्यानुसार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरू करून शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतील ठेवीतून पत्रकार पेन्शन दिली जाऊ लागली.. तरीही अनेक पात्र पत्रकारांना पेन्शनचा लाभ मिळत नाही असे दिसल्यावर निधीतील ठेव रक्कम किमान ५० कोटी करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली.. सरकारने १० कोटी मंजूर केले.. अर्थ मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात तशी घोषणा केली होती..
त्यानंतर १० कोटींचा हा निधी काल शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीकडे वर्ग करण्यात आला.. मात्र हे आमच्यामुळेच घडले अशी टीमकी काही श्रेय लाटू मंडळी वाजवू लागली.. “बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण निधी” अशा नावाची कोणतीही व्यवस्था नसताना सरकारने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण निधीत दहा कोटीची रक्कम जमा केल्याचे सांगितले जाते आहे.. बघा ज्यांना निधी कोणत्या व्यवस्थेत जमा झाला ते देखील माहिती नाही अशी मंडळी आमच्यामुळेच दहा कोटी जमा झाले असे सांगत आहे तशा बातम्या “अनेक झूट” मध्ये छापत आहेत..
अरे महाभागांनो, श्रेय लाटताना किमान पुरेसा अभ्यास तरी करा, जीआर तरी नीट वाचा.. पण जीआर नीट न वाचणारे दहा कोटी आमच्यामुळेच जमा झाले अशा थापा मारत आहेत.. अशा भूलथापांना कोणी बळी पडत नाही हा भाग वेगळा.. कारण राज्यातील पत्रकारांना हे पक्के माहिती आहे की, काम करणारे कोण आहेत आणि फुकटचे श्रेय लाटणारे कोण आहेत ते…

सातारयात पत्रकार भवन होणार

0

पत्रकारांचे सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे स्वप्न अखेर साकारले
खा. उदयनराजेंनी शब्द पाळला : सातारा पालिका सभेत झाला ठराव

सातारा :
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे पाहिलेले सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे स्वप्न अखेर साकारले आहे. 6 जानेवारी पत्रकार दिनी सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पत्रकार भवनाबाबत निर्णायक पावले उचलल्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी हाकेला साद दिली आणि सातार्‍यात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोडोली येथील साई मंदिरानजिक सातारा नगरपालिकेने बांधलेल्या इमारतीला जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन असे नाव देण्याचा ठराव प्रशासकीय सभेत घेतला. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन कोरोनानंतर धुमधडाक्यात जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदनाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात जिल्हा पत्रकार भवन अस्तित्वात नव्हते. गेली अनेक वर्षे जिल्हा पत्रकार भवन व्हावे यासाठी नुसत्या चर्चा झडत होत्या. प्रत्यक्ष जिल्हा पत्रकार भवन आकाराला येत नव्हते. शहरातील प्रशासकीय जागांची पाहणीही यापूर्वीही अनेकदा पत्रकार भवनासाठी करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे जागाही उपलब्ध झाली नाही. यावर्षीच्या 6 जानेवारीला पत्रकार दिनी जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात यासदंर्भात कृतियुक्त पावले टाकण्याचा निर्णय जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, परिषदेचे प्रतिनिधी सुजित आंबेकर, प्रसिध्दी प्रमुख दिपक शिंदे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, जीवनधर चव्हाण, गजानन चेणगे, संदीप कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे तुषार तपासे, ओंकार कदम, सोशल मिडियाचे अध्यक्ष सनी शिंदे व समस्त पत्रकारांच्या उपस्थितीत घेण्यात आला. जिल्हा पत्रकार भवनाबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार याच कार्यक्रमात सर्वानुमते हरीष पाटणे आणि विनोद कुलकर्णी यांना देण्यात आले. पाटणे आणि कुलकर्णी यांनी कार्यक्रमानंतर लगेचच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे जिल्हा पत्रकार भवनासाठी इमारतीची मागणी केली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी तातडीने त्यात लक्ष घातले. पत्रकार दिनीच शुभेच्छा देताना ‘मीच तुम्हाला जिल्हा पत्रकार भवन देतो,’ असे त्यांनी सांगून टाकले. यासंदर्भात तातडीने इमारतीचा शोध घेण्याची सुचना त्यांनी नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिली.
त्यानुसार सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील अकराही तालुक्यातून व जिल्ह्याबाहेरुनही येणार्‍या पत्रकारांसाठी सोयीचे ठिकाण ठरेल अशी गोडोली येथील साई मंदिरालगत असलेली सातारा नगरपालिकेने नुकतीच बांधून ठेवलेली इमारत जिल्हा पत्रकार भवनासाठी सुचवण्यात आली. चार मजली असलेल्या या इमारतीचा काही भाग साहित्य परिषदेलाही देण्यात यावा अशी मागणी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनेही केली. त्यानुसार या इमारतीला ‘जिल्हा पत्रकार भवन’ व ‘साहित्य सदन’ असे नाव देण्याचा ठराव सोमवारी सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला.
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पत्रकारांच्या निवासाची व्यवस्था, त्याखालच्या मजल्यावर पत्रकारांचे कार्यक्रम व पत्रकार परिषदा यासाठी हॉल, त्याखालच्या मजल्यावर सुसज्ज ग्रंथालय व तळमजल्यावर साहित्य परिषदेच्या उपक्रमांसाठी हॉल अशी रचना ठरवण्यात आली आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना ही संकल्पना कमालीची भावली असून त्यांनीही याबाबतच्या प्रक्रिया अपूर्ण असतील तर तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सध्या कोरोनाचा कालावधी आहे. कोरोनाचा कालावधी संपताच व इमारतीची रंगरंगोटी, सुशोभिकरण, निवास व्यवस्था व अन्य बाबींची पूर्तता करुन लवकरच धुमधडाक्यात सातारा जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन या इमारतीचे उद्घाटन व पत्रकारार्पण केले जाईल, अशी माहिती पाटणे व कुलकर्णी यांनी दिली.

चौकट
जिल्ह्यातील पत्रकारांच्या उपयोगी पडलो याचे मोठे समाधान : खा. श्री. छ. उदयनराजे
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी माझ्यावर जिवापाड प्रेम केले आहे. माझे व त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. सातारां जिल्हा पत्रकार भवनाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळला होता. मला माहित होतं, पत्रकारांचा अनेकजण फक्त वापर करुन घेतात. पत्रकारांना देण्याची वेळ येते तेव्हा सर्वांची चुप्पी असते. माझे मात्र ओठात एक, पोटात एक असे काही नसते. माझ्या मित्रांनी मला जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जिल्हा पत्रकार भवन मागितले आणि मी ते तातडीने देवू शकलो यातच फार मोठे समाधान आहे. लवकरच इमारतीतील अपुर्‍या बाबी पूर्ण करुन सुसज्ज असे जिल्हा पत्रकार भवन पत्रकारांच्या ताब्यात देवू, अशी प्रतिक्रिया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

मराठी पत्रकार परिषदेने मला सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्षपद दिले. पत्रकारांची आंदोलने, सामाजिक उपक्रम, गोरगरीब पत्रकारांना मदत असे काम जिल्ह्यातील सहकार्‍यांच्या मदतीने आतापर्यंत आम्ही करत आलो आहोत. या सर्व वाटचालीत जिल्हा पत्रकार भवन नाही याची खंत मनाला सातत्याने बोचत होती. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावे हे आपले स्वप्न होते. संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह सर्व सहकार्‍यांनी टाकलेल्या विश्वासाला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी साथ दिली. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो पत्रकारांचे स्वप्न साकारले जात आहे. माझ्या वैयक्तिक पत्रकारितेच्या संघटनात्मक वाटचालीत जिल्हा पत्रकार भवन ही कायमस्वरुपी नोंद राहिल याचा मला अभिमान आहे.
-हरीष पाटणे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघ

6 जानेवारीला पत्रकार दिनी सातार्‍यात जिल्हा पत्रकार भवन उभे करुन देण्याची जबाबदारी हरीष पाटणे व माझ्यावर सहकार्‍यांनी टाकली होती. याबाबत आम्ही तातडीने पावले उचलली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, सातारा पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आम्ही त्याच दिवशी दिलेल्या अर्जावर विचार केला. नगरपालिका सभेत ठराव करुन ही इमारत जिल्हा पत्रकार भवन व साहित्य सदन म्हणून पत्रकारिता व साहित्यविषयक उपक्रमांसाठी आम्हाला दिली जात असल्याचा निश्चितपणे आनंद व अभिमान वाटतो. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करण्यात त्यांचा मित्र म्हणून मला कृतीयुक्त सहभाग नोंदवता आला याचा अभिमान वाटतो.
विनोद कुलकर्णी
अध्यक्ष सातारा पत्रकार संघ
अध्यक्ष, साहित्य परिषद शाखा (शाहूपुरी)

अंबाजोगाई पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

0

मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई च्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा, 30 जानेवारीला वितरण

  आष्टीच्या सचीन पवार व परळीच्या प्रवीण फुटके यांना पुरस्कार जाहीर 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   मराठी पत्रकार परिषद, मुंबई शाखा अंबाजोगाई च्या वतीने “दर्पण दिन व मूकनायक दिन” सोहळ्याच्या निमित्याने देण्यात येणाऱ्या “स्व नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार” साठी आष्टी येथील दै पुण्यभूमीचे प्रतिनिधी सचीन पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर “स्व. मौलाना मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी परळी वैजनाथ येथील दै सकाळचे प्रतिनिधी प्रवीण फुटके यांची निवड करण्यात आली असुन या पुरस्काराचे वितरण 30 जानेवारी रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.
     मराठी पत्रकार परिषद, मुंबई शाखा अंबाजोगाई च्या वतीने व “स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी बीड जिल्ह्यातून प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. प्राप्त प्रवेशिकांच्या अवलोकना नंतर परिक्षकांनी दिलेल्या निकाला नुसार या पुरस्कारा साठी आष्टी येथील दै पुण्यभूमीचे प्रतिनिधी सचीन पवार यांची “बोंबला यंदा ग्रेजव्युट पोरांनी घेतली उचल, म्हणे सतरंज्या उचलण्याचा हा परिणाम” या वृत्त्ता साठी निवड करण्यात आली असुन परिषदेच्या वतीने मागवण्यात आलेल्या प्रवेशिका मधूनच “स्व. मौलाना मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात येत आले आहे. या पुरस्कारा साठी परळी वैजनाथ येथील दै सकाळचे प्रतिनिधी प्रवीण फुटके यांची “पतीच्या निधना नंतर समर्थपणे उद्योग सांभाळणारी दुर्गा” या वृत्त्ता साठी निवड करण्यात आली आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षाचे उदघाटन

   30 जानेवारी रवीवार रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणाऱ्या “दर्पण दिन व मूकनायक दिन” सोहळ्या निमित्य आयोजित पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधूनच अंबाजोगाई शहरात “मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेल्या “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षाचे उदघाटन” ही मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होत आहे. 
   या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा एस एम देशमुख सर ( मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद ) उदघाटक म्हणुन आ. नमिताताई मुंदडा (केज विधानसभा सदस्य) प्रमुख वक्ते म्हणुन ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज यांची तर प्रमुख अतिथी म्हणुन राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई न प), रमेशराव आडसकर (चेअरमन, आंबासाखर), राजेसाहेब देशमुख (अ भा. काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष, अमर हबीब(जेष्ठ पत्रकार), आप्पासाहेब जाधव (शिवसेना बीड जिल्हा प्रमुख), डॉ भास्कर खैरे (अधिष्ठाता स्वा रा ती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय), पो नि बाळासाहेब पवार (शहर पोलीस स्टेशन), पो. नि. वसुदेव मोरे (ग्रामीण पोलीस स्टेशन), ऍड शरद अण्णा लोमटे (अध्यक्ष वकील संघ व कायदेशीर सल्लागार म प परिषद), यांची उपस्थिती लाभणार असुन या प्रसंगी आपली उपस्थिती लाभणार असुन या कार्यक्रमात शहरातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. कोरोना नियमास अधीन राहून कार्यक्रम होणार असल्याने सर्वाना मास्क बंधनकारक आहे अशी माहिती दत्तात्रय अंबेकर (बीड जिल्हा कार्याध्यक्ष म प परिषद), डॉ राजेश इंगोले (वैद्यकीय कक्ष प्रमुख) जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी, हनुमंत पोखरकर, एम एम कुलकर्णी, गजानन मुडेगावकर (अंबाजोगाई तालुका अध्यक्ष), नागेश औताडे, (तालुका कार्याध्यक्ष) विरेंद्र गुप्ता (सचिव), सतिश मोरे कार्यक्रम प्रमुख  गोविंद खरटमोल (प्रसिद्धी प्रमुख) यांच्या सह मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी केले आहे.

योगेशला मदत करा…

0

आपली मदत पत्रकार योगेशचे प्राण वाचवू शकते

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष योगेश कोरडे हे कॅन्सरशी झुंज देत आहेत.. उपचारासाठी होणारा मोठा खर्च आणि बेताची आर्थिक स्थिती यामुळे योगेशला आर्थिक मदतीची गरज आहे.. पैसे नसल्याने योगेशला उपचार अर्धवट सोडून रूग्णालयातून डिस्चार्ज घ्यावा लागला.. परिषदेने त्यांच्या उपचारासाठी ११००० रूपयांची तसेच व्यक्तीगत मी १००० रूपयांची मदत केली आहे.. अन्य काही मित्रांनी देखील मदत केली आहे.. मात्र ही मदत फारच तुटपुंजी असल्याने सर्वांनी सढळ हस्ते मदत करणे आवश्यक आहे.. .. योगेशकडे अधिस्वीकृती नसल्याने सरकारी योजनेतून त्यांना मदत मिळत नाही.. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही त्यांना मदत मिळाली नसल्याने योगेशचे कुटुंब हतबल झाले आहे..
तेव्हा आपल्या या मित्राच्या, तरूण पत्रकाराच्या मदतीला धावून जाणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.. तेव्हा please ज्यांना शक्य आहे अशांनी योगेशला मदत करावी.. त्यांचा खाते क़मांक तसेच फोन पे साठीचा नंबर खाली दिला आहे..

Yogesh nanaji Korde
Union bank kalmeshwar
A.c.no.669202010003317
IFSC CODE UBIN0566926
Phone pay 9767000200

एस.एम.देशमुख

हेच खरे बाळशास्त्री…

0

हेच खरे बाळशास्त्री

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन 18 मे 1846 रोजी झालं.. 175 वर्षे उलटली आहेत या घटनेला. .. त्यामुळे बाळशास्त्रींचं मुळ छायाचित्र उपलब्ध असण्याची शक्यता नाही.. गुगलवर त्यांची वेगवेगळी चार छायाचित्रे दिसतात… प्रत्येक छायाचित्रकाराने ती आपल्या कल्पनेतून साकारलेली आहेत.. बाळशास्त्री कसे होते हे तर आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही. पण गुगलवरून छायाचित्र उचलताना आणि ते वापरताना आपण याचा जराही विचार करीत नाही की जे छायाचित्र आपण उचलले आहे ते बाळशास्त्रीच्या व्यक्तीमत्वाच्या जवळपास तरी जाणारे आहे की नाही..? . गुगलवर फिरणारया चित्राच्या छायाचित्रकारांनी ती साकारताना बाळशास्त्रींच्या व्यक्तीमत्वाच्या अभ्यास केलेला आहे असे दिसत नाही.. कोणी तरी सांगितले आणि चित्र रेखाटले असे या चित्रांचे स्वरूप दिसते .. त्यामुळे बहुतेक चित्रातील बाळशास्त्री साठी ओलांडलेले म्हणजे वयोवृद्ध, थकलेले,कृश, निस्तेज वाटतात.. बाळशास्त्री तसे नव्हते.. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते.. म्हणजे अत्यंत तरूण वयात ते गेले.. ते नियमित व्यायाम करीत असल्याने त्यांची शरीरयष्टी पिळदार होती.. प्रकांड पंडित असलेल्या बाळशास्त्रींची विद्वतता त्यांच्या चेहरयावर विलसत होती.. तारुण्यसुलभ आत्मविश्वास त्यांच्या चेहरयावर आणि व्यक्तीमत्वात दिसत होता..ते रूबाबदार होते.. प़सिध्द चित्रकार मुकुंद बहुलेकर यांनी वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करून बाळशास्त्रीचे छायाचित्र रेखाटले.. 2000 साली पुणे येथील बालगंधर्व मध्ये झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक़मात या छायाचित्राचे प्रकाशन शिवसेना प़मुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी हेच खरे बाळशास्त्री” अशा शब्दांत या छायाचित्रावर मान्यतेची मोहर उठविली होती.. शिवाय चित्रकार बहुलेकर यांना मंचावर बोलावून त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप मारली.. बाळासाहेब हे विख्यात चित्रकार, व्यंगचित्रकार आणि पत्रकार होते.. त्यांनीच चित्रास मान्यता दिल्याने मराठी पत्रकार परिषदेने हेच छायाचित्र तेव्हापासून वापरायला सुरूवात केली.. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ देखील हेच छायाचित्र वापरत आहेत.. महाराष्ट्र सरकार 6 जानेवारीला जाहिरातीमधून बाळशास्त्रींचे बहुलेकर यांनी रेखाटलेले चित्र वापरत आहे.. म्हणजे सरकारने देखील या छायाचित्रास मान्यता दिलेली आहे.. त्यामुळे आता कोणी छायाचित्रावरून वाद उकरून काढू नये..
मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यामुळे बाळशास्त्रींच्या नावाचा थोर व्यक्तींच्या नावाच्या यादीत समावेश करण्यात आला, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेच्या अथक पाठपुराव्यामुळे सरकारने साडेपाच कोटी रूपये खर्च करून ओरस येथे बाळशास्त्रींचे भव्य स्मारक ऊभारले आहे. ..त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे.. मुंबई गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचं नाव देण्याची मागणी देखील परिषदेने लावून धरल्याने काही आत्मे अस्वस्थ झाले असल्यास नवल नाही.. त्यातून चुकीचे छायाचित्र माथी मारण्याचा प्रयत्न होतो आहे.. तो सर्वथा अनुचित आणि गैर आहे.. महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना आमची विनंती आहे की, बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य केलेलेआणि मुकुंद बहुलेकर यांनी रेखाटलेले सोबतचे छायाचित्र येत्या ६ जानेवारी रोजी दर्पण दिनी वापरावे .. कारण हेच छायाचित्र बाळशास्त्रींच्या व्यक्तीमत्वाजवळ जाणारे छायाचित्र आहे…

एस.एम.देशमुख

POPULAR POSTS

error: Content is protected !!