सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही-पवार

0
689

अलिबाग- महाराष्ट्रातील भाजपचे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही त्यामुळे आम्ही सरकार पाडणार असल्याचा प्रचार चुकीचा आहे मात्र सरकार जनहिताची आणि राज्याच्या हिताची भूमिका घेणार नसेल तर विधिमंडळात तसेच रस्त्यावर उतरून आम्ही समर्थ विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.
अलिबाग येथील राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप करताना शरद पवार यांनी आपल्या कालच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा आरोप केला.आम्ही सरकार अस्थिर करणार असल्याचा जावईशोध लावला गेला ते जरा अती झाले असा टोलाही पवार यांनी लगावला.लोकहिताची भूमिका घेणे म्हणजे सरकार पाडणे असे होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.प्रॉडक्ट कसे आहे ते माहित नाही पण मोदींचे मार्केटिंग चांगले आहे.मात्र त्याचा नेहमीच प्रभाव पडतो असे नाही.बारामती,तासगाव,एरंडोल,बीड आदि ठिकाणी मोदींच्या सभा झाल्यानंतरही राष्ट्रवादीचे उमेदवार यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मिडियाचे महत्व लक्षात घेऊन सोशस मिडियाच्या वापरावरही अधिक लक्ष केंद्रात करण्याबरोबरच येत्या काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पक्षात सुसंवाद वाढविण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
राष्ट्रवादीच्या दोन दिवसाच्या वेध भविष्याचा या चिंतन शिबिराचा आज समारोप झाला.आज सकाळी झालेल्या पहिल्या चर्चासत्रात जयंत पाटील,छगन भुजबळ,सुप्रिया सुळे सुनील तटकरे आदि मान्यवरांनी आपले विचार मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here