संपादकाचा शेजारी दैनिक वाचतो का ?

0
1383

इंडियन रिडर्स सर्व्हे (आयआरएस) ची आकडेवारी जाहीर झाली आहे. देशभरात सर्वाधिक वाचक संख्या असलेले आणि प्रादेशिक भाषांमध्ये क्रमांक एकसाठी चढाओढ करणारे दैनिक आपापले ढोल बडवायला लागले आहेत. कोणत्या प्रांतात आणि भाषेत आम्हीच कसे नंबर वन हे सांगण्याची जाहिरात स्पर्धा सुरु झाली आहे. वाचकांसाठी हा सुध्दा गमतीचा भाग असतो.

छापिल माध्यमांच्या प्रभावाची आकडेवारी प्रामुख्याने दोन प्रकारात मोजली जाते. दैनिकाचा खप नेमका किती आहे, हे तपासण्याचे काम एबीसी (अॉडिट ब्युरो अॉफ सर्क्युलेशन) ही संस्था करते. किती अंक रोज छापला जातो आणि किती एजंटांच्या मार्फत किती वाचकांपर्यंत पोहचतो याची तपासणी एबीसीची यंत्रणा करते. प्रत्यक्ष छापिल अंक, अंक वितरणाचे पार्सल, प्रत्यक्ष एजंट, अंकाचे बील, आणि अंक परतीचे प्रमाण यावर एबीसीची आकडेवारी ठरते. ही आकडेवारी म्हणजे अंकाचा प्रमाणित खप समजला जातो. विविध सेवा, उत्पादने याच्या जाहिरात देणाऱ्या संस्था एबीसीची आकडेवारी पाहून प्रादेशिकस्तरावर दैनिकाची निवड करतात. मात्र, बहुतांश दैनिकांच्या प्रकाशन संस्था एबीसी प्रमाणपत्र घेण्यास नकार देतात, कारण प्रत्येक अंकाचा कागदोपत्री हिशोब लावताना अनेक प्रकारच्या जुळवण्या केलेल्या असतात. त्याचे गुपित बाहेर येण्याची शक्यता असते.

एबीसी प्रमाणपत्राद्वारे केवळ अंक विक्री निश्चित होते. पण एक अंक किती वाचक वाचतात हे ही जाणून घेण्याची उत्सुकता दैनिकांच्या व्यवस्थापनाला असते. जसे एका घरात एक दैनिक घेतले जात असेल तर ते किती जण वाचतात ? किंवा एखाद्या ब्युटी पार्लर अथवा सलूनमध्ये एक दैनिक दिवसभरात किती ग्राहक चाळतात ? असाही विषय असतो. हाच विचार करुन सन १९९५ पासून इंडियन रिडर्स सर्व्हे सुरु झाला.

हा सर्व्हे काय असतो, तर देशभरातील दैनिकांचे वाचक किती आहेत हे शोधण्याचा प्रयत्न यातून केला जातो. इंग्रजी, हिंदी या प्रमुख भाषांसह प्रादेशिक भाषांमधील गुजराती, मराठी आणि तामिळ भाषांमधील दैनिकांची वाचक संख्या जाणून घेण्याची उत्सुकता या सर्व्हेच्या आकडेवारीत असते. एमआरयुसी (मीडिया रिसर्च युजर्स कौन्सिल) ही संस्था इंडियन रिडर्स सर्व्हेचे काम करते. अलिकडे आयआरएस २०१७ चा निष्कर्ष जाहिर झाला आहे. यातील सर्वांत आशादायक बाब म्हणजे, भारतात १२० कोटी लोकसंख्येत दैनिकांच्या वाचकांची संख्या ४० कोटी पर्यंत वाढल्याचा अंदाज या सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. देशभरातील जवळपास ३ लाख ३० हजार वाचकांपर्यंत ४ टप्प्यात प्रश्नावली व संगणकीय नोंदी अशा दुहेरी पध्दतीने कुटूंब आणि व्यक्तिगत प्रकारात सर्व्हेक्षण करुन सुधारित पध्दतीने निष्कर्ष काढल्याचा दावा करण्यात आला आहे.

जगभरात छापिल माध्यमांची वाचक संख्या घसरत असल्याचे सर्व्हेक्षणाचे अहवाल असताना भारतात दैनिकांची वाचक वाढते आहे, हा निष्कर्ष समाधान देणारा आहे. या बरोबरच मराठी दैनिकांचे वाचक वाढत असल्याचाही निष्कर्ष आनंद देणारा आहे.

आयआरएसच्या आकडेवारी विषयी यापूर्वी माध्यम संस्थांनी आक्षेप घेतले होते. सन २०१४ मधील निष्कर्षावर टीकेची जोरदार झोड उठल्यानंतर आयआरएसचे काम जवळपास दोनवर्षे ठप्प झाले होते. सर्व्हेक्षणाच्या पध्दतीत सुधार व्हावा या अपेक्षेसह अनेक माध्यम संस्थांनी आयआरएसमधून अंग काढले होते. अखेर सन २०१६ मध्ये विश्वासार्ह, संगणकीय नोंदी, अॉडीओ व्हिडीओ आणि अचानक तपासणी अशा नव्या पध्दतींचा वापर करीत सन २०१७ चा आयआरएसचा निष्कर्ष समोर आला आहे. सन १९९५ च्या सर्व्हेक्षणात १ लाख ६५ हजार वाचक अभ्यासले होते. सन २०१७ मध्ये ही संख्या ३ लाख ३० हजार आहे. यात २ लाख १४ हजार शहरी व १ लाख १६ हजार ग्रामीण आहेत. जवळपास ६०० प्रकाशने व ७१ उत्पादनांविषयी माहिती विचारली गेली. २८ राज्ये ४ केंद्रशासित प्रदेश, ९५ महानगरे (५ लाखांवर लोकसंख्या), ९१ जिल्हे आणि १०१ जिल्हा समुह या ठिकाणी हे सर्व्हेक्षण केले गेले. हा सर्व प्रचंड व्याप पाहता वाचकांच्या मनांत काही प्रश्न असतातच.

आयआरएसच्या सर्वेक्षणात एक बाब स्पष्ट केली जात नाही. ती म्हणजे दैनिकाच्या वाचनासंदर्भात वाचकाला नेमके काय विचारले जाते ? यातून वाचकाच्या वाचन विषयक सवयी समोर येवू शकतात. परंतु सर्व्हेक्षणाचा गट समुह हा अवाढव्य म्हणजे ३ लाख ३० हजारच्या जवळपास असल्याने असे विश्लेषणात्मक सर्व्हेक्षण शक्य होत नाही. आयआरएसमध्ये बहुतेकवेळा वाचकाला दैनिकाचे केवळ ब्रैण्डनेम दाखवले जाते. या दैनिकाला आपण ओळखता का ? आणि तुमच्या घरात किती वाचक आहेत ? या दोन प्रश्नांवरुन वाचक संख्या निश्चिती होते असे अनुभवी मंडळी सांगते. म्हणजेच दैनिकाच्या आशयावर चर्चा न करता दैनिकाला ओळखता का आणि वाचता का ? याच जुजबी प्रश्नातून सर्व्हेक्षण होते असे दिसते. आयआरएसचे सविस्तर विवरण अद्याप समोर यायचे आहे.

एबीसी प्रमाणपत्राची आकडेवारी आणि आयआरएसची आकडेवारी याचा बहुतेकवेळा ताळमेळ बसत नाही. अंकाचा खप दाखवणारी आकडेवारी मोठी असली तरी वाचक संख्या जुळत नाही. हेच वेगळेपण लक्षात घेवून माध्यम संस्था एबीसीत अव्वल आणि आयआरएसमध्ये अव्वल असे भिन्न दावे करतात. याच प्रकारामुळे सर्व्हेक्षणाविषयी शंका निर्माण होतात. कधीकधी एबीसी आकडेवारीत एक दैनिक आणि आयआरएस सर्व्हेक्षणात दुसरे दैनिक अग्रेसर असा गमतीचा भाग असतो.

एबीसी आणि आयआरएस वगळून सरकारी जाहिरातींसाठी डीएव्हीपी (डायरेक्टोरेट अॉफ ॲडव्हर्टाईजमेंट ॲण्ड व्हिज्युअल पब्लिसीटी ) हा विभाग दैनिकांचा खपही स्वतः ठरवून सरकारी जाहिरातींचा दर व जाहिरात संख्या निश्चित करतो. एबीसी किंवा आयआरएस ची आकडेवारी न पाहता दैनिके खपाविषयी जो तपशील सादर करतील त्यावर डीएव्हीपी दर ठरवला जातो.

दैनिकांच्या खपासंदर्भात सर्व्हेक्षण काहीही असले तरी सध्या संपादकाचे नाव, लिखाण आणि दैनिकाची भूमिका यावर अंकाचा खप वाढणे जवळपास बंद झाले आहे. मराठी दैनिकात आज केवळ लोकसत्ता हे दैनिक आमच्या संपादकिय पानातील लेख वाचक वाचतात अशी जाहिरात करताना दिसते. बाकी इतर दैनिकांचा खप वाढविण्यासाठी सवलत दराचीच योजना जवळपास सर्वजण राबवतात.

मध्यंतरी मी एका साखळी दैनिकात सहयोगी संपादक असताना मालकाने सर्व संपादकांना तुमचे अग्रलेख कोण वाचतात ? असा प्रश्न केला. यावर गांगरलेली मोठी मंडळी म्हणाली सर्वच वाचक वाचतात. त्यावर मालकाने पुन्हा विचारले, मग तुम्हाला अग्रलेखावर वाचकांची किती पत्रे येतात ? अर्थात यावर दोन-चार हे उत्तर होते. मालकाने पुन्हा विचारले, आपण लाखोंचा खप म्हणतो आणि आपल्या अग्रलेखावर ५/५० वाचकपत्र लिहितात हे कसे ? अग्रलेखाचे पान बंद करुन तेथेही बातम्या देण्याचा विचार करायला हवा. अर्थात, यावर संपादकांचा अभिमान दुखावला. चर्चा थोडी भरकटली. पण युवा मालक हा चलाख होता. त्यांनी अखेरचा प्रश्न केला, जर तुमचा अग्रलेख वाचनिय असेल तर तुम्ही निवास करतात त्या कॉलनीत किंवा तुमचे शेजारी आपला अंक घेता का ? यावर मात्र अनेक संपादकांनी चुप्पी साधली. कारण, नवाज शरीफ किंवा बराक ओबामाला सल्ले देणाऱ्या काही संपादकांना कॉलनीतील वाचक ओळखतही नव्हते ही वस्तुस्थिती होती. मालकाने शेवटी पुन्हा खोड काढली. ते म्हणाले, तुमच्या शेजारी किमान १० अंक तुम्ही सुरु केले असे वितरण विभागाला सांगा. हे ऐकल्यानंतर बरेच संपादक शांत बसले. संपादकांच्या लेखणाविषयी ही आजची बोलकी अवस्था आहे.

आयआरएस किंवा एनआरएस (नैश्नल रिडर्स सर्व्हेक्षण) मध्ये दैनिकाचे केवळ ब्रैण्डनेम दाखवून सर्व्हेक्षण केले जाते हे म्हणूनच चांगले आहे. अन्यथा अग्रलेखांचा दर्जा आणि त्यांची बाष्कळ मांडणी यावर वाचक उघड बोलायला लागले तर भल्या भल्यांना निवांत बसण्याची वेळ येईल.

@ दिलीप तिवारी यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here