वाढदिवस की काढ दिवस?

0
1141
‘दूरदर्शन’ या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीला सोमवारी ५५ वर्षे पुरी होत आहेत. माध्यमांच्या प्रसाराचा सध्याचा वेग पाहता हा कालावधी बराच प्रदीर्घ आहे. या काळात ‘दूरदर्शन’ची प्रत्येक प्रादेशिक भाषेत स्वतंत्र चॅनल्स निघाली. याशिवाय, संगीतापासून संसदेच्या कामकाजापर्यंत आणि शिक्षणापासून शेतीपर्यंत अनेक विषयांना वाहिलेल्या वाहिन्या दूरदर्शनने सुरू केल्या. हा पसारा विस्तृत आहे. १५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. पुढे अमृतसर आणि मुंबई या दोन शहरांपर्यंत दूरदर्शन पोहोचण्यास १९७२ साल उजाडले. १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि ‘नॅशनल ब्रॉडकास्टर’ ही दूरदर्शनची ओळख रुजली. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. नंतर सगळ्या राष्ट्रीय चर्चांमध्ये दूरदर्शनचे स्थान नगण्य होत गेले. सरकारने दूरदर्शनमध्ये चैतन्य यावे, यासाठी ‘प्रसार भारती’ची स्थापना केली. देशात ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत कोणतेही खासगी चॅनल जात नाही. दूरदर्शन मात्र जाते. याशिवाय, दूरदर्शनकडे देशभरात ४६ स्टुडिओंचे जाळे आहे. इतके विशाल जाळे कोणत्याही खासगी वाहिनीकडे नाही. असे असूनही दूरदर्शनचा समाजमनावर फारसा प्रभाव आज नाही. असे का, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. सरकारच्या विरोधात फारशा न जाणाऱ्या पण वस्तुनिष्ठ बातम्या हे दूरदर्शनचे खरे शक्तिस्थान होते. मात्र, जीवनाचा आणि माध्यमांचा वाढता वेग, तांत्रिक सफाई, सादरीकरणाचा ताजेपणा यांच्याशी काही नाते नसल्यासारखे दूरदर्शन अनेकदा वागते. खरेतर, इतकी व्यापक यंत्रणा आणि जाळे हाताशी असताना दूरदर्शनने कात टाकून अत्यंत सफाईदार, तंत्रशुद्ध व लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती करायला हवी होती. पण दूरदर्शनला वरपासून खालपर्यंत ‘भारतीय नोकरशाही’ नावाचा रोग जडला आहे. फायली नाचवणे, कलाकारांना यथेच्छ थकविणे आणि अखेर ‘दर्शकां’ना फुटविणे अशी त्रिसूत्री सध्या दूरदर्शनमध्ये आचरली जाते. अशा वातावरणात सर्जनशील कलावंत येणार कसे, आले तर टिकणार कसे आणि तुफान वेग घेतलेल्या इडियट बॉक्सच्या स्पर्धेत दूरदर्शन तगणार तरी कसे? गेल्या दशकभरात दूरचित्रवाणी हा मीडियाचा सर्वाधिक जाहिराती व त्यामुळे उत्पन्न मिळणारा अवतार झाला आहे. मात्र, या जाहिरातींच्या गंगेने दूरदर्शनकडे पाठच फिरवली आहे. दूरदर्शनला आता केवळ कात टाकून भागणारे नाही. त्याला या युगाशी सुसंगत असा नवा अवतार घ्यावा लागेल. दूरदर्शनने नवा जन्म घ्यावा असे नव्या सरकारला मनापासून वाटते का, याच्या उत्तरात ‘अबतक ५५’चे भवितव्य दडले आहे.

 

(महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकातील संपादकीय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here