वर्षभरात रस्ते अपघातात ३०१ जणांचा मृत्यू

0
814

रायगड जिल्ह्य़ात वर्षभरात झालेल्या रस्ते अपघातात ३०१ जणांचा मृत्यू झाला.

 रायगड जिल्ह्य़ात वर्षभरात झालेल्या रस्ते अपघातात ३०१ जणांचा मृत्यू झाला. तर ८७४ जण गंभीर जखमी झाली. २०१५ च्या तुलनेत जिल्ह्य़ात रस्ते अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटलेले असले तरी अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या प्रवाशांची संख्या घटलेली नाही. रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०१५ मध्ये १ हजार ४२३ अपघातांची नोंद झाली होती. यात ३५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८५५ जण गंभिर जखमी झाले होते. या तुलनेत २०१६ मध्ये १ हजार १५१ अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये ३०१ जणांचा बळी गेला तर ८५७ जण गंभीरीत्या जखमी झाले. यात मुंबई- गोवा महामार्गावरील अपघांतांचे प्रमाण अधिक होते.

रायगड जिल्ह्य़ातून तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यात मुंबई -गोवा महामार्ग क्रमांक ६६, मुंबई- पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई -पुणे महामार्ग क्रमांक ४ या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. तिन्ही महामार्गाचा विचार केल्यास मुंबई -गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण उर्वरीत दोन्ही महामार्गाच्या दुप्पट आहे. जिल्ह्य़ात वर्षभरात मुंबई- गोवा महामार्गावर ४६०, मुंबई- पुणे महामार्गावर ९४ तर मुंबई- पुणे दृतगती मार्गावर १३१ अपघातांची नोंद झाली. या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्य़ातील जवळपास ७० टक्के या तीन महामार्गावरच होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

अपघातांची कारणे..

अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, चुकीच्या आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा ही अपघातामागची प्रमुख कारणे आहेत. तर दृतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाडय़ांचे टायर फुटणे ही अपघातांमागणी प्रमुख कारणे आहेत. या शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई -गोवा महामार्गावर संथगतीने सुरु असणारे रुंदीकरण काही अपघातांना कारणीभुत ठरते आहे. औद्योगिकरणामुळे अरुंद रस्त्यांवर वाढलेली अवजड वाहतुक हे देखील अपघांचे प्रमुख कारण आहे.

या उपाययोजनांची गरज

पळस्पे ते इंदापुर या मार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरु आहे. यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हर्जन्स (पर्यायी मार्ग) टाकण्यात आले आहेत. मात्र पर्यायी मार्गाचे सुचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा गोंधळ उडतो. आणि अपघात होतात.त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहन चालकांना सुचना देणारे फलक बसवण्याची मागणी केली जात आहे.

सुट्टीच्या दिवशी वाहतुक नियमनाची मागणी

वाहतुक पोलीस आणि महामार्ग पोलिसांकडून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. सुट्टीच्या दिवशी दृतगती मार्गावरील अवजड वाहतुक नियंत्रित केली जात आहे. त्याच धर्तीवर मुंबई- गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक सुट्टीच्या कालावधीत नियंत्रित करण्याची मागणी आता केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here