रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती,शिवसेना नेते उत्तम कोळंबे यांनी बिनशेती परवान्यासाठी दीड लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंगऴवारी सायंकाळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा टाकून अलिबाग येथे पकडले.त्यानंतर त्यांना अटक केली.त्यांच्या समवेत हेमंत म्हात्रे आणि प्रसाद माळी या दोन कर्मचाऱ्यांनाही लाचलुचपत अधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील एका शेतकऱ्याची 232 गुंठे जमिन बिनशेती करायची होती,नाहरकत दाखल्यासाठीचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होता,त्यासाठी म्हात्रे आणि माळी यांनी अर्जदाराकडे दोन लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.त्यानंतर तक्रारदाराने सभापती कोळंबे यांच्याकडे संपर्क साधला असता दीड लाखात तडजोड झाली.हेमंत म्हात्रे यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता लाचेची दीड लाख रूपयांची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारली व ती उत्तम कांबळे यांच्या ऍन्टीचेंबरमधील कपाटात नेऊन ठेवली.लाचलुचपत अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली असून आरोपींना अटक केली आहे.अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.
कोळंबे हे कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेत उमेदवारीसाठी दावेदार समजले जात होते.