शेकाप संदर्भहीन

0
1026

 रायगडचं राजकारण आता शेकापच्या हातून निसटत चाललंय हे शुक्रवारी लागलेल्या निकालानंतर  स्पष्ट झालंय. याला पक्षनेर्तृत्वाचा फाजील आत्मविश्वास जसा कारणीभूत आहे तव्दतच पक्षाकडं असलेला  राजकीय आकलनशक्तीचा अभाव हे ही एक कारण आहे.सुनील तटकरे हे शेकापचा शत्रू नंबर एक होते तर त्यांना पराभूत कऱणं आणि आपली झाकली मुठ कायम ठेवणं हे शेकापचं निवडणुकीतील सूत्र असायला हवं होतं.शेकापच्या ते लक्षात आलं नाही. शेकापनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही एकाच वेळी अंगावर घेतलं. त्यातून आत्मघात ठरलेला होता.तो झाला. त्यातच  देशातील जनतेचा मूड कसा आहे याचा अंदाज शेकपला आलाच नाही.तो रामविलास पासवान यांना आला,आध्रात चंद्राबाबूंनाही आला.ते अलगत मोदींच्या कडेवर जाऊन बसले.त्यात त्याचा लाभही झाला.जयंत पाटलींनी काय केलं,? देशभर मोदीची लाट असताना  त्याकडं डोळेझाक करीत रायगडातील महायुतीबरोबरचे संबंध तोडून टाकले.दोन्हीकडं  आपले उमेदवार उभे केले.दोन्ही उमेदवार उभे करतानाचा आविर्भाव असा होता की,ते विजयी झालेच.आत्मविश्वास असणं चांगली गोष्ट असली तरी तो बाळगताना सत्याचा अपलाप होता कामा नये.या वास्तवाचं भान शेकापला राहिलं नाही.आपली अडिच लाख मतं आहेत,त्यात राज ठाकरेची लाख भर  मतं मिळतील,शिवाय अंतुलेंचे आशीर्वाद घेतल्यानं त्याचंही पाच-पन्नास हजार मतं मिळतील , रमेश कदमही गुहागर,दापोलीतून लाखभर मतं मिळवितील आणि आपले उमेदवार चार साडेचार लाख मतं घेऊन विजयी होतील असं गणित जयंत पाटलांनी मांडलं होतं.या गणिताला “कॉग्रेसवाले सुनील तटकरे यांचा प्रचार कऱणार नाहीत”  या भ्रामक विचाराचीही एक किनार होती.हे आडाखे गृहितकावर आधारलेले होते.मुळात राज ठाकरेंचे लाखभर मतं रायगडात आहेत की नाही हे तपासण्याची गरज शेकापला वाटली नाही.प्रभावहिन झालेल्या अ.र.अंतुलेचे त्यांचे जावई मुश्ताक अंतुलेनीही एकले नाही ति थं रायगडची जनता त्याचं ऐकेल काय?  हा प्रश्नही शेकापला पडला नाही.रमेश कदम यांना दापोली-गुहागरमध्ये एक लाख मतं पडणंही शक्य नव्हतं.पण मी म्हणतो तसं होणारच असं गृहित धरून चाललेल्या जयंत पाटलांची अंतिमतः फ सगत झाली आणि ” सुनील तटकरे यांचे राजकीय दफन झाले ” असं म्हणत टाळ्या वाजविण्याची वेळ जयंत पाटील यांच्यावर आली.जयंत पाटील आत्मसमाधानासाठी आज भलेही “सुनील तटकरे यांना अंतुलेंचा शाप भोवला”  असे म्हणत असले तरी ते वस्तुस्थितीला धरून नाही.कारण सुनील तटकरेंना तीन लाख नव्वद हजारांच्या वर मतं पडली आहेत.ते जेमतेम 2110 मतांनी पराभूत झाले आहेत.मतमोजणीच्या वेळेस विजयाचं पारडं सारखं खाली-वर होत होतं.याचा अर्थच एवढा की,अंतुलेंचा शाप वगैरे तटकरेंना भोवला नाही.मोदी लाटेत त्यांचा निभाव लागलेला नाही.राष्ट्रवादीचे छगन भुजबळ,प्रफुल्ल पटेल,सुरेश धस यांच्या सारखे रथी-महारथी मोठ्या फरकानं पराभूत झालेले असताना सुनील तटकरेंना निसटता पराभव पत्करावा लागला हेे पापच असेल तर ते शेकापचे आहे.सुनील तटकरे चार लाख मतं मिळवू शकले शेकापचा  उमेदवार सव्वा लाख मतावरच घुटमळला.शेकाप उमेदवार आणि सुनील तटकरे याच्यात तब्बल  दोन लाख साठ हजार मतांचं अंतर आहे.ही स्थिती सुनील तटकरेंचा पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त कऱण्यासारखी नक्कीच नाही.उलट दुःख व्यक्त करावी अशीच स्थिती आहे.रायगडात आमची हक्काची अडिच लाख मतं आहेत असं शेकाप नेते सांगत असतात.ही अडिच लाख मतं आता कुठं गेली.? य ा तून दोन  अथ र्निघतात,एक तर शेकाप नेते जो दावा करीत असतात तो चुकीचा आहे किंवा शेकाप नेत्यांची मनमानी भूमिका कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवडलेली नाही त्यामुळं नेत्यांचा आदेश डावलून त्यांनी शिवसेनेला मतदान केले.आम्हाला दुसरी शक्यता अधिक रास्त वाटते.कारण मुळात शेकापच्या सामांन्य कार्यकर्त्यांना पक्षानं आपला उमेदवार उभा कऱण्याची खेळीच आवडलेली नव्हती. ब रं उभा केला तर केला,तो कोण?,कुठला?त्याची पार्श्वभूमी कोणती ? हे ही लोकाना माहित नव्हतं.अशा आयात केलेल्या उमेदवाराला चार-चार पिढ्या शेकापत घालविलेल्या मतदारांनी का म्हणून मतं द्यावीत? .केवळ जयंत पाटील सांगतात म्हणून? उघडपणे तर असे सवाल कोणी केले नाहीत पण मतपेटीतून “तुम्ही म्हणता म्हणून आम्ही ऐकणार नाही”  हे शेकापच्या मतदारांनी जयंत पाटील यांना दाखवून दिले.”आम्हाला गृहित धरू नका ” असा संदेशही यातून त्यांनी दिला आहे.आणखी एक गोष्ट मतदारांना पटली नाही ती अंतुलेंचे आशीर्वाद घेण्याची.अंतुलेंच्या विरोधात लढताना रायगडमधील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी डोकी फोडून घेतलेली आहेत.स्वतःच्या घरादारावरही नांगर फिरविलेला आहे.अशा स्थितीत जयंत पाटील जर अंतुलेंच्या पायाला हात लावत असतील आणि बॅनरवर आपल्या फोटो शेजारी अंतुलेंचा फोटो छापत असतील तर हे राजकाऱण शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता कधीच स्वीकारणार नाही.मतांच्याव्दारे त्यांनी आपला हा संताप व्यक्त केला आहे.

जयंत पाटील यांना सुनील तटकरेंचा  पराभव करायचाच होता तर तटकरे विरोधी मताचं विभाजन त्यांनी टाळायला हवं होतं असे  कार्यकर्त्यांन वाटत होत .  ते त्यांनी न करता मतांचं विभाजन होऊ दिलं त्यामुळं जयंत पाटील यांच्या हेतूबद्दलच कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आणि त्यांनी शेकापच्या आयात उमेदवारला  मत देण्याचं टाळलं.असं झालं नसतं तर 2009च्या विधानसभेला मतुार संघात जेवढी मतं शेकापच्या उमेदवारांना पडली होती तेवढी तर रमेश कदम यांना पडायला हवी होती.तशी ती पडली नाहीत.याचा सरळ अ र्थ जयंत पाटील यांना आपली मतंही टिकविता आलेली नाहीत असा होतो .  ऐनवेळी आम्ही आमची मतं शिवसेनेकडं वळविली अशी कातडीबचाव भूमिका आता शेकाप नेते घेऊ शकतात.पण तेही कोणी मान्य कऱणार नाही.याचं कारण असं आहे की,मग रमेश कदम यांना सव्वालाख मतं तरी कशी पडली ?असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.मतं फिरविली गेली असतील तर रमेश कदम यांना पन्नास हजार मतंही पडायला नको होती.शेकापनं मतं फिरविली असती तर अनंत गीते किमान पन्नास हजार मतांनी तरी विजयी व्हायला हवेत.मात्र तसं झालेलं नसल्यानं जेमतेम मतांनी गीते विजयी झाले.याचं श्रेय मोदी लाटेलाच द्यावं लागेल.कोणते ही  कारण  सांगून शेकापनं ते  श्रेय घेण्याचा  प्रयत्न   करू  नये

शेकापचं आता काय होणार ?

  शेकापचा पाठिबा नसतानाही शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले आहेत.याची राजकीय किंमत शिवसेना शेकापकडून नक्कीच वसूल करेल.ही वसुली करताना आजपर्यत शेकापला जो राजकीय सन्मान  शिवसेना नेत्यांकडून मिळत होता,तो यापुढं मिळणार नाही.”आम्हाला गरज नाही,तुम्हाला गरज असेल तर बोला”  हीच पुढील काळात शिवसेनेची भाषा असणार आहे.पुढील राजकारणात शिवसेना शेकाप नेत्यांवर पुर्वीसारखा विश्वासही ठेवणार नाही.त्यांना त्याची गरजही असणार नाही.शेकापला हे सारं सहन कऱण्याशिवाय मार्ग नाही.कारण गेल्या पंचवीस वर्षांचा इतिहास पाहिला तर शेकापला जिल्हयातही कोणता तरी टेकू लागतोच लागतो.सत्तेसाठी टेकू मिळविताना शेकाप नेते कोणताही विधिनिषेध बाळगत नाहीत हे त्यांनी नुकत्याच घेतलेल्या अतुलेंच्या पाठिब्यानं दिसून आलं.पण आता शेकापची अडचण अशी आहे की,शेकापला साऱ्यांनीच ओळखल्यानं त्यांना कोणी मित्र म्हणून स्वीकारायला तयार होणार नाही.त्यामुळं परत मातोश्रीचे उंबरे झिजविण्याशिवाय आता शेकापला अन्य कोणताच मार्ग  नाही.मातोश्री देखील शेकापला क्षमा करण्याच्या मनःस्थितीत असेल असं वाटत नाही.कारण शेकापनं गीतेंच्या विरोधात उमेदवार उभा केला यापेक्षाही जयंत पाटील यांनी कृष्णकुंजवर जाऊन शिवसेनेच्या विरोधात राज ठाकरेंची मदत घेतल्याचं शल्य उध्दव ठाकरेंना अधिक आहे.त्यामुळं ते झालं गेलं विसरून शेकाप नेत्यांना माफ करतील असं नाही.अंतर ठेऊन काही तडजोडीला शिवसेना तयार झाली तरी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद शेकापला द्यायला ठाकरे तयार होणार नाहीत अशीच च र्चा आहे.जिल्हयातला सामांन्य शिवसैनिक तर” प्रसंगी विरोधात बसू पण विश्वासघातकी शेकापबरोबर आता युती नको”  असं म्हणायला लागला आहे.हे शेकापसाठी चांगलं नाही.कारण विषय केवळ जिल्हा परिषदेचा नाही.विषय विधानसभेचाही आहे.विवेक पाटील आणि धैर्यशील पाटील यांचा विजय शिवसेनेवरच अवलंबून आहे.मागच्या वेळेस पेणमध्ये रवी पाटील आणि अनिल तटकरे यांच्या मत विभागणी झाली आणि सेनेच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर धैर्यशील पाटील विजयी झाले.उरणमध्येही शिवसेनेचीच मतं निर्णायक ठरली होती.विवेक पाटील यांना हे माहित असल्यानं त्यांनी राज ठाकरेंपासून किंवा एकूणच जयंत पाटील यांच्या राजकारणापासून चार हात दूर राहणेच पसंत केलं होतं.आगामी काळात शिवसेनेनं काही वेगळी भूमिका घेतली तर विवेक पाटील आणि धैर्यशील पाटील याचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे हे नक्की.असं सांगतात की,जयंत पाटील यांनी शिवसेनेबरोबरची युती तोडण्याचा नि र्णय घेतला तेव्हा विवेक पाटील नाराज झाले.त्यांची नाराजी दूर कऱण्यासाठी ” गरज पडली तर तुला मी अलिबागची सुरक्षित जागा देऊन तेथून विजयी करून विधानसभेत पाठविल असं सांगितलं होतं” .यातला खरेखोटेपणा माहिती नाही.पण एकतर विवेक पाटील त्याला तयार होणार नाहीत.पंडित पाटीलही अलिबागवर अशा प्रकारे पाणी सोडायला तयार होणार नाही.बरं विवेक पाटील आणि पंडित पाटील यांनीही मान्य करून विवेक पाटील अलिबागमधून उभे राहिले तरी मग धैर्यशील पाटलांचं काय करायचं?  हा प्रश्न आहे.कारण पेणमध्ये अनिल तटकरे किंवा अवधूत तटकरे उभे राहतील असं नाही.त्यामुळं रवी पाटलाचं मत विभाजन होईल असंही नाही.अशा स्थितीत शिवसेना धैर्यशील पाटील यांच्याबरोबर नसेल तर मग काय होणार? हे वेगळं सागायची गरजच नाही.म्हणजे व्यक्तिगत अहंकार,महत्वाकांक्षा आणि विश्वासघाताचं राजकारण करून जयंत पाटील यांनी अगोदरच गलितगात्र झालेल्या पक्षाला अधिकच पेचात टाकलं आहे.जयंत पाटील यांचे डावपेच त्यांच्या पुरते अंगलट आले.पक्ष राज्याच्याच काय जिल्हयाच्या राजकारणातूनही संदर्भहिन झाला,आणि पक्षातील नेत्यांमधील मतभेदाचंी दरी अधिक रूंदावली.जयंत पाटील फक्त स्वतःपुरताच विचार करतात हा समज विवेक पाटील आणि धैर्यशील पाटील यांचा होताच तो अधिक घट्ठ झाला.त्यातून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची झालेली वाताहत आणि महायुतीचा देशात आणि राज्यात सुरू झालेला एकछत्री अंमल लक्षात घेऊन संदर्भहिन झालेल्या पक्षात राहून वेळ घालविण्यापेक्षा कोणी नेत्यानं काही वेगळी भूमिका घेतली तर आश्चर्य वाटायला नको.नाही तरी बुडत्या जहाजात बसून राहणे राजकीयदृष्टया शहानपणाचे नक्कीच नाही.

–                                                 ——————————————————————————————————————————————————

चौकट

शेकापची मतं फिरली नाहीत ती बेपत्ता झालीत

शेकापनं ऐनवेळी आपली मतं शिवसेनेकडं फिरविली असं म्हणायला शेकाप नेत्यांना तोंड नाही.कारण मत ं फिरविली असती तर शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबागमध्ये अनंत गीते यांना सुनील तटकरे आणि रमेश कदम यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली असती.तसं झालेलं नाही.अलिबाग विधानसभा मतदार संघात कदम यांना 58184 तर अनंत गीते यांना कदम यांच्यापेक्षाही कमी म्हणजे 46997 मतं मिळाली आहेत.अलिबागमध्ये सुनील तटकरे यांना शेकाप आणि शिवसेनेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत.ती 67038 आहेत. मागच्या विधानसभेत मीनाक्षी पाटलांना मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी शेकापला जवळपास नम्मी मतं कमी मिळाली आहेत ही शेकापसाठी आगामी निवडणुकीच्यादृष्टीनं धोक्याची घंटा आहे.जयंत पाटील काहीही म्हणोत अलिबागमध्येही जर शिवसेनेची मतं शेकापला मिळाली नाहीत तर शेकापचा उमेदवार विधानसभेला धोक्यात येऊ शकतो.रमेश कदम य़ांना अलिबाग,पेण सोडले तर फारच कमी मतं पडली आहेत.पेण अलिबाग सोडता अन्यत्र शेकाप प्रभावहीन आहे.त्यामुळं मतं फिरविली असतील तर ती कुठली हा प्रश्न आहे.वास्तव असे आहे मतं फिरवायचं राहू द्या,शेकापला आपली मतंही टिकविता आलेली नाहीत हे सत्य आकडेवारीनं समोर आलंय अलिबागमध्ये शेकापची काही मतं सुनील तटकरेंनाच पडली असावीत असं दिसतंय,कारण अन्य दोन्ही उमेदवारांपेक्षा तटकरे अलिबागमध्ये पुढं आहेत.असं नसेल तर मग शेकापची मतं गेली कुठं हा प्रश्न पडतो.शेकापची मतं हरवली आहेत हे नक्की.

एस एम देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here