आगामी मान्सून काळात रायगड जिल्हयच्या सागरात अकरा वेळा मोठ्या भरती उधाणाची शक्यता या वेळी समुद्रात 4.60 मीटर ते 4.95 मीटर उंचीच्या महाकाय लाटा निर्माण होण्याची शक्यता असल्यानं रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्हयात जनजागृती मोहिम हाती घेण्यात येत आहे.
रायगड जिल्हयातील उरण ,अलिबाग,मुरूड आणि श्रीवर्धन हे चार तालुके आणि या तालुक्यातील 53 गावं समुदाच्या किनाऱ्यावर आहेत.पेण,पनवेल,म्हसळा हे तालुके खाडीकिनारी असून या तालुक्यातील 70 गावं खाडीच्या मुखावर बसलेली आहेत. तर जिल्हयातील 14 नद्याच्या काठावर 385 गावं वसलेली आहेत.खाडी किनारी 2200 हेक्टर भात शेती आहे.उधाणाची भरती आली आणि त्याच वेळेस अतिवृष्टी झाली तर जिल्हयात 26 जुलै 2005 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.अशी वेळ येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सरकारच्या प्रत्येक विभागात 1 जून पासून आपत्ती निवारण कक्ष कायान्वित कऱण्यात येत आहे.तसेच कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने वरिष्ठांना विचारल्या शिवाय मुख्यालय सोडू नयेत अशीही ताकिद देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
रायगड जिल्हयात येत्या पावसाळ्यात 15 आणि 16 जुलै हे दोन दिवस सर्वाधिक धोकादायक असून या दिवशी सर्वात मोठी भरती येणार आहे.या दिवशी 4.95 ते 4.97 मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकतील अशी शक्यता आहे.पुढच्या महिन्यात म्हणजे 15 आणि 16 जूनला देखील 4.85 मीटर उंचीच्या लाटा निर्माण होतील अशी शक्यता आहे.मान्सून काळात 21 दिवस छोट्या -मोठ्या भरतीचे आहेत.भरती आल्यास समुद्राचे पाणी गावात आणि सुपिक शेतीत शिरण्याचे प्रमाण वाढल्याने समुद्राकाढच्या गावांमध्ये आजपासूनच चिंतेचे वातावरण आहे.