भाऊचा धक्का ते अलिबाग रो-रो सेवा या महिन्यात सुरू होणार
रायगडला मुंबईच्या अधिक जवळ नेणार्या आणि रायगडातील पर्यटन व्यवसायाला गती देणार्या भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो रो सेवेचा शुभारंभ या महिन्याच्या शेवटच्या आठवडयात होत असल्यानं आगामी काळात अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्हयाचा चेहरा-मोहरच बदलून जाणार आहे.
केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत 135 कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प मूर्त स्वरूपात येत आहे.रो-रो सेवेमुळं अलिबागकरासह रायगडकरांना आपल्या वाहनं बोटीत ठेऊन मुंबईला जाता येणार किंवा येता येणार आहे.ही सेवा बाराही महिने सुरू राहणार असल्यानं अलिबागकरांची चार तास घालवून रस्ता मार्गे मुंबईला जाण्याच्या दिव्यातून कायमची सुटका होणार आहे.
माडवा जेट्टीवरील लाटांचा जोर कमी करण्यासाठी 72 कोटी रूपये खर्च करून ब्रेकवॉटर वॉल बांधण्यात आली आहे.तसेच बंदरातील गाळ काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.गाळ निघाल्यास पाण्याची खोली वाढणार असून त्यामुळं बोटी सहज ये-जा करू शकतील.रो-रो सेवा सुरू होत असल्याने मांडवा बंदरात आधुनिक सोयींनीयुक्त पॅसेंजर टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.मांडवा जेट्टीमध्ये टर्निंग प्लॅटफॉर्म,अॅप्रोच जेट्टी,वाहनतळ आदि बाबींची पूर्तता केली गेली आहे.या प्रकल्पामुळं रायगडला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणिय वाढ होणार असून त्यामुळं स्थानिकांना मोठा रोजगार मिळणार असल्याने ही सेवा कधी सुरू होते याकडं रायगडवासियांचे लक्ष आहे.