महाराष्ट्रात पत्रकारांना ‘बुरे दिन’

0
741

एका  पत्रकारांवर प्राणघातक हल्ला,दुसर्‍यावर खंडणीचे खोटे गुन्हे,

तिसर्‍याला धमक्या ,दिवसभरातल्या घटना,महाराष्ट्रात पत्रकारांना ‘बुरे दिन’

 ठाणे जिल्हयातील शहापूर येथील पत्रकार प्रियेश जगे यांच्यावर काल रात्री झालेला हल्ला,शाळेत गटारी पार्टी कऱणार्‍या भाजप नेत्यांबद्दलची बातमी दिल्यामुळे  सिटी न्यूजचे महंमद शकील यांना जिवे मारण्याची दिली गेलेली धमकी आणि लातूर जिल्हयातील  उदगीर येथील पुण्य नगरीचे प्रतिनिधी तथा उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद उगिले यांनी काही स्थानिक नेत्याच्या बातम्या छापल्यामुळे कटकारस्थान करून त्यांच्याविरोधात खंडणीसह विविध चौदा कलमांखाली दाखले केलेले गुन्हे या घटनांंनी आज पुन्हा महाराष्ट्रातील पत्रकारिता अस्वस्थ झाली.हितसंबंधीयांकडून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा विविध पध्दतीनं आणि दररोज प्रयत्न होत असल्याने माध्यमांना महाराष्ट्रात बुरे दिन आले आहेत असंच म्हणावं लागतंय.

उगिले यांनी सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात लोकहिताच्या  बातम्या छापल्यामुळे चिडलेल्या या नेत्यांनी पोलिसांना हाताशी धरून उगिले यांना बरोबर अडचणीत आणले.त्यांच्या विरोधात वडवाना पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले गेले .एका मारामारीच्या प्रकरणानंतर जे गुन्हे केले नाहीत अशी कलमं त्यांच्या विरोधात लावली गेली आहेत.बघा कलमं किती गंभीर आहेत ते.143,147,149,148,326,324,323,504,506, अगोदर या कलमांन्वये गुन्हा दाखल केला गेला नंतर दोन दिवसांनी राजकिय दबावापोटी 384,386 ही खंडणीची दोन कलमं त्यात समाविष्ठ केली गेली.या विरोधात स्थानिक सर्व पत्रकार एकवटले असून आज त्यांनी बैठक घेऊन उगिले यांच्यावर राजकीय दबावापोटी दाखल केल्या गेलेल्या गुन्हयांबदादल संताप व्यक्त केला आहे.मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने हा विषय वरिष्ठांच्या कानावर घातला असून  खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या कृतीचा धिक्कार केला आहे.

मीरा भाईंदर येथील सिटी न्यूजचे पत्रकार मोहम्मद शकील शेख यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात सातत्यानं लिखाण करून त्या बांधकामावर कारवाई करण्यास महापालिकेला भाग पाडल्याने चिडलेल्या भोसले नामक  नगरसेवकाने  पत्रकार शकील यांना बघून घेयूच्या  धमक्या दिल्या आहेत.यापुर्वी देखील शकिल यांच्यावरिोधात त्यांनी मोर्चा काढला होता. भीरा भाईंदरमध्ये सध्या भाजप नेत्याच्या गटारीचे प्रकरण गाजत आहे.ती बातमी देखील सर्वच वर्तमानपत्रांनी छापली असली तरी भोसले यांचा राग शकिल यांच्यावर असून ते त्यांना धमकावत  असल्याची तक्रार शकिल यांनी केली आहे.या प्रकरणातही पोलिसांनी सत्य शोधून नगरसेवकाचा बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करीत आहे.

कधी थेट शारीरिक हल्ले करून,कधी खोटे गुन्हे दाखल करून तर कधी जिवे मारण्याच्या धमक्या देऊन माध्यमांचा आावाज बंद करण्याचा प्रयत्न हितसंबंधीयांकडून होत असल्याने माध्यमकर्मीमंध्ये मोठी अस्वस्थतः आहे.या विरोधात कायदा करावा अशी मागणी समिती वारंवार करीत असली आणि या अधिवेशनात बिल आणून कायदा करू असे आश्‍वासन सरकारने वारंवार दिल्यानंतरही विविध भावनिक आणि राजकीय वादात अडकलेल्या विधान मंडळाला सामांन्याच्या अन्य प्रश्‍नांकडे बघायला वेळ नसल्याने या अधिवेशनातही कायदा होत नाही हे आता स्पष्ट झाले आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद तसेच राज्यातील सर्व पत्रकार वरील तिघाही पत्रकारांच्या सोबत असून त्याना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here