मृत्यू ही दुदैवी घटना आहे.त्यासंबंधीच्या बातम्या देताना माध्यमांनी संयम दाखविलाच पाहिजे.मात्र श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातम्या देताना भारतीय मिडियानं जो उथळपणा दाखविला तो नक्कीच सामांन्य प्रेक्षकांना आवडलेला नाही.श्रीदेवीच्या मृत्यू प्रकरणी ज्या उलट-सुलट बातम्या दिल्या त्याचा सोअर्स काय होता माहिती नाही..पण तो आज खोटा ठरला.अगोदर ह्रदयविकाराची थेरी मांडली गेली.ती खोटी ठरली.नंतर टबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं.मग त्यात अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या.ज्या शंका दुबई पोलिसांना आल्या नाहीत त्या भारतीय मिडियाला आल्या.त्यात सुब्रम्हण्यम स्वामी हा विषय भलतीकडंच नेला,त्याला मिडियानं नको तेवढं महत्व देत बाईट चालविले.हे सारं करताना ज्या करामती केल्या त्याही संतापजनक होत्या.दक्षिणेतल्या महान्यूज नावाच्या एका वाहिनीचा रिपोर्टर तर चक्क टबमध्ये झोपला आणि श्रीदेवीच्या मृत्यूची कथा सांगू लागला.तो रिपोर्टर घटना घडताना समोर असल्यासारखं सारं सांगत होता.हे सारं पाहून दुबईतल्या खलिज टाइम्सलाही सांगावं लागलं..भारतीय मिडियानं थोडा संंयम बाळगला पाहिजे.बातमी देणं हे माध्यमाचं काम आहे.मात्र तिचं सादरीकरण संयत असलं पाहिजे.श्रीदेवीचा मृत्यू ही हेडलाइन न्यूज होती.मात्र नंतरच्या चौकश्या वगैरे ही फॉलोअप स्टोरी होती.मात्र ही बातमी दिवसरात्र अशी दाखविली जात होती की,जगात दुसरं काही घडतंच नाही.गेली चार दिवस अन्य सार्या बातम्या दुय्यम ठरल्या आहेत.वाचकांना काय हवंय हे आम्हीच ठरवतो आणि ते वाचकांवर लादतो.हे श्रीदेवी प्रकरणानंतर प्रकर्षानं जाणवलं.–मृतदेह भारतात येऊन त्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत आता मिडिया काय काय करणार आहे ते पाहण्यासारखं आहे.