परभणीत माध्यमांवर दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्न,

पेपर फुटीची बातमी छापली म्हणून दोन पत्रकारांवर गुन्हे 

परभणी  ः माध्यमांचा आवाज बंद करण्याचा कसा पध्दतशीर आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे याच्या गेल्या दोन दिवसात घडलेल्या दोन घटनांबद्दल मी आपणासर्वांना अवगत करणार आहे.पहिली घटना आहे परभणीची.दहावी-बारावीच्या परीक्षेतली पेपरफुटी ही खरं तर आता बातमी राहिलेली नाही.ती नित्याची गोष्ट आहे.त्यामुळं ‘कॉपीचा सुळसुळाट’ अशा अर्थाच्या बातमीनं कुणाचा माथेशूळ उठण्याचं खरं तर कारण नाही.पण तो उठतो आहे यामागे समाजात ज्या वाईट घटना घडताहेत त्याची नोंंद माध्यमांनी घेऊ नये त्याकडं दुर्लक्ष करावं नाहीतर तुमचा बंदोबस्त असा इशारा देण्याचा प्रयत्न असतो.

14 मार्च रोजी दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा पेपर होता.पेपर सुरू होण्यापुर्वीच तो व्हायरल झाला.त्याबाबतची माहिती पत्रकारांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिली,दुसर्‍या दिवशी त्याची बातमीही दिली.मात्र बातमी प्रसिध्द झाल्यानंतर परभणीच्या दोन पत्रकारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.समाजातील अपप्रवृत्तीच्या विरोधात सत्य बातमी दिल्याची  शिक्षा पेपर व्हायरल कऱणार्‍यांना नव्हे तर पत्रकारांना देण्याचा प्रयत्न होतो आहे.

15 मार्चच्या लोकमतमध्ये आणि पुण्यनगरीमध्ये बातमी प्रसिध्द झाली.यामुळं स्वाभाविकपणे शिक्षण विभागाचं पितळ उघडं पडलं.त्यातून शिक्षण विभागानं लोकमतचे अभिमन्यू कांबळे आणि पुण्यनगरीचे दत्ता लाड यांच्यावरोधात 15 मार्च रोजी नवा मोढा पोलिसात तक्रार दिली.त्या तक्रारीवरून दोन्ही पत्रकारांच्या विरोधात कलम 5(1) ,5 (2) म.वि.गैर.प्र.कायदा 1982  व कलम 72 नुसार शहानिशा न करता बातमी छापल्याबद्दल गुन्हा दाखल केला गेला.वास्तविक जे वृत्त प्रसिध्द झाले होते ते पूर्णपणे शहानिशा करून,सत्यता पडताळून पाहूनच प्रसिध्द केले गेले होते.तरीही माध्यमांनी जे काही गैरकृत्य चालू आहेत त्याकडं दुर्लक्ष करावे या जाणिवेतून हे गुन्हे दाखल केले गेले आहेत.वास्तविक पेपर व्हायरल कोणी केला याची चौकशी करून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होऊन त्याना अटक करणे अपेक्षित असताना चोर सोडून पत्रकारांना अडविण्याचा प्रयत्न होत असेल तर ते निषेधार्थ आणि संतापजनक आहे.राज्यातील पत्रकार ही दादागिरी सहन करणार नाहीत हे संबंधितांनी लक्षात ठेवावे.

शिक्षण विभागाच्या या दादागिरीच्या विरोधात आज परभणीतील पत्रकारांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दोन्ही पत्रकारावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी  केली आहे.जिल्हाधिकारी माध्यमांचा आवाज बंद कऱण्याच्याअशी अपेक्षा आहे.
दुसरी घटना अंबाजोगाईतली आहे.अंबाजोगाईत एका शासकीय इमारतीला आग लागली.त्याची सचित्र बातमी प्रसिध्द केली गेली.मात्र ही बातमी प्रसिध्द होऊ नये अशी इच्छा असलेल्या अधिकार्यानी पत्रकाराला बोलावून त्याला आत टाकण्याची धमकी दिली.आग लागलेली फोटो बातमीत प्रसिध्द झालेले असताना तुझ्याकडं पुरावा काय असा सवाल विचारला गेला.हा प्रकारही माध्यमांवर दहशत बसविण्याचाच आहे.
दोन्ही घटना संतापजनक आणि निषेधार्ह आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषद माध्यमांचा आवाज बंद कऱण्याच्या या प्रयत्नांचा निषेध करीत असून परभणी आणि अंबाजोगाई येथील पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय घातला जाणार आहे.

1 COMMENT

  1. पत्रकार गुन्हे दाखल झाले याचा प्रथमतः निषेध करतो.

Leave a Reply to राऊत रविन्द्र मधुकर Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here