पत्रकारांच्या गळचेपीत भारत अव्वल

0
916

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

वृत्तपत्रे, मीडियाच्या स्वातंत्र्याविषयी भारतात कितीही पुरोगामी वारे वाहत असले तरी पत्रकारांची गळचेपी करण्यात आपला देश १८० देशांच्या यादीत १४०व्या स्थानावर असल्याचे धक्कादायक चित्र सन २०१४च्या जागतिक पाहणीतून पुढे आले आहे. २०१३मध्ये भारतात पत्रकारांवर हल्ल्याच्या बऱ्याच घटना घडल्या असून, या काळात देशभरात ८ पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे या पाहणीतील आकडेवारी सांगते.
भारतात अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठी आहे. मात्र, बहुतेक जण राजकीय पक्ष, सुरक्षा यंत्रणा, पोलिस, निदर्शक आणि गुंड टोळ्यांकडून लक्ष्य केले जातात. बऱ्याच प्रकरणात अशा पत्रकारांना न्यायव्यवस्थेकडूनही वाऱ्यावर सोडले जाते आणि मग स्वतःवर सेन्सॉरशिप लादून घेण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरत नाही, असे या पाहणी अहवाल म्हणतो.
भारतात बहुतेक राज्यांमध्ये पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रकार कमीअधीक प्रमाणात घडत आहेत; मात्र, कश्मीर आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये अशा हल्ल्यांचे प्रमाण जास्त आहे, असेही या पाहणीत आढळले आहे.
पाकिस्तान धोकादायक
पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक असलेल्या देशांमध्ये पकिस्तानचा समावेश असून यादीत तो १७५व्या स्थानावर आहे. तेथील पत्रकारांना दहशतवादी गटांचेच नव्हे, तर ‘आयएसआय’सारख्या सरकारी गुप्तचर यंत्रणांचेही लक्ष्य व्हावे लागते. चीनमधील परिस्थिती भारतापेक्षा गंभीर असून या यादीत तो १५८व्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर फिनलँड, दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड तर तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे हे देश आहेत. अमेरिकेचे स्थानही ४६वर घसरले असून गेल्यावर्षी हा देश ३२व्या स्थानी होता.( म टा वरुन साभार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here