भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत अशा स्थळांचा आणि वास्तुंचा विकास करण्यासाठी सात कोटी रूपयांचा निधी सरकारने मंजूर केला असून रायगड जिल्हयातील तीन आणि रत्नागीरी जिल्हयातील दोन स्थळांचा विकास केला जाणार आहे.जगातील सर्वाधिक काळ चाललेला शेतकर्यांंचा पहिला संप म्हणून ज्या चरीच्या संपाची इतिहासात नोंद आहे त्या चरी गावी संपाचे स्मारक होत असून त्यासाठी एक कोटीच्या निधीची तरतूदे केली गेली आहे.या संपात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग होता.चरी येथे भव्य सभागृह उभारून तेथे वाचनालय,ग्रंथालय उभारले जाणार आहे.तसेच महाड येथील चवदार तळे परिसराचे सुशोभिकरण,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नूतनीकरण आदि कामांसाठी एक कोटीचा निधी मंजूर केला गेला आहे.महाड येथील क्रांती स्तंभातील शाहू महाराज सभागृहाच्या नूतनीकरणासाठी भरीव तरतूद केली गेली आहे.तसेच मंडनगड तालुक्यातील आंबवडे हे बाबासाहेबांचे गाव.या ऐतिहासिक स्थळाचा विकास कऱण्यासाठी दोन कोटी आणि दापोली तालुक्यातील माता रमाई यांच्या वणंद येथील जन्मस्थळाच्या विकासासाठी दोन कोटी रूपये मंजूर कऱण्यात आले आहेत.पाच स्थळांच्या विकासासाठी 7 कोटी रूपये दिले जाणार असल्याने स्थानिकांनी याचे स्वागत केले आहे.विशेषतः चरी येथील उपेक्षित शेतकरी संपाची सरकारने दखल घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.–