छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांचा राज्यव्यापी मेळावा
1 सप्टेंबर रोजी औढा नागनाथ येथे होणार
मुंबईः सरकार लागू करू पहात असलेल्या नव्या जाहिरात धोऱणामुळं राज्यातील छोटी आणि मध्यम वृत्तपत्रे इतिहास जमा होणार आहेत.त्यामुळं राज्यभर मोठा असंतोष आहे.शांततेच्या मार्गानं आंदोलनं सुरू आहेत.या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन लढयाची पुढील दिशा नक्की कऱण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने आणि लघू आणि मध्यम वृत्तपत्रं बचाव समितीच्यावतीनं राज्यातील लघू आणि मध्यम वृत्तपत्रांच्या मालकांचा आणि संपादकांचा राज्यव्यापी मेळावा हिंगोली जिल्हयातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे शनिवार दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे.राज्यभरातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांचे पाचशेच्यावर संपादक-मालक मेळाव्यास उपस्थित राहतील असा अंदाज आहे. मेळाव्यात एस.एम.देशमुख याचं प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.ते सरकारी जाहिरात धोरणाची सप्रमाण चिरफाड करतील.
राज्य सरकारनं शासकीय संदेश प्रसार धोरण 2018 नावानं नवे जाहिरात धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचा मसुदा तयार केला गेला असून या मसुद्याची अंमलबजावणी केली गेली तर राज्यातील छोटी आणि मध्यम वृत्तपत्रे टिकाव धरू शकणार नाहीत.त्याचा फटका या व्यवसायावर अवलंबून असलेल्या जवळपास दोन लाख कुटुंबांना बसणार आहे.छोटी वृत्तपत्रे बंद पडल्यानं सारा मिडिया मुठभर भांडवलदारी माध्यम समुहाच्या ताब्यात जाणार असल्यानं त्याचा परिणाम वृत्तपत्र स्वातंत्र्यावर तर होणार आहेच त्याचबरोबर लोकशाही व्यवस्थेसाठीही ते मारक ठरणार आहे.त्यामुळं या सर्व स्थितीला कसे तोंड देता येईल यावर तर मेळाव्यात विचार होणार आहेच त्याचबरोबर छोटया वृत्तपत्रांचे अर्थकारण उलगडून दाखविणारा एक व्हाईट पेपर प्रसिध्द करून तो मा.राज्यपाल आणि मा.मुख्यमंत्री यांना सादर केला जाणार आहे.राज्यातील विविध संघटनांनी एकत्र येत छोटी आणि मध्यम वृत्तपत्रं बचाव समिती स्थापन केली आहे.पुढील लढाई या समितीच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार असून त्यासाठी एक समन्वय समिती या मेळाव्यात नेमली जाणार आहे.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून अन्य लोकप्रतिनिधींकडूनही पाठिंब्याची पत्रे जमा कऱण्याबाबत तसेच शासन आणि लोकप्रतिनिधींच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्याबाबतही चर्चा करून निर्णय घेतला औढा नागनाथच्या मेळाव्यात निर्णय घेतला जाणार आहे.मेळाव्यात राज्यातील प्रमुख संपादकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या मेळाव्यास जास्तीत जास्त मालक- संपादकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव विजय जोशी,प्रमोद माने आणि स्थानिक संयोजक विजय दगडू आणि नंदकिशोर तोष्णीवाल यांनी केले आहे.या संदर्भातली अधिक माहिती मिळविण्यासाठी विजय दगडू (9822181277) आणि नंदकिशोर तोष्णीवाल (9403806336) यांच्याशी संपर्क करता येईल .