रायगड जिल्हयात कुटुंबाला वाळित टाकण्याच्या गेल्या दोन दिवसात दोन घटना समोर आल्याने जिल्हयात खळबळ उडाली आहे.पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी येथील जनार्दन नारायण देवे यांनी गावातील प्रतिष्ठीत आणि नातेवाईकांच्या विरोध असताना साखर येथील एका मुलीशी नोंदणी पध्दतीनं विवाह केला.त्यामुळे संतापलेल्या गावकीने देवे कुटुबियांना 70 हजार रूपयांचा दंंंड 2012मध्ये ठोठावला.परंतू देवे कुटुंबांनी ती रक्कम न भरल्याने त्याना धमक्या,मारहाण करून वाळित टाकण्यात आले.या प्रकरणी देवे कुटुंबियांनी बुधवारी पोलादपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना कर्जत तालुक्यातील आवळस गावातील आहे.येथील सुर्वे कुटुबियांनी पोलिसानंा दिलेल्या तक्रारीत गेल्या काही दिवसांपासून आम्हाला गावकी आम्हाला कोणत्याही सामाजिक,धार्मिक,सास्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून घेत नसल्याची तक्रार कर्जतच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.आम्हाला समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
रायगड जिल्हयात वाळित टाकण्याचे प्रकार सातत्यानं घडत असून गेल्या सहा महिन्यातील वाळित टाकण्याचा हा बारावा प्रकार आहे.यापूर्वी रोहा तालुक्यात वाळित प्रकरणातूनच एका महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली होती.तसेच मुरूड तालुक्यातील एकदरा,अलिबाग तालुक्यातील थेरोंडा,रेवदंडा येथेही असे प्रकार घडले आहेत.