पत्रकारितेतून राजकारणात प्रवेश केलेल्या पत्रकारांची संख्या आपल्याकडं कमी नाही.स्वतः अटल बिहारी वाजपेयी देखील अगोदर पत्रकार होते.नंतर राजकारणात गेले.अलिकडच्या काळात एम.जे.अकबर,अरूण शौरी,कुमार केतकर,राजीव शुक्ला,चंदन मित्रा,शाझिया इल्मी,आशुतोष,आशिष खेतान हे आणि अन्य अनेक पत्रकार राजकारणात गेले.काही राजकारणाच्या दलदलीत रमले.काही कंटाळून या दलदलीतून बाहेर पडले.पत्रकार म्हणून असलेल्या लोकप्रियतेचा वापर आपल्या पक्षासाठी करून घेण्यासाठी यातील अनेकांना खासदार आमदार केले गेले.काही मंत्री झाले.मात्र पदं गेली की,त्यांची त्या त्या पक्षात उपेक्षा सुरू झाली.अ़रूण शौरी आज भाजप नेत्यांच्या विरोधात बोलताहेत..त्यांना मंत्रीपद हवं होतं ते मिळालं नाही म्हणून.आशूतोष यांनी आपचा राजीनामा याचसाठी दिलाय.त्यांना राज्यसभेवर जायचं होतं.अरविंद केजरीवाल यांनी ते होऊ दिल नाही.त्यामुळं त्यांनी किरण बेदी,प्रशांत भूषण,योगेंद्र यादव,मयंक गांधी,शाझिया इल्मी यांची राह पकडली.व्यक्तीगत कारणांनी आपण राजीनामा देत आहोत असं सांगत त्यांनी पक्षाला गुडबाय केलाय.आशुतोष हे वृत्तनिवेदक म्हणून लोकप्रिय होते.त्याचा फायदा करून घेता येईल असं केजरीवाल यांना वाटलं.तसं झालं नाही.आशुतोष यांची चांदणी चौक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती पण टीव्हीवरील लोकप्रियता त्यांच्या उपयोगाला आली नाही.ते पराभूत झाले.राज्यसभेवर पाठविलं जाईल असं त्यांना वाटलं पण ते ही झालं नाही.अण्णा हजारे यांनी उभ्या केलेल्या चळवळीकडं देशातील अनेक पत्रकार आकर्षिले गेले.बहुतेक पत्रकारांना चळवळींचे नेहमीच ममत्व वाटत आलेले आहे.लोकांना मात्र हे मान्य नसावे..तुमची भूमिका पत्रकाराची आहे,तीच तुम्ही पार पाडा असं लोकांना वाटतं त्यामुळंच अनेकजण नगरपालिकेपासून लोकसभेपर्यंत निवडणुका लढवितात पण त्यातील अपवादात्मक पत्रकारच विजयी होतात.राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पत्रकारांना पाठवायला सहसा कोणता राजकीय पक्ष तयार नसतो.अपवाद केवळ शिवसेनेचा असावा.अनेक पत्रकारांना सेनेने राज्यसभेवर पाठविलं होतं.मात्र तेथेही पत्रकारानी प्रकाश पाडलाय असं दिसलं नाही.काही अपवाद असू शकतील.पद मिळालं नाही की,भ्रमनिराश झालेले पत्रकार घरवापसी करताना दिसतात.या मालेत आत आशुतोष यांचा समावेश झालेला आहे.