अरुणशी संवाद थांबला

0
795

खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अरुण देशमुख यांच्या दुःखद निधनाची वार्ता मनाला क्लेषकारक आहे. कारण नेहमी हसतमुख असणारे व समाजातील विविध घटकांना न्याय मिळावा यासाठी लेखणीद्वारे आवाज उठविणारे अरुण देशमुख आता आपल्यात नाहीत. ही घटना मनाला वेदना देत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने अरुण देशमुख आज आपल्यात नाहीत. मात्र, अरुण देशमुख यांनी जे पत्रकारितेच्या माध्यमातून काम केले आहे, ते सातारा जिल्ह्यातील युवा पत्रकारांसाठी आदर्शवत काम आहे. पत्रकारिता म्हणजे तारेवरची कसरत .् ही कसरत अरुण देशमुख यांनी अनेक वर्ष इमाने-इतबारे व प्रामाणिकपणे केली. अरुण देशमुख आणि आमचा गेल्या अनेक वर्षाचा ऋणानुबंध होता. पत्रकारिता व वृत्तपत्र या विषयावर आमची सातत्याने त्यांच्याशी चर्चा होत असत. पत्रकारितेमध्ये सकारात्मव्ातेचा बदल झाला पाहिजे असा अरुण देशमुख यांचा नेहमी आग्रह असायचा. दै. पुढारीसाठी वार्तांकन करताना जिल्ह्यांतील इतर वृत्तपत्रांनाही महत्वाची वृत्त अरुण देशमुख देत असत. त्याचबरोबर पिडीत लोकांच्या समस्या हिरीरीने वृत्तपत्रांत मांडून पिडीतांना न्याय देण्याच्या भावनेतून ते लिखाण करत असत. अरुण देशमुख यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून अनेकांना न्याय दिला आहे. आज खटाव तालुक्यातील अरुण देशमुख आपल्यात नाहीत, हे मनाला पटेनासे झाले आहे. सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून अरुण देशमुख यांच्याशी नेहमी अनेक विषयावर चर्चा होत राहिली. आता यापुढे अरुण देशमुख यांच्याबरोबर संवाद होणार नाही. वास्तविक अरुण देशमुख हे अकालीच गेल्याने मनस्वी दुःख आहे. अंतःकरणपूर्वक आमच्या या सच्च्या दिल मित्राला आदरांजली वाहताना डोळयातील अश्रू आवरणे आम्हालातरी शक्य नाही. मात्र, दैवापुढे कोणाचेही काहीच चालत नाही.
गोरख तावरे (कराड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here