अधिस्वीकृती नाही…आता काही अडणार नाही,

0
792

अधिस्वीकृती नाही…आता काही अडणार नाही,

महात्मा ज्योतीबा फुले योजनेचा लाभ

 पूर्णवेळ पत्रकारांना मिळणार 

 ज्या पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका नाही पण ज्यांची उपजिविका पत्रकारितेवर अवलंबून आहे,म्हणजे जे पूर्णवेळ पत्रकार आहेत अशा पत्रकारांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेत समावेश करण्याची मराठी पत्रकार परिषद  मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केल्याने टेबलवर काम करणारे पत्रकार तसेच ज्याची उपजिविका पत्रकारितेवर अवलंबून आहे अशा पत्रकारांना याचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.या योजनेचा लाभ पूर्णवेळ छायाचित्रकार तसेच इलेक्टॉनिक मिडियातील पत्रकारांना देखली होणार आहे.

महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेत अधिस्वीकृती धारक पत्रकारांचा समावेश केल्याचा जीआर मागच्या आठवडयात सरकारने काढला होता.या जीआरचा लाभ राज्यातील केवळ 2000 पत्रकारांनाच होणार असल्याने  मराठी पत्रकार परिषदेने यास जोरदार हरकत घेत लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहून अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी विनंती केली होती.त्यानुसार वित्तमंत्री मुनगंटीवर यांनी आज मंत्रालयात चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली.यावेळी किरण नाईक यांनी अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांना तसेच ज्येष्ट आणि वयोवृध्द पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी जोरदार मागणी केली.त्यानंतर मुनगंटीवार यांनी  सुधारित जीआर त्वरित काढण्याचे उपस्थित अधिकार्‍यांना आदेश दिले.नवीन जीआरमध्ये उत्पन्नाची  अट असता कामा नये असे आदेशही वित्तमंत्र्यांनी दिलेले आङेत.हा जीआर निघेल तेव्हा राज्यातील किमान पंधरा हजार पत्रकाराना याचा लाभ होणार आहे.राज्यातील पत्रकारांची संख्या पंचवीस हजारच्यावरती असली तरी अनेकजण अन्य व्यवसाय,शिक्षक,प्राध्यापक,वकिल म्हणून कार्य करत असतानाच पत्रकारिता करीत असतात.अशा पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.आजच्या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने विश्‍वस्त किरण नाईक,चंद्रपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश काकडे आणि त्यांचे सहकारी ,मंत्रालय वार्ताहर संघाचे विवेक भावसार,माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर,संचालक शिवाजी मानकर आदि उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एक पत्रक काढून सरकारच्या नव्या भूमिकेचे स्वागत केले असून या योजनेची माहिती घेऊन गरजू पत्रकारांनी याचा लाभ ध्यावा असे आवाहन केले आहे.तसेच या योजनेची माहिती जास्तीत जास्त पत्रकारांपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा पत्रकार संघांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here