वाढते हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारांमुळे राज्यातील पत्रकार अस्वस्थ,संतप्त
महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यात 65 पत्रकारांवर ह्ल्ले झाले आहेत.या विरोधात प्रभावी कायदा करण्यास सरकारची अक्षम्य टाळाटाळ हा पत्रकारांसाठी चिंतेचा विषय बनलेला असतानाच आता पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याला आयुष्यातून उठविण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार महाराष्ट्रात सुरू झालेला आहे.ताजे उदाहरण म्हणून सुनील ढेेपे प्रकरणाकडे पाहता येत असले तरी अशा कट-कारस्थानाचे केवळ ढेपे हेच एकमेव बळी ठरलेले नाहीत तर गेल्या सहा महिन्यात 29 पत्रकारांवर बलात्कार,विनयभंग,अॅट्रॉसिटी,खंडणीसारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल करून संबंधित पत्रकारांना आयुष्यातून उठविणयाचा प्रयत्न झालेला आहे.हे प्रकार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात घडत असल्याने या विषयावर गंभीरपणे चर्चा करून काही ठोस भूमिका घेणे आवश्यक झालेले आहे.त्यासाठीच येत्या सोमवारी म्हणजे 19 सप्टेंबर 2016 रोजी मुंबई येथील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात ( 9 हजारीमल सोमाणी मार्ग,सीएसटी,मुंबई )पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची बैठक आयोजित कऱण्यात आली आहे.समितीमधील सर्व संघटनांना विनंती करण्यात येत आहे की,कृपया सर्वांनी या महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहावे.या बैठकीस गावकरीचे संपादक डॉ.अनिल फळे आणि कायदेतज्ज्ञ तसेच समितीला सातत्यानं कायदेशीर मदत करणारे जयेश वाणी यांच्यासह काही समविचारी ,ज्येष्ठ पत्रकारांना निमंत्रित कऱण्यात येत आहे.या बैठकीत पुढील दिशा ठरवून निर्णय घेतला जाणार आहे.धन्यवाद
एस.एम.देशमुख
निमंत्रक,
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तथा
अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद मुंबई