माहिती जनसंपर्ककडं नवी ‘कटकट’

0
848

सरकार विरोधी प्रत्येक बातमीचे खुलासे केले जाणार 

माहिती आणि जनसंपर्क विभागाची डोकेदुखी वाढविणारे एक परिपत्रक सरकारने 22 मार्च रोजी काढले असल्याने अनेक अधिकार्‍यांच्या कपाळावर आठया आलेल्या आहेत.बहुतेक वाचकांना स्मरत असेल की,असा एक काळ होता की,सरकारच्या विरोधात एखादी बातमी आली की,माहिती आणि जनसंपर्क विभागामार्फत त्याचे खुलासे येत असत.अनेक वृत्तपत्रे हे खुलासे छापतही असत.नंतरच्या काळात सरकारी कार्यालये एवढी कोटगी बनली की,सरकार विरोधी बातमीचे खुलासे येणे बंद झाले.त्यामुळं एखादी बातमी आल्यानंतर त्यावर सरकारचे काय म्हणणे आहे हे जनतेला समजत नसे.अलिकडच्या काळात सरकारवर होणाऱी टीका कित्येक पटीने वाढली आहे.त्यातून  सरकारी बदनामी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सरकारने त्याची धास्ती घेतली आहे.विरोधात आलेल्या बातमीचा खुलासा आला नाही तर ती बातमी खरी होती असे जनतेचे मत तयार होते हे सरकारच्या प्रतिमेला मारक असल्याने सरकारने आता प्रत्येक विरोधी बातमीचा खुलासा करण्याचा निर्णय घेतला आहे.22 मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय याच्या स्वाक्षरीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की,सरकार विरोधी बातमीचा त्याच दिवसी तातडीने खुलासा वृत्तपत्रांकडे गेला पाहिजे.हे आदेश सर्व शासकीय कार्यालायांना गेले असून स्वतः मुख्यमंत्री या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.बातमी जर मुख्यमंत्र्यांशी संबंधित असेल तर खुलाश्याचा मसुदा मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क विभागाकडे तात्काळ सादर करावा लागेल.या संदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालकांकडे सनियंत्रण आणि समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महासंचालकांनी आपला अहवाल दर आठवडयाला प्रधान सचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना अवलोकनार्थ पाठवावा.जिल्हा स्तरावर हे काम त्या त्या जिल्हयाचे माहिती अधिकारी करणार असल्याने आता खुलासे पाठविण्याची नवी कटकट सर्वच अधिकार्‍यांच्या मागे लागली आहे.आदेशाचे पालन सर्वच विभागांनी काटेकोरपणे करावे असेही परिपत्रकात नमुद कऱण्यात आले आहे.वृत्तपत्रांनी खुलासे छापलेच पाहिजेत अशी सक्ती मात्र पत्रकात करण्यात आली नाही.चला एक मात्र बरे झाले,एखादी सरकार विरोधी बातमी आल्यास दुसरी बाजुही लोकांपर्यंत पोहोचणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here