कोल्हापूरसह राज्यातील आणखी किमान दहा ते बारा जिल्हयात पत्रकार भवनाच्या इमारती अद्याप झालेल्या नाहीत.अ.र.अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्रकार भवनासाठी जागा आणि दहा लाख रूपये देण्याचे आदेश त्यावेळी दिले होते.तसा जीआरही निघालेला आहे.नंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दहा लाखांच्या रक्कमेत वाढ करीत वीस लाख रूपये देण्याचे जाहीर केले.तरीही कोल्हापूर,सांगली,सातारा,नांदेड,पुणे अशा काही जिल्हयात पत्रकार भवन झालेले नाहीत.काल कोल्हापूरमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन ज्या जिल्हयात अद्याप पत्रकार भवन झालेले नाही तेथे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच निधीही मिळावा अशी विनंती केली.त्याचबरोबर पत्रकार वसाहतींसाठीही मदत करण्याची विनंती केली.महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याविषयावर नक्कीच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.पत्रकारांच्या पेन्शनचा विषय प्रलंबित आहे,अन्य 16 राज्यांनी पेन्शन दिलेले आहे आपल्याकडं अद्याप पेन्शन सुरू झालेले नसून त्यासाठी फार तर चार-पाच कोटी रूपये वार्षिक खर्च येईल ही बाबही चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.हा विषय देखील मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी मराठी पत्रकार परिषदेला दिले आहे.माझ्यासोबत परिषदेचे विश्वस्त किरण नाईक आणि कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चारूदत्त जोशी उपस्थित होते..