ज्येष्ठ पत्रकार, अनुवादक आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी कार्यकारी संपादक अशोक जैन यांचे प्रदीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झाले. ७० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.’महाराष्ट्र टाइम्स’चे जवळजवळ एक तप दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली होती. राजधानी दिल्लीत काम करताना अशोक जैन यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची पडझड, इंदिरा गांधींचे पुनरागमन, जुन्या पक्षांची तोडफोड, इंदिरा गांधींची हत्या व त्यानंतर राजीव गांधींच्या कारकिर्दीचे एक पत्रकार म्हणून ते साक्षीदार होते. एका तटस्थ पत्रकाराच्या भूमिकेतून त्यांनी ‘राजधानीतून’ या पुस्तकातून रोमहर्षक शब्दचित्रे रेखाटली होती.अशोक जैन यांना अनेक पुरस्कार मिळाले असून आजवर त्यांची एकूण २० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किऱण नाईक यांनी अशोक जैन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.