डॉ. श्रीपाल सबनीस यांची मागणी

0
2001

एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घ्यावे :डॉ. श्रीपाल सबनिस

पुणे :पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली आहे..
डॉ. सबनीस यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठी पत्रकार परिषद या पत्रकारांच्या मातृसंस्थेत निष्ठेने सेवा बजावणारे ख्यातकीर्त संपादक एस.एम.देशमुख यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधन क्षेत्रात 30 वर्षांची तपश्चर्या रुजू केली आहे.. आचार्य अत्रे, पा. वा. गाडगीळ, ते अनंत भालेराव यांनी ज्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले त्या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदाला त्यांनी न्याय दिला.. विविध मान्यवर दैनिकाचे संपादकीय नेतृत्व त्यांच्या नावावर आहे… पत्रकार संरक्षण कायदा जन्माला घालण्याचा तसेच ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळवून देण्यासाठीचा ए्तिहासिक संघर्ष एस.एम.देशमुख यांच्या सहभागाने अर्थपूर्ण ठरला..
प्राचार्य श्रीपाल सबनिस यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, समाज संस्कृतीचे सम्यक आकलन लेखणीच्या माध्यमातून अभिव्यक्त करणारे एस. एम. पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी म्हणून विवेकाने आणि सक्षमपणे काम करतील असा माझा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर अशा गुणी, बहुआयामी प्रतिभावंतास काम करण्याची संधी मिळणे मराठी पत्रकार विश्वासाठी भूषणावह ठरणार आहे..
राज्यपाल महोदयांनी देशमुख यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करावा आणि राजकीय पक्षांनी देशमुख यांच्या नावाची शिफारस करावी अशी विनंती ही श्रीपाल सबनिस यांनी केली आहे..
पत्रकारिताच नव्हे तर साहित्य, सामाजिक क्षेत्रातूनही देशमुख यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here